Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

चक्र: Smita Patil यांची एक अद्वितीय कलाकृती!
उत्कृष्ट साहित्यकृतीवर चित्रपट निर्माण करणे आपल्याकडे नवीन नाही. अनेक उत्तमोत्तम अशा देशातील , परदेशातील तसेच प्रादेशिक भाषेतील साहित्य कलाकृतीवरून सिनेमा बनले आहे. अर्थात साहित्य आणि सिनेमा या दोघांची तुलना होऊ शकत नाही. कारण दोघांचे व्यक्त होण्याचे माध्यम वेगवेगळे आहेत. पण तरीही चित्रपट हे माध्यम मोठ्या प्रमाणात समाजापर्यंत पोहोचल्यामुळे एका पुस्तकामुळे होणाऱ्या परिणामा पेक्षा चित्रपट हा अधिक सर्वव्यापी असतो हे नक्की. (Bollywood classic movies)

ज्येष्ठ मराठी साहित्यिक जयवंत दळवी यांनी १९६४ लिहिलेल्या पहिल्याच कादंबरीवर तब्बल सोळा-सतरा वर्षानंतर एक चित्रपट बनला होता. आणि हा चित्रपट देखील खूप लोकप्रिय ठरला. हि कादंबरी होती चक्र. या कादंबरी ने त्या काळी मराठी साहित्य विश्वामध्ये मोठी खळबळ माजवली होती. कारण तोवर या विषयाला स्पर्श करणारी तेवढ्या ताकतीची दुसरी कलाकृती आली नव्हती. ही कादंबरी मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या आयुष्यावरची आहे. तिथल्या समाजाचा जगण्या साठीचा संघर्ष, त्यांची हतबलता, तिथली हिंसा, तिथले क्रौर्य, तिथली लैंगिकता, माणसातील पशुत्व आणि तरीही जगण्याची अपरिहार्यता खूप विस्ताराने जयवंत दळवी यांनी मांडली होती.
मुंबईतील झोपडपट्टीमधील गलिच्छ जीवन, तिथे वस्ती करणार्यांचे उघडे-नागडे आयुष्य चितारताना पत्रकारितेच्या काळात आलेले जिवंत अनुभव जयवंत दळवींना उपयोगी ठरले. बकाल परिसरात पशुतुल्य आयुष्य जगणार्या तेथील व्यक्तींच्या स्वप्नांचा, जीवनमूल्यांचा वेध दळवी घेतात. पांढरपेशा मध्यमवर्गीयांना सर्वस्वी अपरिचित असलेल्या विचित्र संघर्षाचे प्रत्ययकारी चित्रण ते करतात. कादंबरीला कथानक नाही, पण त्यातील व्यक्तिचित्रे महत्त्वाची आहेत आणि ती दळवींनी प्रभावीपणे उभी केली आहेत. १९८१ साली याच कादंबरीवर रवींद्र धर्मराज यांनी ‘चक्र’ नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाला फिल्म फेअर आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अनेक पुरस्कार मिळाले. अभिनेत्री स्मिता पाटील च्या कला जीवनातील ‘चक्र’ एक महत्त्वाचा टप्पा हा चित्रपट ठरला.
================================
हे देखील वाचा: अभिनेत्री स्मिता पाटील का खुश होती या दिग्दर्शकावर ?
=================================
चित्रपटाचे कथानक मुंबईतील एका झोपडपट्टीचे होते. या झोपडपट्टीत अम्मा(स्मिता पाटील) आपल्या बेनवा (रणजीत चौधरी) या मुलासोबत राहत असते. हा बेनवा बेकार असतो. अम्माचा पती पोलिसांच्या मारहाणीत मेलेला असतो. तेव्हापासून तिला ‘पुलिस की झंझट नही चाहिये… इज्जत की जिंदगी चाहिए’ असं वाटत असते. आणि त्या पद्धतीने ती मुलाला वाढवत असते. परंतु त्या झोपडपट्टीतील वातावरण हे कुठेही तिच्या स्वप्नांना पूर्ण करणार नसतं. ती लुक्का (नसिरुद्दीन शाह) नावाच्या एका गुंड व्यक्तीच्या प्रेमात असते. झोपडपट्टीत राहायचे तर कुठेतरी पुरुषी आधार लागतो. त्याच वेळेला तिने अण्णा (कुलभूषण खरबंदा) नावाच्या ट्रक ड्रायव्हरची देखील संबंध ठेवलेला असतो. तिचा संघर्ष असतो आपल्या वाट्याला जे जिणं आलं ते मुलाच्या वाटायला येऊ नये यासाठीचा. तसा झोपडपट्टीतील प्रत्येक जण हा जगण्याची झुंज देत असतो. पांढरपेशा समाजाची जीवनमूल्य आणि त्याची नैतिकता येथे पार पायदळी तुडवणारी असते. कारण इथल्या समाजाची जगण्याची पद्धत ‘रोटी, कपडा आणि मकान’ यासाठी पदोपदी करावा लागणार संघर्ष यातून त्यांची पशुत्वाकडे होणारी वाटचाल फार प्रभावीपणे येथे दाखवली आहे.

चित्रपटांमध्ये पात्रांच्या तोंडची भाषा ही असंस्कृत जरी वाटत असली तरी ती वास्तवाशी नातं सांगणारी असते. एक किळसवाणी, बदनसीब, पराभूत जिंदगी त्यांच्या वाट्याला आलेली असते. चित्रपटातील कथानक पोलीस, रेड लाईट एरिया , वेश्याव्यवसाय, दारू विक्री, मारामारी,गरीबी, दारिद्र्य , लैगिकता या भोवती फिरत रहाते. या चित्रपटातील पुन्ना,भंडारी, चमन्या,अमली, भागी,रघू, लक्ष्मी,चेन्ना ही पात्र आपापला संघर्ष करत पराभूत आयुष्य जगत असतात. शहरी पांढरपेशी लोकांना झोपडपट्टी म्हणजे त्यांच्या आयुष्याला लागलेलं की ठिगळ वाटतं पण झोपडपट्टी वाल्यांची देखील एक दुनिया असते. त्यांचे देखील एक आयुष्य असतो संघर्ष असतो. त्यांची देखील एक जगण्याची उर्मी असते हे आपण विसरतो आणि हेच या चित्रपटात खूप चांगल्या पद्धतीने दाखवले आहे.
अम्मा आपल्या मुलाला गुन्हेगारी पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते परंतु परिस्थितीत अशी होते की चित्रपटाच्या शेवटी अम्माची सगळी स्वप्न भंग पावतात आणि तिचा मुलगा जेलमध्ये जातो! इथे चक्र हे परिवर्तनाचे, विकासाचे प्रतीक नाही तर त्याच परिघात फिरून फिरून पुन्हा एकदा तीच पराभूत परिस्थिती जगायला लावणारे भीषण वास्तव आहे. चित्रपटात स्मिता पाटील यांनी साकारलेली भूमिका जबरदस्त आहे. खरंतर यातील आंघोळीचा प्रसंग आणि त्याद्वारे स्मिता पाटील च्या ओलेत्या शरीराचे प्रदर्शन त्या वेळी चित्रपटाचे त्याकाळी मोठे हायलाईट ठरले होते. कारण चित्रपटाच्या पोस्टरवरच स्मिताची ही अर्धनग्न ओलेती पोस्ट दाखवली होती. जयवंत दळवी यांनी त्यांच्या ‘आत्मचरित्र ऐवजी…’ या पुस्तकात या चित्रपटावर लिहिताना ‘हा प्रसंग दिग्दर्शकाने टाळला असता तर बरे झाले असते’ असे म्हटले आहे.
बाकी स्मिताने या चित्रपटात बेजोड अभिनय केला आहे. तिच्या एकूणच कला कारकिर्दीतील हा एक माइल स्टोन असा सिनेमा आहे. लुक्काच्या भूमिकेत नसरुद्दीन टेरर आहे त्याचे अदाकारी, त्याचा पेहराव परफेक्ट होती. बेनवाच्या भूमिकेत रणजीत चौधरी ने रंग भरला. अण्णाची भूमिका कुलभूषण खरबंदाने संयतपणे केली. या चित्रपटात नंतरच्या काळात गाजलेले अनेक कलाकार छोट्या छोट्या भूमिका करताना दिसतात. त्यात रोहिणी हट्टंगडी, सतीश कौशिक, अलका कुबल, अरुण बक्षी,सविता बजाज, सुहास भालेकर,अंजली पैगणकर,सलीम घौस,मदन जैन, सुधीर पांडे,सुरेश भागवत यांच्या भूमिका आहेत. नंतर ख्यातकीर्त झालेले कुंदन शहा आणि राजकुमार संतोषी या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक होते तसेच विनोद प्रधान चित्रपटाचे सहाय्यक कॅमेरामन होते.

या चित्रपटाला फिल्मफेअरचे सहा नामांकन मिळाली होती. त्यापैकी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (स्मिता पाटील) सर्वोत्कृष्ट अभिनेता (नसिरुद्दीन शहा) आणि सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक(बन्सी चंद्रगुप्ता) असे तीन पुरस्कार मिळाले. स्मिता पाटील ला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. चित्रपटाचे दिग्दर्शक रवींद्र धर्मराज यांनी दिग्दर्शित केलेला हा एकमेव चित्रपट ठरला कारण वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. चित्रपट प्रदर्शित व्हायच्या दोन महिने ११ फेब्रुवारी १९८१ ला त्यांचे दुर्दैवी निदान झाले परंतु पहिल्याच चित्रपटाने जागतिक पातळीवर नोंद घ्यावी असे स्पृहणीय यश मिळवले.’चक्र’१७ एप्रिल १९८१ रोजी प्रदर्शित झाला.
========================
हे देखील वाचा: Kishore Kumar : कोणत्या गायिकेने किशोर कुमारला दिला होता अनमोल सल्ला?
========================
एकूणच ‘चक्र’ हा चित्रपट प्रभावशाली अंगावर येणारा आणि महानगरातील हे समाज जीवन पडद्यावर प्रत्ययकारी पद्धतीने आणणारा चित्रपट ठरला! प्रतिभावंत मराठी साहित्यिक जयवंत दळवी यांचे हे जन्मशताब्दी वर्ष चालू आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या एका अजोड कलाकृतीचा हा चित्रपटीय अविष्कार नवीन पिढीसमोर यावा म्हणून हा लेखन प्रपंच.