
Kabhi Khushi Kabhie Gham चा दूसरा पार्ट येणार? करन जोहरने दिली हिंट
Karan Johar निर्मित ‘तू मेरी मैं तेरा तू मेरी’ (Tu Meri Main Tera Tu Meri) या चित्रपटाला प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळालेला दिसला नाही. रिलीजपूर्वी चर्चेत असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर मात्र फारशी कमाल दाखवू शकला नाही. प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवल्यामुळे करण जोहरच्या आशांवर पाणी फिरल्याचं चित्र आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने जगभरात सुमारे 39.94 कोटी रुपयांची कमाई केली आहे. मात्र, करण जोहरसारख्या मोठ्या निर्मात्यासाठी ही आकडेवारी समाधानकारक नाही.(Kabhi Khushi Kabhie Gham 2 )

या अपयशानंतरही करण जोहर मागे हटलेला नाही. उलट, तो पुन्हा एकदा दिग्दर्शनाच्या मैदानात उतरायची तयारी करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, करण जोहर लवकरच एक भव्य कौटुंबिक नाट्यपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे, हा आगामी सिनेमा त्याच्या गाजलेल्या ‘कभी खुशी कभी गम’ (Kabhi Khushi Kabhie Gham) या कल्ट क्लासिकच्या धाटणीचा असणार असल्याचं सांगितलं जात आहे. ही बातमी समोर येताच करणच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

१९९८ पासून आतापर्यंत करण जोहरने दिग्दर्शक म्हणून अनेक लक्षवेधी चित्रपट दिले आहेत. कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, कभी अलविदा ना कहना, माय नेम इज खान आणि स्टुडंट ऑफ द इयर यांसारखे सिनेमे आजही प्रेक्षक आवर्जून पाहतात. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेला रॉकी और रानी की प्रेम कहाणी (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) हा त्याचा शेवटचा दिग्दर्शित सिनेमा होता आणि तो बॉक्स ऑफिसवर मोठा यशस्वी ठरला.आता करण जोहरचा पुढील प्रोजेक्ट हा त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा कौटुंबिक ड्रामा असेल, असं म्हटलं जात आहे. पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, करणने आपल्या आठव्या दिग्दर्शकीय चित्रपटाची कथा आणि पटकथा अंतिम केली आहे. हा चित्रपट भावनांनी भरलेला, रोमान्स आणि नातेसंबंधांवर आधारित असणार आहे.(Kabhi Khushi Kabhie Gham 2 )
=================================
==================================
या सिनेमामध्ये दोन पुरुष आणि दोन महिला प्रमुख भूमिका असतील. सध्या कलाकारांची निवड प्रक्रिया सुरू होण्याच्या तयारीत असून, मोठी स्टारकास्ट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, २०२६ च्या अखेरीस या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून, त्याआधी प्री-प्रॉडक्शनचं काम हाती घेतलं जाईल. एकूणच, अपयशानंतरही करण जोहर पुन्हा एकदा आपल्या मजबूत कथाकथनाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर करण्यासाठी सज्ज झाला आहे. आता हा नवा कौटुंबिक ड्रामा बॉलीवूडमध्ये किती मोठी छाप सोडतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.