
Jai Jai Swami Samarth मालिकेत निर्णायक वळण; भावनिक अध्यायाची होणार सुरुवात!
कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘जय जय स्वामी समर्थ’ ( Jai Jai Swami Samarth Serial) सध्या कथानकाच्या अतिशय निर्णायक आणि भावनिक वळणावर येऊन पोहोचली आहे. स्वामी समर्थांच्या जीवनातील अत्यंत गूढ आणि आध्यात्मिक टप्प्याला या मालिकेत सुरुवात होत असल्याचं चित्रण प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. एका रात्री अचानक स्वामी समर्थ स्थानावरून अदृश्य होतात. त्यांची चिंता करत शोध घेणाऱ्या सेवेकऱ्यांना ते स्मशानभूमीत आढळतात. सुंदरा जेव्हा व्याकुळ होऊन कारण विचारते, तेव्हा स्वामींची उत्तरं अधिकच गूढ ठरतात. “आता वेळ आली आहे, पुढे जाण्याची” असे सूचक शब्द ऐकून सेवेकऱ्यांच्या मनात भीती आणि अस्वस्थता दाटून येते. हे शब्द स्वामींच्या महानिर्वाणाकडे इशारा करत आहेत का, हा प्रश्न सर्वांनाच पडतो.(Jai Jai Swami Samarth Serial)

स्वामींच्या वागण्यात येणारे बदल, त्यांचा नवा निवासस्थानाचा उल्लेख आणि भक्तांपासून थोडं दूर राहण्याचा निर्णय यामुळे कथानक अधिकच गहन होतं. आगामी भागांमध्ये स्वामी जमिनीवर शयन करतात, भक्तांची नोंद तयार करतात आणि अचानक प्रकट झालेल्या शिवलिंगाशी संवाद साधतात. या साऱ्या घटना मालिकेला गूढ आणि थरारक स्वरूप देतात. सुंदरा, कपिला आणि इतर सेवेकऱ्यांमध्ये सुरू असलेला अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र होतो. त्याचवेळी पुण्यातील शिवभक्त नंदराम गवंडी यांची कथा उलगडते. आजारपण, स्वामींचा अंगारा आणि घडणाऱ्या लीलांमुळे या प्रवासाला आध्यात्मिक उंची प्राप्त होते. स्वामी मल्लिकार्जुन रूपात दर्शन देतात, तर दुसरीकडे गोडधोडाचा त्याग जाहीर करून वैराग्याचा मार्ग अधोरेखित करतात.

या सर्व घडामोडींमधून स्वामींचा देहापलीकडील प्रवास, मृत्यूचं सत्य आणि भक्तांसाठी दिलेला संदेश प्रकर्षाने समोर येतो. महानिर्वाण म्हणजे अंत नसून, तो केवळ एका अवस्थेतील परिवर्तन आहे, हे स्वामी आपल्या लीलांमधून समजावून सांगतात.मालिकेच्या सुरुवातीपासून आजच्या या अंतिम टप्प्यापर्यंत ‘जय जय स्वामी समर्थ’ने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. स्वामींचे विचार, त्यांच्या शिकवणी आणि भक्तांशी असलेलं नातं यामुळे ही मालिका केवळ मनोरंजन न राहता आत्मिक समाधान देणारी ठरली आहे. (Jai Jai Swami Samarth Serial)
==========================
हे देखील वाचा: Bigg Boss Marathi 6 : राकेश आणि अनुश्री यांच्यात पुन्हा वाद; कोणाची होणार बोलती बंद?
==========================
आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात माणूस अनेकदा निराश होतो, रागाच्या भरात चुकीचे निर्णय घेतो. अशा वेळी स्वामींचा संदेश स्पष्ट आहे की, कर्म शुद्ध ठेवा, मन निर्मळ ठेवा आणि हेतू प्रामाणिक ठेवा. “मी तुझ्या पाठीशी आहे” हे शब्द केवळ धीर देणारे नाहीत, तर भक्तांना दिलेलं आश्वासन आहे. स्वामी देहाने नसले, तरी त्यांची ऊर्जा, त्यांची कृपा आणि त्यांचा आधार आजही भक्तांना जाणवत राहतो.