‘तू भेटशी नव्याने’मालिकेत अभिमन्यू आणि गौरी यांच्यात बांधली जाणार लग्नाची
गीताबालीने दिला होता राजेश खन्नाला आत्मविश्वास!
सत्तरच्या दशकातील सुपरस्टार राजेश खन्ना आणि पन्नासच्या दशकातील गाजलेली नायिका गीता बाली (Geeta Bali) यांचा तसा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही पण जर सर्व गोष्टी जुळून आल्या असत्या तर कदाचित राजेश खन्ना गीताबालीच्या एका चित्रपटात चमकला असता! कदाचित तो त्याचा पहिला चित्रपट देखील असला असता. पण तसं काही घडलं नाही. राजेश खन्नाच्या सुरुवातीच्या स्ट्रगलिंगच्या काळातील हा किस्सा आहे.
खरंतर हिंदी सिनेमाच्या दुनियेत स्ट्रगल हा प्रत्येकाच्या वाट्याला येतच असतो. राजेश खन्नाच्या वाट्याला देखील आला. साठच्या दशकाच्या सुरुवातीच्या काळातला हा किस्सा आहे. तेव्हा तो राजेश खन्ना बनला नव्हता तेव्हा त्याचे नाव होते जतीन खन्ना. मुंबईच्या रंगभूमीवर तो अनेक नाटकांमधून चमकत होता. पण त्याची मनातून इच्छा होती एक दिवस सिनेमात काम करण्याची. या काळात अंजू महेंद्रू त्याची खास मैत्रीण होती. समुद्रकिनाऱ्यावर हातात हात घालून फिरत असताना जतीन आपल्या पुढच्या स्वप्नांबद्दल तिला सांगत असायचा. ही मैत्री आता प्रेमाच्या रंगात परावर्तीत झाली होती. जतीनचे चित्रपटात काम करण्याचे स्वप्न काही पूर्ण होत नाही. ब्रेकच मिळत नव्हता.
राजेश खन्ना आणि अंजू महेंद्रू यांचे एक नाटक होतं ‘महंगा सौदा’. या नाटकाची तालीम कधी पाटकर हॉल तर कधी भुलाबाई मेमोरियल हॉल इथं होत असे. या भुलाबाईमध्येच शम्मी कपूरची पत्नी अभिनेत्री गीता बाली (Geeta Bali)चे ऑफिस होते. अनेक मान्यवर गीता बालीला भेटण्यासाठी तिथे येत असत. जतीन कायम सिनेमातील या ताऱ्यांना मोठ्या कुतूहलाने पाहत असे. एक दिवस आपल्याला देखील सिनेमात जायचं आहे. आपण ही असेच स्टार बनू याचे मनात तो स्वप्न पहात असे. अनेकदा त्याला खूप वाटायचं आपण आत जाऊन गीताबाली भेटून सांगावं. पण हिम्मत होत नव्हती.
============
हे देखील वाचा : मिथुनमुळे संगीतकार अनु मलिक पार्श्वगायक बनले?
============
पण एक दिवस अचानकपणे गीता बाली (Geeta Bali)ची आणि त्याची भेट झाली. अचानकपणेसमोर अभिनेत्री गीता बालीला पाहून काय बोलावे हे त्याला समजेना. त्याच्या घशाला कोरड पडली. त्याला काही बोलताच आले नाही. तिने त्याला विचारले, ”तू ॲक्टर आहेस?” त्याने निरर्थकपणे मान डोलावली. याचा अर्थ आहे किंवा नाही असा दोन्हीही होत होता. नंतर तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवून विचारले, ”तुला एक्टिंगमध्ये इंटरेस्ट आहे का?” आता मात्र तो हो म्हणाला. मग तिने सांगितलं, ”तुझे काही फोटोग्राफ आणि पत्ता, फोन नंबर आमच्या ऑफिसमध्ये देऊन ठेव. आम्ही लवकरच एक नवीन पंजाबी सिनेमा लॉन्च करत आहोत!”
जतीन मनोमन खुश झाला. रात्री त्याला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी त्याने त्याचे खास फोटो, ऍड्रेस आणि फोन नंबर गीता बालीच्या ऑफिसमध्ये नेवून दिले. त्या दिवशी तिच्या ऑफिसच्या समोरच्या रिहर्सल रूममध्ये नाटकाची प्रॅक्टिस करत करताना त्याची एक नजर गीता बालीच्या ऑफिसकडेच होती. पण दिवसामागून दिवस चालले होते. त्याला काहीही इन्फॉर्मेशन मिळत नव्हती. तो रोज फिल्मी मॅगझिन धुंडाळत होता. ज्यात गीताबालीच्या नवीन सिनेमा बाबत काही छापून आले आहे का ते पाहायला.
पण एक दिवस मात्र त्याच्यावर बॉम्बच पडला. कारण एका फिल्मी मॅगझिनमध्ये गीता बालीच्या नवीन सिनेमाची जाहिरात आली होती मात्र त्यात काम करणाऱ्या कलावंतांमध्ये त्याचे नाव नव्हते! जतीनला प्रचंड वाईट वाटले. आशेचा एक जो किरण मनामध्ये शिरला होता तो आता संपुष्टात आला. त्याला वाटले आपले करिअर सुरू होण्याच्या आधीच संपलं. पण दुसऱ्या दिवशी मात्र गीता बाली (Geeta Bali)च्या ऑफिसमधून त्याच्या घरी फोन आला आणि ‘त्या’ सिनेमा लॉन्चच्या पार्टीला त्याला बोलावलं. त्यात आधी असे सांगितले की या सिनेमाचा हिरो धर्मेंद्र याच्यासोबत तुला भेटता येईल.
पार्टीला जायचं जतीनच्या खरं तर मनात नव्हतं. पण गीता बालीच्या ऑफिसमधून फोन आल्यामुळे तो ‘ब्लू हेवन’ या गीता बाली (Geeta Bali)च्या बंगल्यावर पार्टीसाठी गेला. तिथे झाडून सगळी फिल्म इंडस्ट्री उपस्थित झाली होती. सर्वत्र चकाचक वातावरण होतं. शांत म्युझिक सुरु होतं. सर्व जण हसत खेळत खानपान करत होते. जतीन मात्र एका कोपऱ्यात बसून हताशपणे हा सगळा नजारा पाहत होता. त्याच्या डोळ्यात आसू होते. कारण खरं तर त्याला असं वाटत होतं या सिनेमाचा आपण एक हिस्सा असणार आहोत पण दुसरं मन त्याला समजावत होता असं सहज साध्य काही मिळत नसतं. हळूहळू हे ही दिवस जातील.
या रंगलेल्या पार्टीत जतीन मात्र हताश एकाकी पडला होता. पार्टीमध्ये तो आता बोअर झाला होता. तो पार्टी सोडून निघून जायला लागला. तोच समोरून गीता बाली (Geeta Bali) आली तिने खांद्याला धरून त्याला बसवलं आणि त्याला विचारलं, ”तुला खूप वाईट वाटत असेल ना?” जतीन काहीच बोलला नाही, पण त्याचे डोळे खूप काही बोलून गेले. गीताबालीने त्याला सांगितलं, ”वर बघ. आकाशात किती तारे आहेत? तुला एक दिवस असंच चमकायचं आहे आणि मला खात्री आहे की तू नक्की चांगला स्टार होशील. या सिनेमातून नसला म्हणून काय झालं? एक ना एक दिवस तुझ्यासाठी हिंदी सिनेमाचे दारे उघडली जातीलच आणि तू मोठा स्टार बनशील!” आता मात्र जतीनच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागला. गीताबाली म्हणाली, “हिम्मत हरायची नाही आत्मविश्वासाने पुढे जायचं.”
===============
हे देखील वाचा : जेव्हा दिलीप कुमारसाठी लिहिलेलं गाणं अक्षय कुमारवर चित्रित झाले!
===============
गीता बाली (Geeta Bali)च्या आश्वासक बोलण्याने जतीन सावरला. पुन्हा एकदा मनात आत्मविश्वास आला. गीतावलीच्या शब्दांनी तो पुन्हा एकदा हिंदी सिनेमाच्या प्रवेशासठी प्रयत्न करू लागला. ज्या सिनेमाच्या मुहूर्ताची ही पार्टी होती तो सिनेमा होता ‘एक चादर मैली सी’. दुर्दैवाने या सिनेमाच्या दरम्यानच गीता बालीचे निधन झाले आणि सिनेमा अर्धवट राहिला.