जेव्हा ‘जयकिशन’ च्या लग्नात पल्लवीचे कन्यादान शंकरने केले !
भारतीय चित्रपट संगीतातील सर्वात लोकप्रिय जोडी म्हणजे शंकर जयकिशन. आर. के. फिल्मच्या ‘बरसात’ पासून ही जोडी चित्रपट संगीताच्या दुनियेत आली आणि सिने संगीत खऱ्या अर्थाने बहारदार झाले. शंकर आणि जयकिशन (Jaikishan) हे दोघेही असे वेगवेगळ्या प्रांतातून आले होते. दोघांमध्ये वयात अंतर देखील होते. शंकर यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९२२ चा तर जयकिशन यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९२९ चा. शंकर हे हैदराबाद इथून तर जय किशन हे गुजरात मधील बलसाड येथून आले होते. हे दोघेही स्वतंत्रपणे काम करत असताना राज कपूर यांना बघितले आणि ‘बरसात’ पासून एकत्र आणले. शंकर आणि जयकिशन या दोघांची काम करण्याची स्टाईल देखील वेगवेगळी तसेच त्यांचे स्वभाव देखील !
शंकर हे थोडेसे इंट्रोवर्ट होते तर जय किशन हे दिलखुलास होते. चित्रपटातील गंभीर भावनांच्या गाण्यांना शंकर संगीत देत तर रोमँटिक आणि लाईट मूडच्या गाण्यांना जयकिशन. अर्थात दर वेळी असंच होत होतं अशातला भाग नाही पण ढोबळमानाने त्यांच्यात तसं वर्गीकरण झालं होतं. संगीतकार जयकिशन आणि गीतकार हसरत जयपुरी यांचं विशेष ट्युनिंग होतं. तर संगीतकार शंकर आणि गीतकार शैलेंद्र यांच्यात विशेष सख्य. दोघांमध्ये अशी विविधता आणि स्वभावात फरक जरी असला तरी दोघांच्या संगीतामधील एकजिनसी पणा या दोघांना एकत्र ठेवत होता.
जयकिशन हे एक रोमँटिक व्यक्तिमत्व होते. दिसायला हँडसम होतेच. क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या कॉफी हाऊस मध्ये ते नेहमी जात असत. तिथे एकदा त्यांची भेट पल्लवी माडीवाला या सुंदर तरुणीशी झाली. ही एक गुजराती मुलगी होती आणि तिला शंकर जयकिशन यांचे संगीत खूप आवड (Jaikishan)त होते. भेटी वाढत गेल्या आणि ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. पण पल्लवीच्या घरच्यांना हे स्थळ अजिबात पसंत नव्हते. कारण तिच्या घरी सर्व बिझनेस करणारे लोक होते.
त्यांना सिनेमातील लोकांबद्दल फारशी आस्था नव्हती. त्यामुळे त्यांनी या लग्नाला विरोध केला. पण पल्लवी आणि जयकिशन हे परस्परांच्या प्रेमात असल्यामुळे ते लग्न करणार ही गोष्ट नक्की होती. शंकर यांना जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्यांनी या लग्नाला पूर्ण पाठिंबा दिला. शंकर स्वत: पल्लवीच्या घरी जावून तिच्या घरच्यांना भेटले. त्यांची समजूत काढली. पण घरचे लोक ऐकायला तयार नव्हते. आता काय करायचे. दोन प्रेमी जीवांची तगमग त्यांना पाहवत नव्हती. जयकिशन त्यांचा जिवलग मित्र होता पण त्यांचे त्याच्यावर पुत्रवत प्रेम होते. शंकर यांनी लग्नात पुढाकार घेतला.
३१ ऑगस्ट १९६३ या दिवशी पल्लवी आणि जयकिशन (Jaikishan) यांचे लग्न त्यांनी लावले. पल्लवी च्या घराचे कुणीच या लग्नाला उपस्थित नव्हते तेंव्हा या लग्नात कन्यादान शंकर यांनी केले. आपल्या मित्राला त्याचे प्रेम मिळावे म्हणून त्यांनी फार मोठी जबाबदारी उचलली. शंकर यांनी पुढाकार घेतला नसता तर कदाचित जय किशनला पल्लवी मिळाली नसती !
या लग्नानंतर दोन-तीन वर्षांनी मात्र शंकर आणि जय किशन यांच्यामध्ये काहीशी कटूता निर्माण झाली. याला कारणं अनेक आहेत पैकी एक कारण गायिका शारदा हे होते. या दोघांनी नंतर स्वतंत्रपणे संगीत द्यायला सुरुवात केली तरी त्यांनी संगीतकार म्हणून शंकर जयकिशन हेच नाव कायम ठेवले. पल्लवी आणि जयकिशन यांचा संसार उणीपुरी साताठ वर्षच चालला. १२ सप्टेंबर १९७१ रोजी संगीतकार जयकिशन यांचा लिव्हर सिरोसिसने मृत्यू झाला.
===========
हे देखील वाचा : मनमोहन देसाई आणि अभिनेत्री नंदा यांची अधुरी प्रेमकहाणी
===========
त्यानंतर संगीतकार शंकरने पुढे १८ वर्ष एकट्याने संगीत दिले. परंतु संगीतकार म्हणून शंकर जय किशन हेच नाव त्यांनी वापरले ! जयकिशन (Jaikishan) गेल्यानंतर पल्लवीने फॅशन डिझायनर म्हणून मोठे नाव कमावले. आपल्या ब्रँड मुळे ती जगभर लोकप्रिय ठरली. आज देखील पल्लवी या बिझनेस मध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण करून एक बिझनेस आयकॉन म्हणून लोकप्रिय आहे !