“मला टोळी-काटा फरक पडत नाही, मी स्वत:साठी खेळणार”; Ruchita Jamdar

Khote Sikkay : हॉलीवूड ‘करी वेस्टर्न’ टाईप सिनेमाचा भारतीय अवतार!
सत्तरच्या दशकामध्ये किशोर कुमार यांच्या स्वराचा प्रचंड मोठा बोल वाला होता. प्रत्येक कलाकार किशोरचा प्लेबॅक घ्यायला उत्सुकच नाही तर आतुर होता. आयुष्यभर ज्यांनी केवळ रफी आणि मुकेश यांचा स्वर वापरला होता ते अभिनेते दिलीप कुमार(बैराग) आणि राजेंद्र कुमार(आप आये बहार आयी) यांनी देखील किशोर कुमारचा स्वर स्वतःसाठी वापरला होता. याच काळातील एका लोकप्रिय गाण्याच्या मेकिंगची गोष्ट आहे. या गाण्यात किशोर कुमारचा स्वर हवा म्हणून चित्रपटाचा नायक फिरोज खान निर्माता आणि दिग्दर्शकासोबत चक्क भांडला होता आणि जर किशोर कुमार यांनी हे गाणे गायले नाही तर मी चित्रपटातून बाहेर पडेल अशी धमकी देखील दिली होती. अखेर किशोर कुमारने ते ‘कालजयी’ गाणे गायले आणि चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. कोणता होता तो चित्रपट? कोणते होते ते गाणे? आणि काय होता नेमका किस्सा?
दिग्दर्शक नरेंद्र बेदी आपल्या दोन हिट चित्रपटानंतर तिसऱ्या चित्रपटाच्या तयारीत होते. त्यांचा पहिला चित्रपट ‘बंधन’ १९६९ साली प्रदर्शित झाला होता याचा नायक राजेश खन्ना होता यानंतर १९७२ साली त्यांचा ‘जवानी दिवानी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यात जया भादुरी आणि रणधीर कपूर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यानंतर ते आपल्या नव्या प्रोजेक्टच्या तयारीला लागले. या काळात हॉलीवूड मध्ये काऊ बॉय टाइप सिनेमाची चलती होती. खोटे सिक्के (१९७४) हा नरेंद्र बेदी दिग्दर्शित एक ब्लॉकबस्टर अॅक्शन-अॅडव्हेंचर चित्रपट होता , जो ‘सेव्हन सामुराई’ आणि ‘द मॅग्निफिसेंट सेव्हन’ या चित्रपटांपासून प्रेरित होऊन ‘करी वेस्टर्न’ हा पाश्चात्य चित्रपट प्रकार बॉलिवूडमध्ये आणण्यासाठी ओळखला जातो.

यात फिरोज खान यांनी ‘मॅन विथ नो नेम’ शैलीतील बंदूकधारी नायकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात आर.डी. बर्मन यांचे गाजलेले संगीत आणि ‘शोले’ चित्रपटाच्या आधीचे लोकप्रिय, थरारक अॅक्शन दृश्ये आहेत. पार्श्वभूमी संगीतामध्ये ‘फॉर अ फ्यू डॉलर्स मोअर’ या हॉलिवूड चित्रपटातील लोकप्रिय ट्यूनचा समावेश आहे.यात डॅनी डेन्झोंपा, रणजीत आणि सुधीर यांसारख्या लोकप्रिय खलनायकांनी खलनायकी नसलेल्या भूमिका साकारल्या आहेत. यातील फिरोज खान यांची व्यक्तीरेखा एक नाव नसलेली , काळा डगला घालणारी , सिगार ओढणारी, घोड्यावरून फिरणारी , काऊ बॉय टाइप बंदूकधारी व्यक्तीची होती हे थेट सर्जिओ लिओनच्या ‘डॉलर ट्रायोलॉजी’मधील क्लिंट ईस्टवुडच्या भूमिकेचे थेट भारतीय रूपांतर होते.
या सिनेमाचा नायक राजेश खन्ना असणार होता. राजेश खन्नाला चित्रपटाचे कथानक प्रचंड आवडले होते परंतु त्या काळात त्याच्याकडे अजिबात डेट्स नव्हत्या. तो प्रचंड बिझी कलावंत होता. हा १९७३ च्या सुरुवातीचा हा कालखंड होता. या काळात राजेश खन्ना रोटी, प्रेम नगर, हमशकल या चित्रपटाच्या चित्रीकरणात बिझी होता. खोटे सिक्के (१९७४) सिनेमाची कथानक फायनल झाल्यानंतर पुन्हा एकदा नरेंद्र बेदी राजेश खन्ना यांच्याकडे गेले परंतु राजेश खन्ना ने पुन्हा आपली डायरी त्याच्या समोर ठेवली आणि कमीत कमी एक वर्ष तरी थांबायला लागेल असे सांगितले. परंतु निर्माते कोठारी यांनी आपण राजेश खन्नाच्या ऐवजी दुसरा कलाकार घेऊ असे सांगितले. नरेंद्र बेदी यांनी आता फिरोज खान यांची या चित्रपटासाठी निवड केली. अर्थात फिरोज खान यांचा स्टारडम राजेश खन्ना एवढा नव्हता परंतु सफर, मेला आणि अपराध या चित्रपटानंतर त्याची लोकप्रियता प्रचंड वाढलेले होती.
या चित्रपटाची गाणी मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिली होती तर संगीत राहुल देव बर्मन यांचे होते. या सिनेमाच्या ट्युन्स आर डी बर्मन यांनी तयार केल्या आणि डमी स्वरात रेकॉर्ड देखील केल्या. हे डमी व्हर्जन ऐकल्यानंतर फिरोज खान प्रचंड खूष झाले. त्यांनी पंचमला विचारले हे गाणे माझ्यासाठी सिनेमात कोण गाणार आहे? त्यावर पंचमने सांगितले ‘किशोर कुमार’! त्या काळात आर डी बर्मन प्रचंड बिझी होते पण त्यापेक्षा जास्त किशोर कुमार बिझी होते. एकेका दिवशी ते कमीत कमी तीन ते चार कलावंतांसाठी चार-पाच गाणी गात होते त्या काळात गाणी गाताना गायक मंडळी त्या त्या कलावंताच्या व्यक्तिरेखेला आणि बॉडी लँग्वेज ला शोभेल अशा स्वरात गाणी रेकॉर्ड करत होते त्यामुळे किशोर कुमार यांना फार मोठी कसरत करावी लागायची कारण त्या काळातील प्रत्येक नायकाला किशोर कुमार यांचा स्वर हवा असायचा.

‘खोटे सिक्के’ या चित्रपटातील ‘जीवन सै कभी डरना नही’ या गाण्याची रेकॉर्डिंग मात्र काही ना काही कारणाने लांबत होते. तीन चार वेळा गाण्याच्या रेकॉर्डिंग पुढे ढकलले गेले. कारण किशोर कुमार प्रचंड बिझी होते. शेवटी निर्मात्याने आपण किशोरच्या ऐवजी दुसरा पार्श्वगायक वापरू असा सल्ला संगीतकार आणि दिग्दर्शकाला दिला. जेव्हा फिरोज खान ला ही बातमी कळाली तेव्हा तो प्रचंड चिडला आणि नरेंद्र मोदी यांना म्हणाला,” तुम्ही किशोर कुमारच्या ऐवजी हे गाणे दुसऱ्या कुठल्या गायका कडून कसे काय गाऊन घेऊ शकता? इथे जर राजेश खन्ना माझ्या ऐवजी कलाकार असता तर तुम्ही हा निर्णय घेऊ शकला असता का? आपण आणखी थोडा वेळ वाट पाहू आणि जर किशोर कुमार हे गाणे गाणार नसेल तर मी या चित्रपटातून बाहेर पडेल!” आता मात्र सर्वांची सटपटली!! नरेंद्र बेदी यांनी पंचम यांना पुन्हा एकदा किशोर कुमारला विनंती करायला सांगितले पंचम पुन्हा किशोर कुमार यांना भेटला त्याने लवकर गाणे रेकॉर्ड करू अशा आश्वासन दिले.
================================
हे देखील वाचा : अमिताभ आणि जया यांना हनिमूनहून तातडीने का परत यावे लागले?
================================
एका दिवशी संध्याकाळी किशोर कुमार यांचा पंचमला फोन आला आणि तो म्हणाला “उद्या सकाळी सात वाजता तुम्ही रेकॉर्डिंग ला येऊ शकता का? आपण तुमचे हे गाणे रेकॉर्ड करून टाकू!” किशोर कुमारने दुसऱ्या क्षणाला हो म्हटले आणि सकाळी सात वाजता आपल्या संपूर्ण टीमला घेऊन पंचम रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये हजर झाले. किशोर कुमारने आल्यानंतर एक कप चहा घेतला. गाण्याच्या कागदावर नजर फिरवली आणि खूष झाला आणि ते म्हणाले ,” पंचम, ये तेरा गाना हिट हो गया रे..’ तासाभरात रीहर्सल झाली नंतर गाणे रेकॉर्ड झाले. चित्रपटात हे गाणे तीनदा येते हे तिन्ही व्हर्जन किशोर कुमारने बॅक टू बॅक रेकॉर्ड केले. २० फेब्रुवारी १९७४ या दिवशी ‘खोटे सिक्की’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सुपर डुपर हिट झाला. त्यावर्षीचा टॉप टेन मध्ये हा पाचव्या क्रमांकावरचा चित्रपट होता.