…जेव्हा अभिनेता संजीव कुमारने Amitabh Bachchan पेक्षा जास्त मानधन घेतले

…जेव्हा अभिनेता संजीव कुमारने Amitabh Bachchan पेक्षा जास्त मानधन घेतले होते!
१९७६ साली अभिनेता संजीव कुमार आपल्या लंडनच्या दौर्यात एका संध्याकाळी मित्रा सोबत ड्रिंक्स घेत होता तेव्हा भारतातून निर्माते गुलशन रॉय यांचा त्यांना फोन आला. ते म्हणाले, “हरिभाई, आम्ही एक सिनेमा बनवत आहोत. सलीम जावेद यांची स्क्रिप्ट आहे. यश चोप्रा सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. या सिनेमातील एक महत्त्वपूर्ण भूमिका आम्ही तुम्हाला ऑफर करत आहोत. ही भूमिका अमिताभ बच्चन यांच्या वडिलांची आहे!” संजीवकुमार वयाने लहान असला तरी आपल्या वयापेक्षा मोठे आयुर्मान असलेले कॅरेक्टर लीलया रंगवत असत. (शोले तील ठाकूर हे ताजं उदाहरण!)
यामुळेच गुलशन रॉय यांनी अमिताभच्या वडलांची भूमिका ऑफर करणे यात काही गैर नव्हते. फोन वर उत्तर देताना संजीव कुमार म्हणाले,” ते ठीक आहे . पण माझी एक अट आहे. ”गुलशन राय यांनी विचारले, “कोणती अट?”. तेव्हा संजीव कुमार म्हणाले,”मी काम नक्की करेन पण या सिनेमात मी अमिताभ बच्चन यांच्या पेक्षा जास्त मानधन घेईन. आणि मानधन असेल तेरा लाख रुपये !” गुलशन राय एकदम अवाक झाले. तरी ते म्हणाले ,”हरी भाई तुम्ही भारतात या आपण एकदा बसून फायनल करूयात!” हि फोन वरील चर्चा संजीव कुमारचा मित्र ऐकत होता तो म्हणाला,” तेरा लाख रुपये? एवढे तर अमिताभ बच्चनला देखील मानधन मिळत नाही.” त्यावर संजीव कुमार यांचे म्हणणे असे होते,” बरोबर आहे. एक तारा आसमंतात चमकत असेल तर दुसऱ्या तार्याचे तेज कमी होत नसते. आज बॉलीवूडमध्ये चरित्र अभिनेता करणाऱ्या कलावंतांचा मी बाप आहे. त्यामुळे माझी मागणी बरोबरच आहे!”

संजीव कुमारला ठाऊक होते ही भूमिका आधी दिलीपकुमारला ऑफर झाली होती पण त्यांनी ती नाकारली होती. काही दिवसांनी मुंबईत गेल्यानंतर गुलशन राय यांच्यासोबत त्यांची भेट झाली आणि ‘त्रिशूल’ या चित्रपटातील आर के गुप्ताची भूमिका संजीव कुमार यांना मिळाली! या सिनेमासाठी संजीव कुमार यांना तब्बल तेरा लाख रुपये मिळाले होते तर अमिताभ बच्चन यांना फक्त साडेनऊ लाख रुपये मिळाले होते. खरं तर तो पर्यंत अमिताभ बच्चन यांचा ‘दिवार’, ‘शोले’ रिलीज झाले होते आणि सुपरस्टार पदावरती आरूढ देखील झाले होते. पण तरीही संजीव कुमार यांनी हट्टाने या सिनेमासाठी अमिताभ बच्चन यांच्या पेक्षा जास्त मानधन घेतले. याच काळात अमिताभ बच्चन सोबत ‘फरार’ आणि ‘इमान धरम’ या दोन चित्रपटात देखील संजीव कुमार यांच्या भूमिका होत्या. या दोन्ही सिनेमात संजीव कुमारला जास्त मानधन मिळाले होते.

‘त्रिशूल’ सिनेमाचे शूट पूर्ण झाले. याचा ट्रायल शो ठेवला गेला. या शोला दिलीपकुमार यांना देखील बोलावले होते. सिनेमा संपल्यावर कुणीच फारसे काही बोलले नाही. संजीव कुमार दिलीप कुमार ला म्हणाले “ हा सिनेमा काही चालणार नाही. बरं झालं तुम्ही हा सिनेमा सोडला!” पण यश चोप्रा यांनी पुन्हा सिनेमा व्यवस्थित एडिट करवून घेतला अमिताभ चे डॉन फाईट सीन टाकले. ५ मे १९७८ रोजी ‘त्रिशूल’ रिलीज झाला आणि डे वन पासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. हे वर्ष अमिताभ बच्चन च्या सुपरहिट सिनेमानचे वर्ष होते. या वर्षी त्याचे चार चित्रपट सुपरहिट झाले ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘कसमे वादे’, ‘डॉन’ आणि ‘त्रिशूल’ एकाच वर्षी एका अभिनेत्याचे एवढे सुपरहिट सिनेमे त्यामुळे अमिताभ बच्चन यांचे सुपरस्टार पद कन्फर्म झाले.
================================
हे देखील वाचा : Rajesh Khanna यांनी ‘आराधना’त काम करायला का नकार दिला होता?
================================
यानंतर संजीव कुमार सोबत अमिताभ बच्चन यांनी ‘खुद्दार’, ‘सिलसिला’, ‘काला पत्थर’ हे चित्रपट केले. आता मात्र संजीव कुमारच्या लक्षात आले की अमिताभचा लोकप्रियतेचा आणि सक्सेसचा झंझावात प्रचंड आहे. त्यामुळे त्यांना अमिताभ बच्चन कमी मानधन घेणे क्रम प्राप्त ठरले. ‘त्रिशूल’ या सिनेमाची कथा सलीम जावेद यांनी यापूर्वी अभिनेता राजेंद्र कुमार आणि जितेंद्र यांना देखील ऐकवली होती दोघांनाही ती कथा पसंत पडली होती आणि ते चित्रपट देखील त्यावर बनवणार होते पण काही कारणाने त्यांचा हा प्लॅन रद्द झाला आणि हे कथानक गुलशन रॉय यांच्याकडे आले!