
Dhurandhar : पिक्चर पन्नास दिवस चालला तर केवढे कौतुक….
रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ (१९७५) कायमच चर्चेत असताना त्यात एक फंडा कायम असतो, ‘श़ोले’ थिएटरमध्ये चक्क पाच वर्षे मुक्काम ठेवून होता…. आणि आजच्या एसएमएस अथवा शॉर्ट फॉर्ममध्ये आपलं म्हणणं व्हॉट्सअॅपवर मांडणं अथवा दुसऱ्याचं म्हणणं ऐकणं अशा आजच्या डिजिटल पिढीला त्यात आश्चर्य वाटते. पन्नास वर्षांपूर्वी चित्रपट पाहण्यासाठी एकपडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्स हाच एकमेव मार्ग असल्याने पिक्चर सुपरहिट झाला रे झाला रौप्य महोत्सवी पंचवीस आठवड्याचा खणखणीत मुक्काम निश्चित.

राजेश खन्नाचा नवीन चित्रपट पडद्यावर आला रे आला की समजावे तो सिल्व्हर ज्युबिली हमखास साजरी करणार असे ओळीने सतरा चित्रपट झाले. त्या काळात काठावर पसंत केला गेलेला चित्रपटही पंधराव्या आठवड्यापर्यत म्हणजेच शंभर दिवसांपर्यंत मजल मारत असे. शशी कपूर, राजेश खन्ना आणि मुमताज यांच्या प्रेम त्रिकोणाची सुपरहिट संगीत असलेल्या राज खोसला दिग्दर्शित ‘प्रेम कहानी’ (१९७५) या चित्रपटाने ड्रीमलॅन्ड चित्रपटगृहात असाच मुक्काम केला.
अगदी प्रेक्षकांकडून नापास झालेला चित्रपट म्हणून ओळखला जाणारा मोहन सैगल दिग्दर्शित ‘वो मैं नहीं’ (१९७४) या चित्रपटानेही मिनर्व्हा चित्रपटगृहात पन्नास दिवस मुक्काम केला. आचार्य अत्रे लिखित ‘तो मी नव्हेच’ या बहुचर्चित गाजलेल्या नाटकावर आधारित हा चित्रपट आहे. नवीन निश्चल जराही प्रभावी करु शकला नाही. अगदी साफ कोसळला असं म्हटले गेलेला प्रकाश मेहरा निर्मित आणि दिग्दर्शित ‘जादुगर’ ( १९८९) मराठा मंदिर चित्रपटगृहात तीन आठवडे होता. अमिताभ बच्चनच्या फ्लॉप चित्रपटात हा अग्रेसर आहे. तरीही एकवीस दिवस तो जवळपास रिकाम्या खुर्च्याना दाखवला जात होता. चित्रपट कितीही अपयशी ठरला तरी त्याला एकाच आठवड्यात बाहेरचा रस्ता दाखवला जात नसे. क्रिकेटच्या मैदानावर पब्लिक डिमांड षटकार ठोकणारा सलिम दुराणी चित्रपटाच्या पडद्यावर आला, धाडसी कथानकाचे दिग्दर्शक म्हणून ओळखले जात असलेल्या बी. आर. इशारा यांनी त्याला परवीन बाबीचा नायक करुन ‘चरित्र’ नावाचा चित्रपट पडद्यावर आणला तो पहिल्याच खेळाला रसिकांनी नाकारताच ड्रीमलॅण्ड चित्रपटगृहातून एकाच आठवड्यात गेला देखिल.

हे आज का सांगतोय, तर आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाने मल्टीप्लेक्समध्ये पन्नास दिवसांचा मुक्काम करून यशस्वी पुढचा प्रवास सुरु ठेवला आहे याची चक्क बातमी झाली. इतके दिवस तळ ठोकून बसलेला अलिकडच्या काळातील हा चित्रपट आहे. याचा विक्रम ‘बॉर्डर २’, ‘धुरंधर २’, ‘दृश्यम ३’, ‘रामायण’, ‘किंग’ यातील एखादा चित्रपट मोडतोय का पाहायचे. विक्रम हे मोडण्यासाठीच असतात आणि आपल्या देशातील चित्रपट रसिक संस्कृतीतील एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे एकदा का चित्रपट डोक्यावर आणि डोक्यात घेतला की तो पुन्हा एकदा पाहायचाच. अनेकांचं तरी असा चित्रपट एकदा पाहून समाधान होत नाही.
================================
================================
खरं तर आजच्या ग्लोबल युगातील कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये चित्रपटाचे यश तीन दिवसांत किती कोटी कमावले यांच्या आकड्यांच्या बातमीत दिसते. कधी कधी तर प्रत्यक्ष चित्रपटगृहात शुकशुकाट असतो आणि त्याचा फायदा घेणारे तेवढ्या जोड्या असतात इतकेच. तरीही अनेक चित्रपट हिट असतात. पूर्वी पिक्चर सुपरहिट झाला हे त्याच्या आगाऊ तिकीट विक्रीसाठी लागलेली लांबलचक रांग पाहून लक्षात येई. आठवड्यामागून आठवडे जात राहिले तरी मिनर्व्हा चित्रपटगृहावरील ‘शोले’साठीची, नाझ चित्रपटगृहावरची ‘हम किसीसे कम नहीं’ची रांग लागलेली दिसे. मिनर्व्हा चित्रपटगृहात ‘शोले’ने दिवसा तीन खेळ याप्रमाणे तीन वर्षे मुक्काम केल्यावर याच मिनर्व्हा चित्रपटगृहात मॅटीनी शोला ‘शोले’ शिफ्ट केला आणि आणखी दोन वर्षे असा मिळून पाच वर्षे मुक्काम केला आणि या गोष्टीचा मुद्रित माध्यमापासून डिजिटल मिडियापर्यत प्रवास सुरू आहे.

यशराज फिल्म्स निर्मित आणि आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेगे’ चा विक्रम अबाधित राहणार आहे. न्यू एक्सलसियर चित्रपटगृहात तो २० ऑक्टोबर १९९५ रोजी प्रदर्शित झाला आणि पहिल्याच खेळापासून सुपरहिट ठरला. तेथे पन्नास आठवड्याचा खणखणीत मुक्काम केल्यावर तो मराठा मंदिर चित्रपटगृहात मॅटीनी शोला प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून तो तेथेच आहे. डीडीएलजेच्या प्रत्येक खेळाला किमान पंधरा पंचवीस प्रेक्षक असतात. आता तो जेव्हा तेथून उतरवला जाईल तेव्हा यशराज फिल्म्सने करमणूक रिल पोस्ट करीत असलेल्या इन्फ्युएन्सरना मराठा मंदिर चित्रपटगृहावर बोलवावं. चित्रपटगृहात सर्वाधिक काळ मुक्काम केलेला चित्रपट पारंपरिक मनोरंजक हिंदी चित्रपट आहे हे जगभरातील अनेक भाषेतील चित्रपट रसिकांना माहिती करुन देणे आवश्यकही आहे. आपल्या देशातील चित्रपट संस्कृतीत एन्टरटेन्मेंट एन्टरटेन्मेंट एन्टरटेन्मेंट हे समिकरण महत्वाचे आहे. अतिशय घट्ट आहे.
‘धुरंधर’ने पन्नास दिवसांचा मुक्काम केला इतकं आज चित्रपटाचं यश अल्पायुषी ठरलंय. याचं कारण नवीन चित्रपट पहिल्याच शुक्रवारी देश विदेशातील अनेक मल्टीप्लेक्समध्ये एकाच वेळेस प्रदर्शित होत असल्याने एक प्रकारे भल्या मोठ्या जाळ्यात अधिकाधिक प्रेक्षकांना ओढले जाते आणि अनेकांचा तरी तो चित्रपट पाहून होतो. अर्थात त्या चित्रपटावर तोच प्रेक्षक सोशल मीडियात अधिकाधिक प्रमाणात व्यक्त व्हायला हवा. आजचा खरा समिक्षक सोशल मीडिया आहे. आणि म्हणूनच ‘धुरंधर’ची पन्नाशी सोशल मीडियात गाजतेय. चित्रपटाचे यशापयश कायमच रसिकांच्या हाती होते, आहे आणि यापुढेही कायम राहील.

काही असो. चित्रपट सुपर डुपर हिटचे पूर्वीचे दिवस आता येणे शक्य नाही. ते दिवसच वेगळे होते. साठच्या दशकात अशाच यशाने राजेंद्रकुमार ज्युबिली कुमार म्हणून ओळखला गेला. आणि अशाच ज्युबिली हिटने त्याच राजेंद्रकुमारने आपला मुलगा कुमार गौरवची कारकीर्द घडवण्यासाठी ‘तेरी कसम’ (१९८२) चीही ज्युबिली घडवली. पण फळली नाही. पब्लिकला समजतं हो खरे यश कोणते ते. त्यांना गृहित धरू नये.
================================
हे देखील वाचा : एकावन्न वर्षे झाली, ये Deewar तुटेगी नहीं…
================================
चित्रपट चालला की अनेक गोष्टी आपोआप चालतात. ‘धुरंधर’ पन्नास दिवस चालत असतानाच अक्षय खन्ना एकदम फॉर्मात आला. गुगलवर त्याचा पहिला चित्रपट पंकज पराशर दिग्दर्शित ‘हिमालय पुत्र’ पासून सर्चिग सुरू झाले. त्याच्यात आणि त्याचा पिता विनोद खन्नात साम्य शोधले जाऊ लागले. चित्रपटाच्या यशाने अनेक गोष्टींवर फोकस पडतो तो असा. चित्रपट पन्नास आठवड्याचा मुक्काम करो (राज कपूर निर्मित आणि दिग्दर्शित ‘राम तेरी गंगा मैली’ ने मिनर्व्हा चित्रपटगृहात पन्नास आठवड्याचा मुक्काम केला तोही व्हिडिओ कॅसेट युगात) अथवा पन्नास दिवस चालो (तेही मल्टीप्लेक्समध्ये एकाच वेळेस अनेक भाषेतील चित्रपट सुरू असताना), यश हे यश असते. ते आपलं अस्तित्व दाखवत असते.