‘खूबसूरत’; अभिनेत्री Rekha हिला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळवून देणारा चित्रपट

जया भादुरीचा पहिला हिंदी सिनेमा : गुड्डी
सत्यजित रे या मातब्बर दिग्दर्शकाकडे बंगाली चित्रपटातून प्रवेश करणाऱ्या जया भादुरी चा पहिला हिंदी चित्रपट होता ‘गुड्डी’. ऋषिकेश मुखर्जी यांचा गुड्डी हा चित्रपट तिला पुण्याच्या एफ टी आय आय मध्ये शिक्षण घेत असतानाच मिळाला होता. ऋषिदा यांनी तिचे काम रे यांच्या चित्रपटात बघितले होते. त्यामुळे ते तिला भेटण्यासाठी गुलजार सोबत ते पुण्याला आले. प्राचार्यांच्या केबिनमध्ये जेव्हा तिला बोलावले गेले त्याचवेळी आपली ‘गुड्डी’ हिच असे त्यांनी मनोमन ठरवले. या चित्रपटात एका शाळकरी मुलीची भूमिका तिने केली होती. जी रुपेरी पडद्यावरील अभिनेता ‘धर्मेंद्र’ च्या ती प्रेमात असते. त्या काळातील तरुण तरुणींना सिनेमाचं पॅशन जबरदस्त होतं. त्यातील कलावंताचे पराकोटीचे आकर्षण होते. ऋषिदांना या चित्रपटातून कचकड्याच्या दुनियेतील हे आभासी प्रेम योग्य नाही ,वर वर गुलाबी वाटणारं हे क्षेत्र प्रत्यक्षात किती काट्याकुट्या नी भरले आहे हेच त्यांना दाखवायचं होतं. हा चित्रपट करताना जया भादुरी २३ वर्षाची होती. पण तिला या चित्रपटात चौदा पंधरा वर्षाच्या फ्रॉक घालणाऱ्या शाळकरी मुलीची भूमिका करायची होती. (Jaya Bachchan)

या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी जेव्हा पहिल्यांदा धर्मेंद्र सेटवर आला तेव्हा त्याने शाळेतील गणवेशातील जया भादुरीला विचारले “ क्या तुम ही इस फिल्म की हीरोइन हो? तुम्हारी उमर क्या है?” ऋषिकेश मुखर्जी यांनी जयाला अक्षरशः शाळकरी मुलगी करून टाकले होते. या चित्रपटाला संगीत वसंत देसाई यांचे होते. वसंतरावांनी जया भादुरी साठी एक नवा स्वर वापरायचे ठरवले. हा स्वर होता वाणी जयराम यांचा. खरं तर लता मंगेशकर आणि आशा भोसले तेव्हा त्यांना डावलून नवीन गायकीला संधी देणे हि एक प्रकारचे रिस्क होती. पण वसंतरावांनी ती घ्यायची ठरवले. वाणी जयराम यांना तशी त्यांनी स्पष्ट कल्पना देखील दिली. कारण संगीताच्या दुनियेत काहीही घडू शकतं असं त्यांना ठाऊक होतं. तिला भरपूर मेहनत करायला सांगितले. गुलजार यांनी लिहिलेली चित्रपटातील सर्व म्हणजे तीनही गाणी वाणी जाहिरात यांच्याकडून तुम्ही गाऊन घेतली. (Jaya Bachchan)
त्यातील ‘हमको मन की शक्ती देना’ हे गाणं आज देखील अनेक शाळांमध्ये प्रार्थना गीत म्हणून गायलं जातं. हे गीत केदार या रागावर आधारित होतं. याच चित्रपटातील मिया की मल्हार या रागावरील ‘बोले रे पपी हरा’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय आहे. प्रस्थापित गायिकांच्या उरात धडकी भरावी इतपत या गाण्याला लोकप्रियता लाभली होती. या गाण्याला सुरसिंगार संसद चे हा पुरस्कार देखील मिळाले. या पुरस्कारासाठी जे दुसरे गाणे या गाण्याच्या स्पर्धेत होते ते होते मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेले ‘दस्तक’ या चित्रपटातील ‘बैय्या ना धरो…’ जया भादुरी आणि वाणी जयराम हे कॉम्बिनेशन खूप लोकप्रिय ठरल्यामुळे जयाचा पुढचा चित्रपट ‘बंसी बिरजू’ या चित्रपटातील गाणे देखील वाणी जयराम यांनीच गायली. ही जोडी लोकप्रिय होईल असे वाटत असताना ‘एक नजर’ या चित्रपटापासून मात्र जयाची गाणी लता मंगेशकर गावू लागल्या. वाणी जयराम यांची कारकीर्द हिंदीत फारशी बहरली नाही. १९७९ सालच्या गुलजार यांच्या ‘मीरा’ या चित्रपटातील सर्व गाणी वाणी जयराम यांनी गायली. गुड्डी चित्रपटात वाणी जयराम यांचा स्वर वसंत देसाई यांनी वापरल्याने लता मंगेशकर यांनी वसंत देसाई यांच्याकडे गाणे बंद केले. हा निव्वळ योगायोग होता का? (Jaya Bachchan)
============
हे देखील वाचा : ‘या’ खलनायकाचा झाला असा दर्दनाक अंत !
============
बाकी ऋषिकेश मुखर्जी यांचा गुड्डी हा चित्रपट सर्वांसाठी मनोरंजक असा सिनेमा होता. यात सिनेमात सिनेमा दाखवल्यामुळे प्रेक्षकांना खूप आवडला. या चित्रपटात सिनेमाचे ॲक्च्युअल शूटिंग होतानाचे शॉट दाखवल्यामुळे प्रेक्षकांना अनेक कलाकार आणि अनेक चित्रपटाच्या चित्रीकरणाचे शूटिंग यात पाहता आले. अशोक कुमार, दिलीप कुमार , प्राण, नवीन निश्चल, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, माला सिन्हा, ओम प्रकाश, विम्मी, शशिकला, शत्रुघ्न सिन्हा, विश्वजीत,देवेन वर्मा असे अनेक कलाकार त्या अर्थाने या चित्रपटात पाहुणे कलाकार म्हणून अवतरले! तरुण वयातील मुला मुलींच्या डोक्यात सिनेमाविषयी असलेली धुंदी आणि त्या क्षेत्रातील वास्तवता माहित नसल्यामुळे निव्वळ ‘रोझी पिक्चर’ दिसत असल्यामुळे तिकडे येणाऱ्या तरुणांची लाटेला एक चांगले समर्पक उत्तर ऋषिकेश मुखर्जी यांनी आपल्या चित्रपटातून दिले होते.