
Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..
राजश्रीच्या चित्रपटांचा काळ कोणता असेल अशी कल्पना न येवू देण्याची दखल सिनेमातून घेतलेली असली तरी त्या कथानकाच्या एकूणच भौगोलिक आणि सामाजिक पार्श्वभूमीवर आपण अंदाज बांधू शकतो. ८ डिसेंबर १९७९ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘सावन को आने दो’ या चित्रपटातील कथानकाचा काळ हा नक्कीच पन्नासच्या दशकातील आहे. कारण यात अजून सायकल रिक्षा, माणसाने ओढायच्या रिक्षा , कच्चे रस्ते , हिरवागार निसर्ग, देवभोळी खेडूत जनता , धोतर ,पायजमा,घागरा चोली असा देशी पोशाख आणि परंपरेचा पाईक असलेला समाज याचं दर्शन घडतं.

या चित्रपटात तब्बल १० गाणी होती आणि सर्वच्या सर्व लोकप्रिय ठरल्याने इतर चित्रपटांप्रमाणे हा देखील म्युझिकली हिट होता. या चित्रपटाला तसे अनेक पदर होते. एका ग्रामीण भागातील गायकाची अस्तित्वाची लढाई यात होती,ग्रामीण भागात फुलणारी प्रेमकथा होती. या प्रेमकथेला प्रेमाचा तिसरा कोन होता. काळाची पावले न ओळखत , जुन्या अहंकाराला कवटाळून बसणाऱ्या जमीनदाराची यात शोकांतिका होती.अशा अनेक पदरी कथानकाला दिग्दर्शक कनक मिश्रा यांनी चित्रसंस्थेच्या लौकिकाला साजेसे दिग्दर्शन केले. तरी आज चाळीस-पन्नास वर्षानंतर आपण जेंव्हा या चित्रपटाचे समीक्षण करतो त्यावेळी या सर्वांवर कडी करत सर्व श्रेष्ठ ठरते ते संगीत आणि गाणी! संगीतकार राजकमल यांचा हा पहिलाच सुपर हिट सिनेमा होता.
राजश्रीच्या त्या काळातील इतर चित्रपटांप्रमाणे यातही कथानकाला ग्रामीण पार्श्वभूमी आहे. बिरजू (अरुण गोविल) हा गावातील एक तरुण ,त्याचा आवाज खूप गोड असतो. निसर्गाच्या सानिध्यात तो गात असतो बागडत असतो. आपल्या कडील कलेची जाणीव, त्याचे मूल्य त्याला समजत नसते. गावातील जमीनदार (अमरीश पुरी) यांची मुलगी चंद्रमुखी (जरीना वहाब) शहरातून शिकून घरी परतते. बिरजू तिचा बालपणाचा दोस्त असतो. इतक्या वर्षानंतर भेटल्यावर ती खूष होते. त्याच्या गायकीची जादू ती ओळखते आणि त्याच्या कलेचे खरे चीज व्हायचे असेल तर त्याला शहरात जावे लागेल याचे महत्व ती पटवून सांगते.
================================
हे देखील वाचा : Rakesh Roshan: पित्याच्या गाण्याच्या चालीतून बनवले ‘हे’ सुपर हिट गीत!
================================
बिरजूच्या घरातही त्याच्या कामधंदा न करण्याच्या सवयीने तो त्याच्या भावजयीचे बोलणे खातच असतो. चंद्रमुखी त्याच्या आवाजावर फिदा असताना त्याच्या प्रेमात पडते. बिरजूला ती आवडत असली तरी दोघांमधील सामाजिक दरीची त्याला जाणीव असते.घरातील तणाव असह्य झाल्याने तिरीमिरीने एकदा शहराकडे (लखनौ) धाव घेतो. तिथे त्याचा जगण्याचा संघर्ष सुरु होतो. रिक्षा ओढताना तो गात असतो.त्याचा हा मधुर स्वर गीतांजली (रिता भादुरी) च्या कानावर पडतो व ती मंत्रमुग्ध होते. त्याचा पाठलाग करीत ती पोचते. तिचे वडील (गजानन जागिरदार) आकाशवाणी केंद्रात असतात. बिरजूला त्यातून रेडीओवर गायची संधी मिळते. त्याचा आवाज पाहता पाहता सर्वदूर पोचतो आणि तो एक लोकप्रिय गायक बनतो. गीतांजली आपण केलेल्या प्रयत्नाला फळ आल्याने खूष होते. गीतांजली आणि चंद्रमुखी या मैत्रिणी असतात. दोघींचे प्रेम एकच आहे याची कल्पना दोघीना नसते. एकदा चंद्रमुखी गावाहून बिरजू ला भेटायला येते. गीतांजली त्या दोघांचा संवाद ऐकते आणि बिरजू चे खरे प्रेम आपल्यावर नाही याची तिला जाणीव होते.

इकडे बिरजू गावी चंद्रमुखीच्या वडलांना भेटायला येतो आणि लग्नाचा प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवतो. ते रागाने लालीलाल होतात. त्यांच्या डोक्यात अजूनही जुनी सरंजामशाही असते. ते बिरजूचा अपमान करून त्याला माघारी पाठवतात. बिरजू अपमानाने व्यथित होतो आणि पुन्हा शहरात येतो. आता त्याने आणखी मोठं व्हायचा चंग बांधलेला असतो. तो आता गीता सोबत मुंबईला येतो आणि सिनेमाकरीता पार्श्वगायन करू लागतो. इकडे जितका बिरजू मोठा मोठा होवू लागतो तिकडे गावात जमीनदार याची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत जाते. कोर्ट केस मध्ये हरल्याने त्यांच्या जुन्या रुबाबाला ठेस लागते.
चंद्रमुखी तिच्या गावच्या शाळेत नोकरी करू लागते. तिच्या पित्याला आपल्या मुलीच्या सुखात आपण खोट्या अहंकारापायी व्यत्यय आणल्याची बोच जाणवू लागते. त्यांच्या शाळेतील वार्षिक संगीत सोहळ्याला बिरजू तथा ब्रिजमोहन यांना निमंत्रित करण्याचा घाट घातला जातो. त्यासाठी चंद्रमुखी बिरजूला भेटायला येते.बिरजू निमंत्रणाचा स्वीकार करतो. गावात त्याच्या स्वागताची जय्यत तयारी होते. सारा गाव आपल्या भूमिपुत्राच्या दर्शनासाठी आणि स्वरातील गाण्याकरीता आतुरलेला असतो. बिरजू आशीर्वाद घेण्यासाठी चंद्रमुखीच्या घरी जातो. जमीनदार आता थकलेले असतात. त्यांचा सारा अहंकार गळून पडलेला असतो. आपली चूक त्यांना उमगलेली असते.ते स्वत: हून लग्नाचा प्रस्ताव मान्य करतात. इकडे शाळेच्या कार्यक्रमात बिरजू आपल्या गायनाने साऱ्या गावाला मंत्रमुग्ध करतो आणि चंद्रमुखीचा हात आपल्या हातात घेतो.
चित्रपटातील गाणी अतिशय नाद मधुर होती.जसपाल सिंगच्या स्वरात ‘ गगन ये समझे चांद सुखी है चंदा कहे सितारे ‘,’ तुम्हे गीतो में ढालुंगा सावन को आने दो’ ही दोन गाणी होती. येसुदास च्या स्वरात तब्बल सात गाणी होती पैकी ‘कजरे की बाटी आंसूवन के तेल में हारी मैं हार गयी’ हे गीत सुलक्षणा पंडीत सोबतचे युगल गीत होते. इतर गीतात ‘ तेरी तसवीर को सिने से लगा रख्खा है’,’चांद जैसे मुखडे पे बिंदिया सितारा ‘,’तुझे देखकर जग वालो पर यकीन नही क्यूं’,’तेरे बिना सुना मेरे मन का मंदीर आरे आ ‘ या सोबतच आनंद कुमार च्या स्वरात ‘पत्थर से शीशा टकराये ‘हि कव्वाली मस्त जमून आली होती.
================================
हे देखील वाचा: ….. आणि Yash Chopra यांच्या आग्रहाने जावेद अख्तर गीतकार बनले!
=================================
यातली गाणी गौहर कानपुरी,माया गोविंद, इंदीवर , मदन भारती, अभिलाष या मंडळीनी लिहिली होती. दिग्दर्शक कनक मिश्रा यांनी फार काही सिनेमे दिग्दर्शित केले नाहीत हाच त्यांचा एकमेव यशस्वी सिनेमा. अरुण गोविल –जरीना – रिता भादुरी यांचा प्रेम त्रिकोण असला तरी दोघींकडे कमालीचा समजूतदारपणा आहे. जमीनदाराच्या भूमिकेत अमरीश पुरी यांनी छाप पाडली. त्यांचा खर्जातला स्वर , जुन्या परंपरेची गुर्मी आणि नंतर होत गेलेला बदल फार सुरेख पध्दतीने दाखविला. आज तंत्रज्ञान बदलले असले सोपे सरळ भाबडे सिनेमे पहायची सवय आपल्या आजच्या प्रेक्षकांना राहिलेली नाही. पण निरागस सिनेमा पाहायचा असेल तर अशा सिनेमांना पर्याय नाही.