
फक्त Lata Mangeshkar नव्हे तर ‘या’ मराठी माणसामुळे ‘ए मेरे वतन के लोगों’ गाजलं!
‘ए मेरे वतन के लोगों’… हे गाणं कधीही ऐकलं की आधी बॉर्डरवर आपल्या रक्षणासाठी झटणारे जवान डोळ्यांसमोर येतात. आणि त्यानंतर कोणाचं स्मरण होत असेल तर सूरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं… खरं तर त्यांच्याच सुरांनी हे गाणं संपन्न आणि भावनिक झालं. पण लतादीदी यांच्या व्यतिरिक्त आणखी एका मराठी माणसामुळे या गाण्याला पूर्णत्व मिळालं होतं, नाहीतर कदाचित अशी चाल, असं संगीत, असं कम्पोजीशन या गाण्याला मिळालंच नसतं. या गाण्याला आणखी सुरेल आणि महान बनवलं ते म्हणजे रामचंद्र चितळकर यांनी… ज्यांना आपण सी. रामचंद्र म्हणूनही ओळखतो.

सी.रामचंद्र यांनी जवळपास ४० दशकं बॉलीवूडचं संगीतविश्व गाजवलं. महत्त्वाचं म्हणजे हे गीत रचलं होतं, कवी प्रदीप यांनी आणि त्यांनीच हे गाणं गाण्यासाठी लता दीदींची निवड केली होती. यानंतर हे गाणं कंपोज कोण करणार? असा प्रश्न समोर आला आणि सर्वांना एकच नाव आठवलं आणि ते म्हणजे सी. रामचंद्र! मुळात हे गीत केवळ इंडियन आर्मी आणि शहीद जवानांसाठी लिहिलं गेलं होतं. रामचंद्र यांनी गाणं कसं असेल, याचा आराखडा तयार केला. त्यानंतर त्यांनी लता दीदींसोबत हे गाणं पूर्ण केलं. २६ जानेवारी १९६३ रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत हे गाणं लता दीदी यांनी सादर केलं होतं. यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. दोन मराठी माणसांचं योगदान लाभलेलं हे महान गाणं आजही सर्वांच्या स्मरणात आहे आणि सदैव राहील.

सी रामचंद्र यांनी मराठी आणि हिंदीसह तमिळ, तेलुगु आणि भोजपूरी चित्रपटांतील गाणीही संगीतबद्ध केली होती. तसेच, काही गाणी त्यांनी स्वत: गायली देखील होती. हिंदी चित्रपटसृ्ष्टीत अण्णा या नावाने लोकप्रिय असणाऱ्या सी.रामचंद्र यांना बालपणी अभ्यासात फारसं स्वारस्य नव्हतं. लहानपणापासूनच संगीताची आवड असणाऱ्या अण्णांनी नागपूरच्या ‘श्रीराम संगीत विद्यालय’येथे त्यांनी संगीताचे पहिले धडे गिरविले होते.
================================
================================
संगीत क्षेत्रासह अभिनयातही त्यांना रुची होती. ‘नागानंद’ या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं होतं खरं पण तो चित्रपट फारसा चालला नाही आणि शेवटी संगीत क्षेत्राकडेच त्यांनी आपली वाट वळवली ती कायमचीच. ‘जाग दर्दे इष्क जाग’, ‘जिंदगी प्यार की दो चार घडी होती है’, ‘आधा है चंद्रमा रात आधी’, ‘देख तेरे संसार की हालत’, ‘कैसे आऊँ जमुना के तीर’, ‘कितना हसीन है मौसम’, ‘गोरे गोरे ओ बांके छोरे’, ‘इना मिना डिका’, ‘कटते है दुख मे ये दिन’, ‘तुम क्या जानो’, ‘तुम्हारी याद ‘मे, ‘आँखो मे समा जाओ’, ‘इस दिलमें रहा करना’, ‘जलनेवाले जला करे’ अशा अनेक गाण्यांना त्यांनी संगीत दिलं आहे.

या व्यतिरिक्त मराठी चित्रपटांतील गाणी आणि भावगीतांनाही त्यांनी चाली दिल्या आहेत. ‘तू सतारी’, ‘मी सप्त स्वरांची’, ‘चल चल रे सजणा’, ‘मीरा तुजला’, ‘धुंद बेली डोलती’ अशी अनेक अजरामर गाणी रामचंद्र यांनी दिली आहेत. खरं तर, अभिनेता होण्याचं स्वप्न पाहून मुंबई गाठणाऱ्या सी. रामचंद्र यांनी सिनेसृष्टीवर राज्य गाजवलंच; पण अभिनेता न होता संगीतकार म्हणून त्यांनी लोकांची मनं जिंकलीच…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi