वाढदिवसाच्या निमित्ताने Gashmeer Mahajani ने केली मोठी घोषणा; आता दिसणार दिग्दर्शकाच्या भूमिकेत

Ek Goan Ki Kahani चित्रपटाला ५० वर्ष पुर्ण!
‘गावाकडच्या गोष्टी’ असलेल्या चित्रपटांचे आपली यशस्वी घौडदौड आहे. गावातील हिरवेगार वातावरण, संथ आयुष्य, एकत्र कौटुंबिक जीवन, नातेसंबंध, माळरानावरचे प्रेमी युगुल, साधे लग्न सोहळे, समाजकारण, राजकारण, भुतपिशाच्च, अंधश्रध्दा, तलावातील मौज मस्ती अशा अनेक गोष्टींसह गीत संगीत व नृत्य यांच्या सहभागातून अनेक चित्रपट रंगले. मराठीत लोकप्रिय ग्रामीण चित्रपट केवढे तरी. ‘मुक्काम पोस्ट ढेबेवाडी’पासून ‘पाटलीण’पर्यंत, ‘पिंजरा’पासून ‘सैराट’पर्यंत, ‘शापित’पासून ‘माहेरची साडी’पर्यंत केवढे तरी. आणि अनेक प्रकारचे. अगदी ग्रामीण भागातील राजकारणापासून सोशिक नायिकेपर्यंत बरेच. (Bollywood social movies)

हिंदीतही ग्रामीण भागातील गोष्टींचा भरपूर प्रभाव. ‘नया दौर’पासून ‘गंगा जमुना’पर्यंत, ‘मदर इंडिया’पासून ‘लगान’पर्यंत, ‘नदिया के पार’पासून ‘स्वदेश’पर्यंत आणि ‘शोले’पासून ‘विरासत’पर्यंत केवढे तरी चित्रपट गावात घडले. ‘शोले’ ही सूडकथा. रामगढ या गावात घडलेली. ग्रामीण चित्रपट जास्त लोकप्रिय ठरल्याचेही दिसते. असाच एक चित्रपट जेमिनी प्रॉडक्शन्स (मद्रास.आताचे चेन्नई) निर्मित व एस. एस. बालन दिग्दर्शित ‘एक गाव की कहानी’ हा चित्रपट. मुंबईत रिलीज १३ जून १९७५. मेन थिएटर नाझ. चित्रपटाला पन्नास वर्ष पूर्ण झाली देखिल हो. (Ek Goan Ki Kahani movie)

पन्नास वर्षापूर्वीच्या गावातील ही गोष्ट. चालीरिती, परंपरा, समज, गैरसमज, श्रध्दा, अंधश्रध्दा यांनी भरलेली. राकेश पांडेने साकारलेला ग्रामीण नायक मंगल आणि नवतारका मंजुळा विजयकुमारने साकारलेली गावातील युवती बेला ही प्रमुख जोडी. यासह जयश्री गडकर, जीवन, बिरबल, ब्रह्मचारी, मोहन चोटी, सी. एस. दुबे, व्ही. गोपाल, नासीर हुसेन, नवीन चेहरा लोकेश इत्यादींच्या प्रमुख भूमिका. राकेश पांडे हा दिलीप कुमारची नक्कल करणारा कलाकार (कितवा बरे?) मंजुळा दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपटातून हिंदीत आली आणि येथे काही जमले नाही म्हणून साऊथला परतली. या चित्रपटाच्या पोस्टरवर तिला भरपूर स्कोप मिळाला इतकेच. पण पिक्चर चालणे जास्त महत्वाचे. तर करियर घडते. या चित्रपटातील गाणी इंदिवर यांची असून संगीत रवींद्र जैन यांचे आहे.

जेमिनी प्रॉडक्शन्सचा हा चित्रपट. हे दक्षिणेकडील तमिळनाडूच्या चित्रपटसृष्टीतील एक बडे प्रस्थ. एस. एम. वासन यांची ही निर्मिती संस्था व चेन्नईत (तेव्हाचे मद्रास) भव्य दिमाखदार स्टुडिओ. अनेक तमिळ व तेलगू भाषेतील चित्रपट निर्माण करणाऱ्या या बॅनरने हिंदीतही उल्लेखनीय चित्रपट निर्माण केले. ‘इन्सानियत’ (प्रमुख भूमिकेत दिलीपकुमार, देव आनंद, बीना रॉय, विजयलक्ष्मी), ‘पैगाम’ (दिलीपकुमार, राजकुमार, वैजयंतीमाला, बी. सरोजादेवी), ‘जिंदगी’ (राजेंद्रकुमार, राजकुमार, वैजयंतीमाला), ‘समाज को बदल डालो’ ( परिक्षित साहनी, शारदा) हे त्यांनी निर्मिलेले काही हिंदी चित्रपट. ‘एक गांव की कहानी’ निर्मितीच्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक बदल झाले होते आणि दक्षिणेकडील चित्रपट निर्मिती संस्थांनी एकेक करत हिंदी चित्रपट निर्मितीतून माघार घ्यायला सुरुवात केली. एव्हीएम या संस्थेनंतर जेमिनी प्राॅडक्सन्स, त्यानंतर काही वर्षांनंतर प्रसाद प्रॉडक्शन्स इत्यादी.
================================
हे देखील वाचा: Madhuri Dixit : माधुरीला अभिनयात नाही, तर ‘या’ गोष्टीत करायचं होतं करिअर
=================================
‘एक गाव की कहानी’ सांगणारे चित्रपट आजच्या मल्टीप्लेक्स/ ओटीटी युगातही नक्कीच लोकप्रिय होतील. आज ग्रामीण भागातही डिजिटल क्रांतीचे परिणाम/ दुष्परिणाम दिसताहेत. पन्नास वर्षात तिकडची जीवनशैली, राहणीमान बदललयं. त्यावरच्या गोष्टी आजच्या ग्लोबल युगातील रसिक प्रेक्षकांना नक्कीच आवडतील. ग्रामीण जीवनावरील चित्रपट जास्त प्रमाणात लोकप्रिय झालेत हे एक समिकरण अशा चित्रपट निर्मितीत प्रोत्साहन देणारे आहे. (Entertainment news)