Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

Kishor Kadam: “ही शहरी एट्रोसिटीच”; सौमित्रच्या फेसबुक पोस्टची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
मराठी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेते आणि सौमित्र या टोपणनावाने कविता लिहिणारे किशोर कदम (Kishore Kadam) यांनी नुकतीच मदतीसाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साद घातली होती… निमित्त होतं त्यांचं अंधेरीतील राहतं घर धोक्यात आलं असल्यामुळे त्यांनी सोशल मिडियावरुन पोस्ट करत मुख्यमंत्र्यांकडे मदत मागितली होती… विशेष म्हणजे काही तासांमध्ये स्वत: मुख्यमंत्र्यांनी (Cm Devendra Fadnavis) या प्रकरणाची दखल घेतली असून सोशल मिडियाद्वारे किशोर कदम यांना त्याची पोचपावती देखील पोहोचवली आहे…
तर, किशोर कदम यांनी अंधेरी जवळील चकाला भागातील हवा महल या सोसायटीच्या पुनर्विकासात मोठ्या प्रमाणावर फसवणूक आणि भ्रष्टाचार सुरु असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्यासोबतच आणखी २३ सभासदांच्या घरांवरही टांगती तलवार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं… यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सहकारमंत्र्यांना किशोर कदम यांनी मदतीचं आवाहन करत सर्व अनागोंदी कारभाराला सर्वस्वी सोसायटीची कमिटी जबाबदार असून यावर कारवाई करत या प्रकरणाची दखल घ्यावी असं त्यांनी म्हटलं होतं..
================================
हे देखील वाचा: Karishma Kapoor ने अभिषेक बच्चनसोबत ब्रेकअप केल्यानंतर काही महिन्यांनीच….
=================================
किशोर कदम यांच्या पोस्टला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की,”किशोरजी, आपली ही तक्रार मी सहकार सचिव प्रवीण दराडे आणि एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांना सांगितली असून, त्यांना यात लक्ष घालण्यास सूचित केले आहे. आपल्याशी ते संपर्कात राहतील…”
दरम्यान, किशोर कदम यांनी नेमकं फेसबुक पोस्टमध्ये काय लिहिलं होतं जाणून घेऊयात…”नमस्कार! मी किशोर कदम. गेली तीस पस्तीस वर्ष प्रामुख्याने मराठी आणि हिंदी रंगमंच आणि सिनेमात काम करत असून मला महाराष्ट्रात कवी सौमित्र म्हणूनही ओळख आहे आणि या दोन्ही क्षेत्रात मला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नेते, मंत्री, मुख्यमंत्री आणि तमाम जनतेला मी मदतीचे आवाहन करीत आहे”.

पुढे त्यांनी लिहिलं आहे की,”मेजॉरिटीच्या नावा खाली मी राहात असलेल्या सोसायटीमध्ये, रिडेव्हलपमेंटच्या प्रक्रियेत पीएमसी आणि बिल्डर यांनी संगनमताने कमिटी सभासदांची दिशाभूल करून आणि प्रचंड गोंधळ घालून माझे आणि इतर २३ सभासदांची राहती घरे धोक्यात आणण्याची शक्यता निर्माण करून ठेवली आहे. कमिटी मेम्बर्सनी काही महत्वाची कागदपत्र, अर्धवट माहिती आणि लपवाछपवी करून अंधेरी पूर्व चकाला सारख्या अत्यंत प्राईम विभागात 33(11) आणि 33(12)B या DCPR खाली आमची इमारत SRA/स्लम डेव्हेलपमेंट खाली डेव्हलप करण्याचे ठरवले असल्याचे कालच आमच्या लक्षात आले आहे”.
पुढे बोलताना किशोर कदम म्हणाले आहेत की, “मुर्खांच्या मेजॉरिटीचा कसा गैरफायदा घेतला जाऊ शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. सरकारने मेजॉरिटीचा कायदा करून जे लोक चौकस आहेत , कायद्याला धरून आवाज उठवतात , अन्याया विरोधात कायद्याने लढतात त्यांचा आवाजच एका अर्थाने बंद केला आहे. मेजॉरिटीच्या नावाखाली मूर्ख लोक स्वतःच्याच पायांवर धोंडे पाडून घेतात आणि हे त्यांच्या कसे लक्षातही येत नाही याचे उदाहरण म्हणजे आमची ही सोसायटी आहे.

“एखादा सभासद जर चौकस असेल, कायद्याला धरून प्रश्न विचारत असेल आणि कमिटी मेम्बर्सला जर त्याच्या प्रश्नांची उत्तरे देता येत नसतील, कमिटी मेम्बर्स स्वतः काही अभ्यास न करता पँक आणि बिल्डरवर जर आंधळा विश्वास ठेऊन काम करत असतील तर त्या एका मेम्बरला गाळून वेगळा व्हॉट्सअप ग्रुप स्थापन करून त्या एका मेम्बरला मुंबई सारख्या शहरात चक्क बॉयकॉट केले जाते, त्याच्या पासून सगळी महत्वाची माहिती लपवली जाते, त्याच्या विरुद्ध सर्व सभासदांना भरवले जाते आणि तो सभासद रिडेव्हल्पमेंटच्या विरोधात आहे असे भासवले जाते,त्याला एकटे पाडले जाते. ही एका प्रकारची शहरी एट्रोसिटीच असते ज्या साठी कायद्यातही काहीच तरतूद नसते ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे.मुंबई सारख्या व इतर कोठेही असे सगळे घोळ झाल्या नंतर PMC आणि बिल्डर यांच्या प्रचंड आर्थिक ताकदी समोर मग वर्षानुवर्षे सामान्य माणसाला हतबलपणे लढत बसावे लागते. अशा कितीतरी केसेस आज मुंबई शहरात प्रलंबित आहेत…”
================================
हे देखील वाचा : ‘साधना’ चित्रपटासाठी Vyjayanthimala यांनी रात्री १२ वाजता सही का केली होती?
=================================
शेवटी त्यांनी असं लिहिलं आहे की, “या गंभीर समस्येकडे शासनाला तातडीने लक्ष घालण्याची कळकळीची विनंती ,मी सर्व सामान्य माणसांतर्फे करीत आहे करीत आहे. मी महाराष्ट्राचे मुख्यममंत्री फडणवीसजी , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि अजित पवारजी , तसेच सहकारमंत्री बाबासाहेब पाटीलजी आणि महाराष्ट्रातल्या तमाम रसिक जनतेला एका कलावंताचे घर वाचवण्याचे आवाहन करीत आहे. किशोर कदम. कवी सौमित्र”…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi