
“शिवरायांवर जर का आम्ही चित्रपट करत असू तर…”; Digpal Lanjekar यांनी खोपकरांना दिलं प्रत्युत्तर
३० जानेवारी २०२६ रोजी मराठीतील दोन मराठी चित्रपट एकाच दिवशी रिलीज होणार आहेत. अंकुश चौधरी दिग्दर्शित ‘पुन्हा साडे माडे तीन’ आणि दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ एकमेकांसमोर ठाकले असून यावरुन निर्माते अमेय खोपकर यांनी लांजेकरांवर आरोप केले आहेत. लांजेकरांना मुद्दामहून आपल्या चित्रपटाची रिलीज डेट बदलून आगाऊपणा केल्याचं म्हणत त्यांना बॅन करायला हवं असं खोपकरांनी म्हटलं आहे. आता यावर दिग्पाल यांनी आपली बाजू मांडली आहे. काय म्हणाले आहेत ते जाणून घेऊयात..

लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत, दिग्पाल म्हणाले की, “हा संपूर्णपणे निर्मात्यांचा भाग आहे. अमेय खोपकर यांचा बहुदा काहीतरी गैरसमज झालेला असावा. आमचं फोनवर बोलणं झालं होतं तेव्हाही मी त्यांना हे स्पष्ट केलं होतं की चित्रपटाचा निर्माता मी नाही. चित्रपटाचा दिग्दर्शक आणि लेखक मी आहे. अर्थातच दोन मोठे मराठी चित्रपट समोरासमोर येऊ नयेत याच मताचा मी आहे. आमच्या ‘मुक्ताई’ चित्रपटाची रिलीज डेट मराठी चित्रपटांना न्याय मिळावा म्हणून सहा वेळा बदलण्यात आली होती. ‘सुभेदार’ चित्रपटही तीन वेळा पोस्टपोन्ड केला होता. त्यामुळे मराठी चित्रपटांच्या हितासाठी तारीख बदलायला माझा कधीच नकार नसतो. यावेळेसही माझी भूमिका तीच आहे. दोन निर्मात्यांनी मिळून ठरवलं तर कोणत्याही चांगल्या तारखेला हा चित्रपट प्रदर्शित व्हावा. पण, हा निर्मात्यांनी घ्यायचा निर्णय आहे. माझं काम हे फक्त चित्रपट बनवणं आणि तो त्यांच्यामार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हे आहे”.

पुढे लांजेकर असं देखील म्हणाले की, “आम्ही फक्त छत्रपतींचे चित्रपट करतो. आम्ही जर मराठी भाषा टिकवण्यासाठी सिनेमे करतोय तर मराठी चित्रपट टिकवण्यासाठी का नाही प्रयत्न करणार? सगळ्यांनी योग्यरितीने चर्चा करून तारीख ठरवावी, असं माझं मत आहे. प्रत्येक निर्मात्याने त्याच्या व्यवसायाच्या अनुषंगाने तारीख ठरवलेली असते. फेब्रुवारीमध्ये बोर्डाच्या परिक्षा सुरू होत्यात. त्यामुळे चित्रपटाची तारीख बदलण्यात आली आहे. हा चित्रपट नव्या पिढीने बघणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. त्यामुळे चित्रपटाची तारीख अलिकडे घेण्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता, असं मला निर्मात्यांनी सांगितलं. याबाबत मी निर्मात्यांशी एका मर्यादेपर्यंतच चर्चा करू शकतो. त्यानंतर माझी व्यावसायिक मर्यादा मला सांगते की मी निर्मात्यांच्या मताचा आदर केला पाहिजे”, असंही ते पुढे म्हणाले.
================================
हे देखील वाचा : “काही निर्माते जास्त शेफारलेत…”; खोपकरांचा Digpal Lanjekar यांना धमकी वजा इशारा!
================================
दरम्यान, ‘पुन्हा साडे माडे तीन’ चित्रपटाचे निर्माते अमेय खोपकर यांनी दिग्पाल यांनी १६ फेब्रुवारीला रिलीज होणाऱ्या ‘रणपति शिवराय..’ची प्रदर्शनाची तारीख मुद्दाम बदलली असं म्हटलं होतं. ते म्हणाले होते की, “’पुन्हा साडे माडे तीन’ ची तारीख इतर मराठी चित्रपटांसाठी मी तीन आठवडे पुढे ढकलली. मात्र दिग्पाल लांजेकरने त्याच्या १६ फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘रणपति शिवराय’ ची रिलीज डेट अचानक बदलत ३० जानेवारी केली. याबद्दल त्याने कुणालाही विचारलं किंवा सांगितलं नाही. मी त्याला फोन करत तुमच्या चित्रपटाची तारीख बदला असं सांगितलं होतं. मात्र त्यानंतर त्याने माझा एकही कॉल उचललेला नाही. पण मी याचा निषेध करतो. छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट आहे म्हणून मी गप्प आहे. पण, काही निर्माते खरंच शेफारले आहेत. त्यांची मस्ती उतरवली पाहिजे. दिग्पाल लांजेकरनेही असाच आगाऊपणा केला आहे. निर्माता संघ आणि मंडळाला सांगावं लागेल की त्याला बॅन करावं”.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi