आणि लॉटरी लागली !
महाविद्यालयीन विश्व हे एकांकिका स्पर्धांनी बहरलेलं असतं आणि मग आय एन टी, युथ फेस्टिवल अशा एकांकिकातून अनेक विद्यार्थ्यांचे करिअर घडत असतं. सिडनहॅम कॉलेजच्या करण बेंद्रे च्या बाबतीत याच एकांकिका स्पर्धा टर्निंग पॉईंट घेऊन आल्या. झी युवा वाहिनीवरील ‘प्रेम पॉयझन पंगा’ मध्ये प्रमुख भूमिका करणारा कलावंत म्हणजे करण बेंद्रे. तो सिडनहॅम कॉलेजचा माजी विद्यार्थी आहे. त्याने बँकिंग अँड इन्शुरन्स मधील पदवी सिडनहॅम मधून घेतली आहे . सिडनहॅम कॉलेजच्या ड्रॅमॅटिक सोसायटीतर्फे दरवर्षी आय एन टी, युवा महोत्सव मध्ये एकांकिका सादर होत होत्या. सिडनहॅम मधून सादर झालेल्या अनेक एकांकिकेत करण सहभागी होत होता. इप्टा एकांकिका स्पर्धेसाठी त्याने ‘त्रिभुज की चौथी भुजा’ नामक एकांकिकेत काम करून बक्षीस मिळाले होते. करणने एम कॉम साठी देखील सिडनहॅम मध्येच प्रवेश घेतला. तेव्हा कॉलेजच्या ‘निर्वासित’ नावाची एकांकिका खूप पारितोषिके मिळवणारी ठरली होती. मग दोन टीम तर्फे या एकांकिका स्पर्धा होत होत्या. खुल्या गटासाठी होणाऱ्या एकांकिका स्पर्धात करण प्रमुख भूमिका करत होता आणि त्याला एका स्पर्धेत विशेष लक्षवेधी अभिनेता पुरस्कार मिळाला होता. तो प्रयोग पाहायला सुयोग नाट्यसंस्थेचे संदेश भट आले होते.
‘सुयोग’ चे ‘अनन्या’ नाटक जोरात सुरु होते आणि त्यातील शेखर सरपोतदार ही भूमिका करणाऱ्या कलाकाराला पुढे हे नाटक करणे जमणार नव्हते . संदेश भट यांनी करणला ‘अनन्या’ मध्ये काम करशील का ? असे विचारले आणि तो दिवस करणच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. प्रयोगाला फक्त दोन दिवस होते. नाटकाची तालीम फक्त दोन दिवस करता येणार होते. तेव्हा ऋतुजा बागवे हिच्याबरोबर करण ची तालीम झाली. ‘अनन्या’ मधील शेखर सरपोतदार म्हणून करण बेंद्रेला आयुष्यातील मोठी संधी मिळाली. डॉक्टर श्रीराम लागू देखील एका प्रयोगाला आले होते, तो करणच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण होता. करणचे काम अनेक मान्यवरांपर्यंत पोचले होते. त्याच्या नावाला आणि चेहऱ्याला ओळख मिळाली होती.
झी युवा वाहिनीवरील ‘प्रेम पॉयझन पंगा’ साठी त्याने ऑडिशन दिली होती आणि लूक टेस्ट नंतर त्याची निवड या मालिकेतील ‘आलाप देसाई’ या प्रमुख व्यक्तिरेखेसाठी झाली. ही मालिका एक प्रेमकथा होती आणि त्यात इच्छाधारी नागिणीचे आणि एका युवकाचे प्रेम असा भन्नाट विषय होता. महेश कोठारे, आदिनाथ कोठारे यांच्या बॅनरच्या या मालिकेत भूमिका मिळणे आणि शैलेश डेरे
यांचे मार्गदर्शन आणि मालिकेची संपूर्ण टीम यांच्याप्रती करण आभार व्यक्त करतो. लॉकडाउनच्या काळात करणचे कुटुंब काही नामवंत हॉस्पिटल्स मधील डॉक्टर्सची भोजन आणि न्याहारीची व्यवस्था करत होते. त्याच्या कुटुंबाचा केटरिंग व्यवसाय आहे. लॉकडाऊन नंतर हळू हळू अनलॉक होऊ लागल्यावर करण कार चालवायला शिकला आणि ‘प्रेम पॉयझन पंगा’ मुळे तो टीव्हीच्या विश्वात स्वतःचे एक स्थान निर्माण करणारा ठरला.