
Mohan Joshi : मराठीतील मायाळू बाप ते हिंदीतील खलनायक!
काही जुने जाणते कलाकार असे आहेत ज्यांच्या अभिनयाची छाप आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत… अशाच काही कलाकारांच्या यादीत राष्ट्रीय पुरस्कार विजेते ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी (Mohan Joshi) यांचं नाव नक्कीच घ्यायला हवं… रंगभूमी, मालिका, मराठी-हिंदी चित्रपटांतून सकारात्मक आणि खलनायक साकारणाऱ्या मोहन यांचा प्रवास फार खडतर होता… अभिनेता होण्याचं स्वप्नही कधी न पाहणाऱ्या मोहन जोशी यांनी कोणत्याही गॉडफादरशिवाय मराठी आणि हिंदीत आपलं साम्राज्य उभं केलं… आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांचा प्रवास…(Entertainment News)

मोहन जोशी यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दित मराठीत बऱ्यापैकी सोज्वळ आणि मायाळू वडिलांच्या भूमिका साकारल्या.. आणि हिंदीत त्यांच्या वाटेला फार कमी सकारात्मक भूमिका आल्या होत्या… कधीच अभिनेता होण्याचं स्वप्न न पाहणाऱ्या मोहन जोशी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ते एका मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाचे मोठे झाले. बंगळूरमध्ये जन्म झालेल्या मोहन यांनी लहानपणीच पुणं गाठलं…
================================
हे देखील वाचा : ऐश्वर्या राय बच्चनने नाकारलेले पाच चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का??
=================================
शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांनी ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू केला. मोहन जोशी आपलं घर चालवण्यासाठी स्वत: ट्रक चालवायचे… त्यांनी बऱ्याच मुलाखतींमध्ये असं म्हटलं होतं की, “नोकरीच्या काळात त्यांनी ट्रक चालवून आपला उदरनिर्वाह सुरू केला. ते कोलकाता, भोपाळ आणि देवासपर्यंत गाड्या चालवायचे. मोहन जोशी यांनी सांगितलेले की, जेव्हा ते ड्रायव्हर होते, तेव्हा त्यांना २४ तासही फार कमी वाटायचे. त्यांनी ९ वर्षे गाडीत माल चढवणे, उतरवणे आणि वाहून नेण्याचे काम केले होते”… मात्र, गाडीचा अपघात झाल्यानंतर मोहन यांनी आपली ट्रान्सपोर्ट कंपनी बंद केली आणि अभिनयाकडे आपली पावलं वळवली… (Mohan Joshi Movies)
मोहन जोशी यांनी पुण्यातून रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली… परंतु, त्यांना ‘कुरयत सदा टिंगलम’ या नाटकातून विशेष ओळख मिळाली. या नाटकाचे हजाराहून अधिक प्रयोग झाले. यानंतर मोहन जोशींनी ‘धनंजय’ ही पहिली टीव्ही मालिका केली… आणि त्यानंतर भूकंप नावाच्या चित्रपटात मुख्य खलनायकाची भूमिका मिळाली आणि त्यांचा अभिनय प्रवास अविरतपणे सुरु राहिला…

कुठल्याही चित्रपटात जितका नायक महत्वाचा असतो तितकाच खलनायक देखील असतो… दोघांच्या भूमिका किंवा दोन्ही पात्र एकमेकांना पुरक असतात… ८०-९०च्या दशकात मराठी आणि हिंदीत बरेच खलनायक होते… अशातच बॉलिवूडला मोहन जोशींच्या रुपात नवा खलनायक मिळाला… ‘मृत्यूदंड’, ‘गंगाजल’, ‘जमीन’, ‘बागबान’, ‘बिच्छु’, ‘बागी’, ‘आरजू’, ‘वास्तव’ अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली… तसेच, ‘एक डाव भूताचा’, ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘बलिदान’, ‘जीवलगा’, ‘आपली माणसं’, ‘सवत माझी लाडकी’, ‘तु तिथे मी’, ‘धर्मवीर’, ‘गोष्ट एका पैठणीची’ अशा बऱ्याच मराठी चित्रपटांमध्ये कामं केली…
====================================
हे देखील वाचा : विदेशात मराठी चित्रपटाचा शूटिंग फंडा
====================================
या व्यतिरिक्त ‘आसू आणि हसू’, ‘कलम ३०२’, ‘मी रेवती देशपांडे’, ‘सुखांत’, ‘नटसम्राट’, ‘अर्णायक’, ‘श्री तशी सौ’ अशा मराठी नाटकांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत… मोहन जोशींनी केवळ हिंदीच नव्हे तर मराठी आणि भोजपुरी चित्रपटांमध्येही कामं केली आहेत… ३०० पेक्षा अधिक कलाकृतींमध्ये काम करणाऱ्या मोहन जोशी यांना ‘कलाकृती मीडिया’तर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi