Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

50 Years Of गळ्यात साखळी सोन्याची,ही पोर कोणाची?
गाणं माहित असतं,आपण ते ऐकत असतो, गुणगुणत असतो,ते आवडत असतं,हळदीला त्यावर हमखास झक्कास ठेका धरला जातो, वाढदिवसाच्या सोहळ्यात ऐकायला मिळतं,त्यावर आपण नाचतोही,ते गाणं मूळ आवाजात कोणाचं आहे हे आपल्याला माहित नसतं, माहित करुन घ्यावं असंही वाटत नाही,आता रीमिक्स अवतारात कोणी गायलयं हेही माहित नाही. कधी काळी ते पिकनिकला गाण्यांच्या भेंड्यात गायलं जाई,आता डीजेवर वाजवलं जातंय.अशी अनेक गाणी अनेक वर्ष ‘चालताहेत’. गीत संगीत व नृत्य हे आपल्या देशातील चित्रपटांचे व सण संस्कृतीचं वैशिष्ट्य आहेच. (Bollywood movies and songs)
असंच एक लोकप्रिय गाणं,’गळ्यात साखळी सोन्याची, ही पोर कोणाची…?’ हे एक लोकप्रिय कोळीगीत. पण ते चित्रपटात होतं याची आपणास कल्पना आहे? होमी वाडिया निर्मित व दिग्दर्शित ‘तुफान और बिजली’ या मसालेदार मनोरंजक स्टंटपटातील आहे. हा चित्रपट मुंबईत १६ मे १९७५ रोजी प्रदर्शित झाला. म्हणजेच या चित्रपटाच्या प्रदर्शनास ५० वर्ष पूर्ण झाली देखिल. तरी हे गाणं लोकप्रिय आहे. हा चित्रपट मुंबईत नाझ चित्रपटगृहात मॅटीनी शोला प्रदर्शित होत असतानाच त्यासह ताज चित्रपटगृहातही दिवसा चार खेळ याप्रमाणे प्रदर्शित झाला होता.

त्या काळात मुंबईतील डॉ.भडकमकर नमस्कार नाझ हे मुख्य प्रवाहातील चित्रपटगृह तर ग्रॅन्ट रोड परिसरातील प्ले हाऊस विभागातील ताज हे स्टंटपटाचे अथवा दुय्यम दर्जाच्या चित्रपटांचे चित्रपटगृह म्हणून ओळखले जाई.त्या काळातील चित्रपट प्रदर्शनाची वैशिष्ट्य काही वेगळीच होती आणि तो देखिल चित्रपट अभ्यासाचा म्हणा वा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याच्या पध्दतीतील एक महत्वपूर्ण घटक होता. ते दिवसच वेगळे होते. आपल्या देशातील चित्रपट इतिहासाचा प्रवास फार बहुस्तरीय नि रंजक आहे.(mix masala news)
गळ्यात साखळी सोन्याची हे ‘तुफान और बिजली’ या चित्रपटातील गाणं आहे हे फारसं कधी गणलं गेलंच नाही.हे गैरफिल्मी गाणं असून ते या चित्रपटात वापरले गेले असाच समज आहे. या चित्रपटातील गाणी काफिल अझर यानी लिहिली असून संगीत चित्रगुप्त यांचे आहे. हे गाणं आशा भोसले व महेन्द्र कपूर यांनी गायलंय. त्या काळात जिकडे तिकडे लाऊडस्पीकरवर हे गाणं हमखास लावलं जाई. गोकुळाष्टमी, श्रीगणपती विसर्जन यांच्या मिरवणुकीत कच्ची बाजातही हे गाणं फॉर्मात असे. असं एखादं गाणं वाजवलं जाणं म्हणजे ते भारी लोकप्रिय आहे असं मानलं जाई. त्यात मस्त ठेका आहे.(Entertainment update news)
==============
हे देखील वाचा : Aamir Khan : आमिर खानचे हे दोन चित्रपट पडद्यावर यायला हवे होते
==============
पडद्यावर अरविंद कुमार व जाहिरा यांनी झक्कास नृत्य करीत सादर केलंय. जाहिरा ही सत्तरच्या दशकातील एक साधारण रुपडे व तशीच साधारण अभिनय क्षमता असलेली अभिनेत्री. म्हणूनच तिच्या कारकिर्दीला ओहोटी लागली. ‘गॅम्बलर’, ‘आदमी सडक का’, ‘कॉलगर्ल’, ‘एक हंस का जोडा’ इत्यादी चित्रपटात लक्षात राहणार नाहीत अशा भूमिका तिने केल्या.’जिंदा दिल’ चित्रपटात ऋषि कपूर व नीतू सिंग यांच्यासह ती होती, ‘टॅक्सी टॅक्सी’ चित्रपटात ती अमोल पालेकर यांची नायिका होती हे आश्चर्याचं. राजेश खन्नाची तिने कशी कोण जाणे मर्जी संपादन करुन ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘नौकरी’ चित्रपटात ती त्याची नायिका झाली. या चित्रपटात राज कपूरही आहे. नरेंद्र बेदी दिग्दर्शित ‘007’ या हिंदीतील जेम्स बाँड चित्रपटातही ती राजेश खन्नाची नायिका होता. मुहूर्तावर प्रचंड खर्च झालेला हा चित्रपट तेथेच बंद पडला.(Entertainment masala)

‘तुफान और बिजली’मध्ये चक्क तिची दुहेरी भूमिका होती. पिक्चरचा फॉर्म्युला अमिताभ बच्चनच्या सूडकथेनुसार. माधुरी व शीला यांच्या लहानपणी खलनायकाने त्यांच्या मातापित्याची हत्या केली.त्याच वेळेस माधुरी व शीला या जुळ्या बहिणी एकमेकींपासून दुरावतात.माधुरीने या हत्या पाहिल्या असल्याने तिच्या मनात त्याचा चेहरा फिट्ट बसलाय. ती सर्कशीत लहानाची मोठी होते. शीला नाईट क्लब डान्सर बनते.चित्रपटाच्या क्लायमॅक्सला या हरवलेल्या बहिणींची ओळख पटते आणि त्या खलनायकाचा (इम्तियाज खान)निष्पाप करतात. ‘मा बाप के खून का बदला’या एका ओळीच्या गोष्टींवर त्या काळात अनेक चित्रपट आले. त्यात चांगला मसाला कोण भरतंय हे महत्वाचं. ‘गळ्यात साखळी’ गाणं पडद्यावर शीलाच्या रुपातील झाहिरा साकारते (त्या काळात झाहिरा व झाहिदा अशा दोन अभिनेत्री असल्यानेही कधी कधी गोंधळ उडे). या चित्रपटात मा. भगवानदादा, मोहन चोटी, टूनटून असेही अनेक कलाकार.(Indian cinema history)
==============
हे देखील वाचा : Sholay :’शोले’ची ५० वर्ष पुर्ण; प्रेक्षकांसाठी खास रि-रिलीज होणार चित्रपट
==============
निर्माता व दिग्दर्शक होमी वाडिया हे चक्क १९३५ सालच्या ‘हंटरवाली’पासून कार्यरत. तब्बल ४०-४२ वर्ष ते चित्रपट क्षेत्रात. ‘हिंद केसरी’, ‘मिस फ्रन्टीयर मेल’, ‘तुफानी टार्जन’, लुटारु ललना’, ‘डायमंड क्वीन’ असे ढिश्यूम दिश्यूम फायटींगवाले पिक्चर निर्माण करत असतानाच ते १९५० सालापासून ‘श्रीगणेश महिमा’ या चित्रपटापासून पौराणिक चित्रपटांकडे वळले. ‘हनुमान पाताल विजय’, ‘संपूर्ण रामायण’, ‘श्रीकृष्ण लीला’ असे अनेक पौराणिक चित्रपटही त्यांनी निर्माण केले. यशस्वी चित्रपट निर्माते म्हणून ते ओळखले जात. ‘तुफान और बिजली’सारखे चित्रपट सवंग मनोरंजन मानले जाई. त्यांना बी ग्रेड चित्रपट म्हणत. तेही कमी अधिक प्रमाणात यशस्वी ठरत. निव्वळ टाईमपास अशी व एवढीच अशा चित्रपटांतून अपेक्षा असे. डोक्याला कसलाच शॉट न लावता अथवा दीमाग का दही न करता असे पिक्चर पाहायचे असतात याची शिकवण न शिकता यायची.(Bollywood tadaka)
या चित्रपटाला पार मागे ठेवून गळ्यात साखळी गाणे फार पुढे गेले. महेश भट्ट दिग्दर्शित ‘दिल है के मानता नही’मध्येही ते नवीन रुपात आले. समुद्र किनाऱ्यावरील कोळ्यांसोबत पूजा भट्टचे त्यावर नृत्य होते. पन्नास वर्षात हे गाणं ऑडिओ कॅसेटवरुन ओटीटीपर्यंत पोहचलंय. मुळात ते गाणं लोकसंगीताचा बाज असलेलं आहे. नाचायलाही सोपं.ते नृत्य गीत असलेल्या ‘तुफान और बिजली’चित्रपटाला पन्नास वर्ष पूर्ण झाली हे देखील सांगायलाच हवे.(Entertainment)