
एकावन्न वर्षे झाली, ये Deewar तुटेगी नहीं…
पिक्चर असावा ‘दीवार’ सारखा… मुंबईतील प्रदर्शनास (२४ जानेवारी १९७५) तब्बल एकावन्न वर्षे पूर्ण होऊनही ही ‘दीवार’ अतिशय मजबूत. सिंगल स्क्रीन थिएटर्सच्या युगातील या चित्रपटाचा गल्ली चित्रपट, व्हीसीआर, मनोरंजन उपग्रह वाहिनी, मोबाईल स्क्रीन, ओटीटी असा माध्यमे बदलत बदलत प्रवास आणि त्यात तो पुन्हा एकदा पाहावा, काय भारी अनुभव. रसिकांच्या चार पिढ्या ओलांडूनही या चित्रपटाचा प्रभाव विलक्षण आहे, हीच पारंपरिक मनोरंजक चित्रपटाची ताकद आणि वैशिष्ट्य. चित्रपटाच्या इतिहासातील हीदेखील एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट.
‘दीवार’ची प्रत्येक गोष्ट जमून आलेली. अपवाद फक्त आणि फक्त गीत संगीताचा. साहिरच्या गीतांना राहुल देव बर्मनचे संगीत असा अतिशय उत्तम योग साधला असूनही सूर सापडला नाही हे नवलच. याचं कारण सलीम जावेद यांच्या अतिशय बंदिस्त पटकथेच गाण्याला जागाच नव्हती. या चित्रपटाचे निर्माते गुलशन रॉय हेच या चित्रपटाचे वितरकही. त्या काळातील चित्रपटसृष्टीतील अतिशय दादा माणूस. त्रिमूर्ती फिल्म ही त्यांची चित्रपट निर्मिती संस्था आणि मॉडर्न मुव्हीज ही त्यांची चित्रपट वितरण संस्था.

विजय आनंद दिग्दर्शित ‘जॉनी मेरा नाम’ (१९७०) सुपरहिट यशानंतरचा गुलशन रॉय यांनी आपल्या पुढील चित्रपटासाठी राजेश खन्नाला करारबद्ध केले. दिग्दर्शक यश चोप्रा यांनाही आपल्या यशराज फिल्म्सचा पहिला चित्रपट ‘दाग’ (१९७३) नंतर पुन्हा एकदा राजेश खन्नासोबत काम करण्याचा सुखद योग आला. पण सलीम जावेदनी गुलशन रॉयना समजवले, राजेश खन्नासाठी आमच्याकडे एक पटकथा आहे, आपण ‘दीवार’चा विजय अमिताभ बच्चनला देऊया. (गुलशन रॉय निर्मित राजेश खन्नाचा चित्रपट बनलाच नाही)
काही पटकथा लेखकांना एखाद्या भूमिकेसाठी अमूकच कलाकार फिट्ट वाटतो तो हा असा. त्याच्या धाकट्या भावाच्या भूमिकेसाठी नवीन निश्चलने चक्क नकार दिला. कारण काय तर ज्योती स्वरूप दिग्दर्शित ‘परवाना’त (१९७१) आपण नायक तर अमिताभ खलनायक होता. आता त्याचा छोटा भाऊ साकारायचा? छे छे अजिबात नाही. काही काही कलाकारांचे हे असं वागणं ( की नखरे?) असते तर. यश चोप्रानी शशी कपूरला विचारले असता आपण अमिताभचा लहान भाऊ कसा शोभणार असा त्याला प्रश्न पडला. ती जबाबदारी यशजीनी स्वीकारली. ‘येथे दिग्दर्शक दिसतो’ असं म्हणूया. चित्रपट दिग्दर्शकाचे माध्यम आहे हे अनेक गोष्टीने अधोरेखित होत असते.
================================
================================
आईच्या भूमिकेसाठी वैजयंतीमालाला विचारण्यासाठी गुलशन रॉय आणि यश चोप्रा चेन्नईला (तेव्हाचे मद्रास) गेले. वैजयंतीमालाने सांगितले, आपण आपला चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय बदलू इच्छित नाही. मानलं तिला. तिने पुनरागमनाचा मोह टाळला. फार फार मोठी आणि दुर्मिळ गोष्ट. ‘दीवार’च्या परेल येथील राजकमल कला मंदिर स्टुडिओतील मुहूर्ताला शुभेच्छा देण्यासाठी चित्रपती व्ही शांताराम, दिग्दर्शक विजय आनंद इत्यादी मान्यवर उपस्थित होते, शशी कपूर मात्र नव्हता. तो त्याच दिवशी शिरडी येथील साईबाबा मंदिरात दर्शनासाठी गेला होता. त्यामागची गोष्ट अशी, आपल्या चित्रपटांना अधिक चांगले यश प्राप्त व्हायला हवं असं ‘रोटी कपडा और मकान’च्या सेटवर शशी कपूरने मनोजकुमारला सांगताच त्याने शिर्डीला जायचा सल्ला दिला. त्याच वेळी शशी कपूरचा अशोक रॉय दिग्दर्शित ‘चोर मचाये शोर’ प्रदर्शनास सज्ज होता आणि तो सुपरहिटही ठरला.
अमिताभ काही दिवस दिवसभर बंगलोरजवळील रामगढ येथे रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’च्या चित्रीकरणात भाग घेऊन रात्रीच्या विमानाने मुंबईत येऊन ‘दीवार’चे चित्रीकरण करुन परत सकाळच्या विमानाने परत बंगलोरला जाई. या प्रवासात तो आवश्यक अशी झोप घेई असे त्यानेच कौन बनेगा करोडपतीमध्ये सांगितले. कलाकार अशी मेहनत घेतो त्यातून तो घडतो चित्रपटाची पहिली ट्रायल पाहून गुलशन रॉय यांना वाटले, गाणी तर हवीच. गाण्यासाठी चित्रपट पाहणारा एक प्रेक्षकवर्ग आहे यावर त्यांचा पक्का विश्वास. आता चित्रपटात असलेल्या गाण्यासह देवेन वर्मावर एक कव्वाली होती. ती ऐन वेळी चित्रपटातून कापली. यश चोप्रा यांच्या ‘इत्तेफाक’ (१९६९) मध्ये एकही गाणं नव्हते. ते गीतविरहित ‘दीवार’ पेलू नक्कीच शकले असते. नाट्य आणखी खुलले असते.

चित्रपटाच्या गोष्टीवर मेहबूब खान दिग्दर्शित ‘मदर इंडिया’ (१९५७) आणि नीतिन बोस दिग्दर्शित ‘गंगा जमुना’ (१९६१) यातील मध्यवर्ती सूत्राचा प्रभाव आहे हे एव्हाना सर्वज्ञात आहे. त्यावर बरीच उलटसुलट चर्चा झाली. सलीम जावेदनी ती कल्पना चांगलीच पॉलीश नि चकाचक केली. धारदार संवादासह ती अतिशय प्रभावी केली. निरुपा रॉय आणि अमिताभ बच्चनने भारी रंग भरला आणि फस्ट डे फर्स्ट शोपासूनच चित्रपट सुपरहिट. मिनर्व्हा चित्रपटगृहात पंचवीस आठवड्याच्या मुक्काम कधी पार पडला हे समजलेच नाही. आणि तो पुढेही चालत राहिला.
आज डिजिटल युगात ‘दीवार’ तुकड्या तुकड्यात पाहायला मिळतोय. त्यातही रंगत येते. एखाद्या आवडत्या उपहारगृहातील जेवणाच्या थाळीतील एकादी वाटीदेखिल पोट भरणारी ठरावी तसे आहे हे. सलीम जावेद वेगळे झाले तरी त्यांनी स्वतंत्रपणे पुन्हा ‘दीवार’ लिहिलाच. पण मूळ चित्रपटाचा अनुभव नाही. सलीम खान यांनी महेश भट्ट दिग्दर्शित ‘नाम’ आणि शशिलाल नायर दिग्दर्शित ‘फलक’ तर जावेद अख्तर यांनी राहुल रवैल दिग्दर्शित ‘जीवन एक संघर्ष’ हे चित्रपट ‘दीवार’ आपल्याच डोळ्यासमोर ठेवून लिहिले. अगदीच पाचवी सहावी कार्बन काॅपी वाटली. मूळ चित्रपटाची सर येईलच कशी?
================================
हे देखील वाचा : इच्छाधारी Nagin पन्नास वर्षांची झाली!
================================
‘दीवार’ एकदाच पडद्यावर येतो, तसा तो आला आणि कायमचा जबरदस्त ठसा उमटवला. हा चित्रपट कितीही वेळा पहावा, आपण त्यात गुंतत जातो, गुरफटून जातो. हे यश या चित्रपटातचे निर्माते आणि वितरक गुलशन रॉय यांचे, पटकथा संवाद लेखक सलिम जावेद यांचे, निरुपा रॉय, अमिताभ बच्चनच्या कसदार अभिनयाचे, छायाचित्रकरणकार के. जी. कोरगावकर यांचे, कला दिग्दर्शक देश मुखर्जी यांचे, अशा सगळ्यांचे. टीम जमून आली. या चित्रपटातील जणू एक व्यक्तीरेखा ठरलेला प्रभादेवी (पूर्वीचे नाव एल्फिन्स्टन ब्रीज) रेल्वे स्थानकावरील ब्रीज आज पाडला आहे, पण ‘दीवार’ ने त्याची आठवण कायम ठेवली आहे…. एका चित्रपटाचा प्रवास असा अनेक वळणे घेत घेत सुरु असतो आणि हीच पारंपरिक मनोरंजक चित्रपटाची खासियत आहे.