
Guide सिनेमातून हसरत जयपुरीचा पत्ता का कट झाला?
सुप्रसिद्ध साहित्यिक आर के नारायण यांच्या गाईड या कादंबरीला १९६० साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. देव आनंद यांनी आपल्या नवकेतन या बॅनरखाली याच कादंबरीवर चित्रपट बनवायचे ठरवले. हा चित्रपट हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये बनणार होता आणि या बॅनर चा हा पहिला कलर सिनेमा होता. देव करिता हा चित्रपट एक आव्हान होते कारण साहित्यकृतीवरील चित्रपटांना भले ही पारितोषिक मिळत असली तरी व्यावसायिक यश मात्र फार कमी मिळते हा इतिहास होता. पण ही रिस्क देव आनंद यांनी उचलली आणि या चित्रपटाच्या निर्मितीला त्यांनी सुरुवात केली. हिंदी ‘गाईड’चे दिग्दर्शन आधी चेतन आनंद करणार होते पण त्याच वेळी त्यांचा ‘हकिकत’ हा चित्रपट फ्लोअरवर असल्यामुळे या सिनेमाचे दिग्दर्शन देव आनंद यांनी आपला धाकटा भाऊ विजय आनंद तथा गोल्डी याच्याकडे दिले. या सिनेमातील गाणी सुरुवातीला हसरत जयपुरी लिहिणार होते पण नंतर त्यांच्या जागी शैलेंद्र आले. हा बदल का झाला? याच्या मागे देखील एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे.
गीतकार हसरत जयपुरी यांना सिनेमाची कथानक ऐकवण्यात आले आणि त्यांना गाणी लिहायला सांगितले. त्यातील पहिले गाणे त्यांनी लिहिले या गाण्याचे रेकॉर्डिंग देखील झाले. हे गाणे रफी यांनी गायले होते. पण गाण्याचे रेकॉर्डिंग झाल्यानंतर दिग्दर्शक विजय आनंद आणि देव आनंद यांना त्यात काहीतरी कमतरता वाटू लागली. त्यातील शब्द त्यांना योग्य वाटत नव्हते. गाण्यातील भावना त्या व्यक्तीरेखेला पुरेसा न्याय देत नव्हते. त्या कॅरेक्टर च्या भावना गाण्यात पुरे पूर उतरल्या नव्हत्या. म्हणून त्यांनी सचिनदा यांनी सांगितले की “ आपण हे गाणे पुन्हा रेकॉर्ड करूत. हसरतला नवीन शब्दा संहित गाणे लिहायला सांगा.” सचिन देव बर्मन यांनी गीतकार हसरत जयपुरी यांना सर्व प्रकार सांगितला. त्यावर हसरत यांचे म्हणणे असे होते की ,” मी गाण्याच्या सिच्युएशनला योग्य ठरतील असे सर्व शब्द वापरून हे गाणे लिहिले आहे.
परंतु सचिनदा यांनी शब्द बदलण्याचा पुन्हा पुन्हा आग्रह केला. शेवटी चिडून हसरत जयपुरी म्हणाले “ आता या पेक्षा मी आणखी कुठले चांगले शब्द या गाण्यात आणू? गाणं तर एका भडव्याचंच आहे ना?” हसरत जयपुरी यांनी भडवा हा शब्द देव आनंद यांच्या या चित्रपटातील कॅरेक्टर साठी वापरला होता. चित्रपटातील त्याचे कॅरेक्टर राजू गाईड हे एका विवाहित स्त्रीच्या प्रेमात पडणार्या पुरूषाचे होते. त्यामुळे हा शब्द हसरत यांनी वापरला असावा. परंतु हाच शब्द त्यांच्यासाठी घातक ठरला. जेव्हा हा प्रकार आणि हा शब्द दिग्दर्शक विजय आनंद आणि निर्माता देव आनंद यांना कळाला तेंव्हा ते खूप नाराज झाले आणि त्यांनी थेट गीतकार बदलण्याचे ठरवले. जो गीतकार आपल्या चित्रपटातील कथानकाला योग्य समजून घेऊ शकत नाही, त्यातील भावना जाणून घेऊ शकत नाही तो गाणी काय लिहिणार?

त्या काळी म्युझिक असोसिएशनचा एक नियम होता जर एखाद्या निर्मात्याने एखाद्या सिनेमा साठी संगीतकार किंवा गीतकार यांच्याशी काही करार केला असेल आणि काही कारणाने तो चित्रपट बनणार नसेल किंवा तो संगीतकार किंवा गीतकार बदलणार असेल तर त्या गीतकाराला किंवा संगीतकाराला संपूर्ण मानधन देणे बंधन कारक होते. हसरत जयपुरी यांच्याशी करार 25 हजार रुपयांचा झाला होता. देव आनंद यांनी पंचवीस हजार रुपयांचा चेक हसरत जयपुरी यांच्याकडे पाठवला. जेव्हा चेक हसरत त्यांना मिळाला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण एक शब्द जो चुकीचा वापरला तो निर्मात्याला आवडला नाही. त्याचीच ही शिक्षा आहे. हसरत ताबडतोब देव आनंद यांच्या ऑफिसवर पोहोचला आणि मला असं म्हणायचं नव्हतं वगैरे म्हणू लागला. पण देव आनंद म्हणाले,” ते ठीक आहे. पण आता आपण या सिनेमासाठी एकत्र काम शकत नाही.

परत पुढचे पुढे पाहूत.” अशा पद्धतीने हसरत यांचा गाईड या सिनेमातून पत्ता कट झाला पण प्रश्न होताच आता नवीन गीतकार कोण? त्याच वेळी गीतकार शैलेंद्र यांना ही वार्ता कळाली आणि ते स्वतःहून देव आनंद यांना अप्रोच झाले आणि या सिनेमातील गाणी तुमची परवानगी असेल तर मी लिहायला तयार आहे असे म्हणाले. यापूर्वी देव आनंद च्या ‘कालाबाजार’ (१९६०), या चित्रपटाची गाणी लिहिली होती. देव आनंद आणि गोल्डी यांनी संपूर्ण चित्रपटाचे कथानक व्यवस्थितरित्या गीतकार शैलेंद्र यांना ऐकवले. चित्रपटाचे कथानक काळाच्या पुढचे होते. एक विवाहित स्त्री आपल्या पतीचा त्याग करून एका तरुण गाईड सोबत राहू लागते. हे लिव्ह इन रिलेशनशिप त्या काळात कोणालाच मान्य होणे शक्य नव्हते. हसरतने देखील याच भावनेतून तो शब्द वापरला होता.
================================
हे देखील वाचा : ‘गाईड’ पुन्हा अनुभवताना…
================================
गीतकार शैलेंद्र यांनी मात्र साध्या सोप्या शब्दात कलावंतांच्या भावना आपल्या गाण्यात उतरवल्या. ज्या गाण्यामुळे हसरत आणि देव आनंद यांच्यात वाद झाला होता तेच गाणं पहिल्यांदा शैलेंद्र यांना लिहायला सांगितले आणि त्यांनी परफेक्ट गाणे लिहिले. गाण्याचे बोल होते ‘दिन ढल जाये हाय रात न जाये..’ गोल्डी एकदम खूश झाला पुढे प्रत्येक गाण्याच्या सीटिंगला सचिन देव बर्मन त्यांचे सहाय्यक जयदेव आर डी बर्मन आणि शैलेंद्र एकत्र बसू लागले आणि एक एक करत गाणं बनवू लागले . ‘गाईड’ चित्रपटातील गाणी हा एक वेगळा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. यातील प्रत्येक गाणं आज देखील तितकंच लोकप्रिय आहे. ‘कांटो से खिचके के आंचल’, ‘तेरे मेरे सपने अब एक रंग है’, ‘दिन ढल जाये हाय रात ना जाये’, ‘क्या से क्या से क्या हो गया बेवफा तेरे प्यार में’, ‘मोसे छल किये जाये’, ‘पिया तोसे नैना लागे रे’, ‘मुसाफिर जायेगा कहां’, ‘अल्ला मेघ दे पाणी दे. सर्वच गाणी अप्रतिम बनली होती. इंग्रजी गाईडला फारसे यश मिळाले नाही पण हिंदी गाईड मात्र सुपर डुपर हिट झाला. आज देखील हा सिनेमा कल्ट क्लासिक म्हणून ओळखला जातो!