
Kishore Kumar यांना एकच गाणे दोनदा का रेकॉर्ड करावे लागले?
ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला किशोर कुमार (Kishore Kumar) ने एकच गाणे दोनदा रेकॉर्ड केले होते! तेच गाणे पुन्हा दुसऱ्यांदा रेकॉर्ड करण्याची गरज काय होती? खूप इंटरेस्टिंग असा किस्सा आहे. याचे कारण पहिल्यांदा किशोर कुमारने जे गाणं रेकॉर्ड केलं होतं तो चित्रपट बंद पडल्यामुळे हे गाणं दुसऱ्या एका चित्रपटात घेण्यात आलं. पण त्यामध्ये काही बदल करण्यात आले. गाण्याची चाल आणि बाकी सर्व तेच होतं. त्यामुळे हे गाणं किशोर कुमारला दुसऱ्यांदा रेकॉर्ड करायला लागले. कोणता होता तो चित्रपट? कोणतं होतं ते गाणं आणि काय होता तो नेमका किस्सा?

१९८१ साली रमेश बहल दिग्दर्शित ‘हरजाई‘ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या सिनेमात रणधीर कपूर, टीना मुनीम, शम्मी कपूर आणि माला सिन्हा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. रणधीर कपूरचा या चित्रपटातील रोल काहीसा गंभीर होता आणि त्याच्या संपूर्ण चित्रपट करीअरमधील हा एक चांगला रोल होता असे म्हटले जाते. या सिनेमाबाबत रणधीर कपूर खूप सिरीयस होता. या सिनेमातील लता मंगेशकर यांनी गायलेले ‘तेरे लिये पलको की झालर बुनू….’ हे ऑल टाइम हिट असं गाणं आहे. या चित्रपटाची गाणी गुलशन बावरा यांनी लिहिली होती. तर संगीत आर डी बर्मन यांचे होते. (Entertainment mix masala)
रणधीर कपूर आणि आर डी बर्मन हे दोघे चांगले मित्र होते. त्यामुळे शूटिंग झाल्यानंतर बऱ्याचदा हे उशिरापर्यंत गप्पा मारत असायचे. एकदा रणधीर कपूर आर डी बर्मन यांना भेटायला त्यांच्या स्टुडिओमध्ये गेला. आरडीने त्याचे स्वागत करताना त्याच दिवशी किशोर कुमारच्या स्वरात रेकॉर्ड केलेले एक गाणे ऐकवले. रणधीर कपूरला ते गाणे प्रचंड आवडले त्यांनी विचारले, ”हे गाणे आपण चित्रपटात कोणत्या सिच्युएशनला वापरणार आहोत?” त्यावर आर डी बर्मन म्हणाले, ”हे गाणे ‘हरजाई’ सिनेमासाठी रेकॉर्ड केलेले नाही. हे मी एका दुसऱ्या सिनेमासाठी रेकॉर्ड केलेले गाणे आहे!” पण रणधीर कपूरला हे गाणे प्रचंड आवडले. (Kishore Kumar)
तो पंचम यांना म्हणाला, ”हे गाणे मला माझ्या ‘हरजाई’ चित्रपटासाठी हवे आहे. मला हे गाणे खूप आवडले आहे.” त्यावर आर डी बर्मन म्हणाले, ”पण हे गाणं तर मी नासिर हुसेन यांच्या ‘जबरदस्त’ या चित्रपटासाठी रेकॉर्ड केले आहे. त्या सिनेमाचे हे टायटल सॉंग आहे. हे गाणे मी तुम्हाला कसे देऊ शकतो?” त्यावर रणधीर कपूर म्हणाला, ”काही करून मला हे गाणं माझ्या सिनेमासाठी हवे आहे!” पंचम यांचे उत्तर यावर असे होते, ”देखो डब्बू, दोस्ती अपनी काम अपनी जगह. ये गाना आपको नही दे सकता.”

रणधीर कपूर थोडेसे नाराज झाले आणि निघून गेले. पंचमला देखील वाईट वाटले पण नाईलाज होता. त्यानंतर पंधरा-वीस दिवसांचा कालावधी निघून गेला. एकदा सकाळी सकाळी लवकर पंचम रणधीर कपूर यांच्या घरी पोहोचले. ते प्रचंड खुश होते. घरी गेल्यावर ते म्हणाले, ”डब्बू आपको जो गाना चाहिए था वो अब भी आपको चाहिये क्या?” त्यावर रणधीर कपूर म्हणाले, ”हां हां बिलकुल चाहिये!” त्यावर आरडी म्हणाले, ”वो गाना हम अपने सिनेमा मे ले सकते है!”
झालं असं होतं दरम्यानच्या काळामध्ये नासिर हुसेन यांचा ‘जबरदस्त’ हा चित्रपट त्यांनी बंद करण्याचा निर्णय झाला होता. सिनेमा डब्यात गेल्याने त्यामुळे हे गाणं आता पंचम यांचे झाले होते आणि ते रणधीर कपूरच्या ‘हरजाई‘ चित्रपटात वापरू शकत होते. पंचम म्हणाले, ”हे गाणं तर आपण वापरू शकतो पण त्यामध्ये आपल्याला काही बदल करावे लागतील. कारण या गाण्यांमध्ये दोन वेळेला जबरदस्त जबरदस्त असा शब्द आला आहे.” ते लगेच रणधीर कपूरला घेऊन रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये गेले आणि गुलशन बावरा यांना बोलावून घेतले. त्यांना सर्व स्टोरी सांगितली आणि गाण्यांमध्ये काही बदल करायला सांगितला त्यांनी काही ओळी आणि जबरदस्त या शब्दाच्या ठिकाणी एकदा कश्मकश आणि एकदा गुलबदन असे शब्द टाकले. (Kishore Kumar)

नंतर किशोर कुमारला रेकॉर्डिंगला बोलवण्यात आलं. किशोर कुमारला (Kishore Kumar) आश्चर्य वाटलं कारण तो म्हणाला, ”हे गाणं तर आपण काही दिवसापूर्वी रेकॉर्ड केलं होतं!” पंचम त्याला देखील संपूर्ण स्टोरी सांगितली आणि किशोर कुमारने एका टेकमध्ये सर्व गाणं रेकॉर्ड केलं. हे गाणं होतं ‘तुज सा हंसी देखा ना कही….’ हे गाणं ‘हरजाई‘ चित्रपटात घेण्यात आलं. डिस्को बीटस वरील हे गाणं होतं आणि रणधीर कपूर यावर चांगला डान्स केला होता. या गाण्याला त्या काळात चांगली लोकप्रियता लाभली होती. ‘हरजाई’ चित्रपट देखील बऱ्यापैकी चालला. अशा प्रकारे किशोर कुमारने एकच गाणं दोनदा रेकॉर्ड केलं होतं!
============
हे देखील वाचा : Madan Mohan : संगीतकार मदन मोहन यांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार!
============
नासिर हुसेन यांनी त्यांचा डब्यात गेलेला चित्रपट ‘जबरदस्त’ पुन्हा एकदा नव्या जोमाने नव्या संचामध्ये करायला घेतला. आता हा चित्रपट मुशीर रियाज यांनी निर्मित केला होता आणि याला दिग्दर्शन नासिर हुसेन यांचं होतं. संगीत आर डी बर्मन यांचेच होते. नासिर हुसेन यांनी दिग्दर्शित केलेला हा शेवटचा सिनेमा होता. आता या सिनेमाची स्टार कास्ट बदलली होती. ‘जबरदस्त’ चित्रपट १९८५ साली प्रदर्शित झाला. पण त्याला फारसं यश मिळालं नाही. यातील आर डी बर्मन यांनी स्वरबद्ध केलेलं ‘जब चाहा यारा तुमने आखो से मारा तुमने होठो से जिंदा कर दियां…’ हे गाणं लोकप्रिय झालं होतं!