
‘लाडकी विहीण योजना’ घेऊन NIrmiti Sawant माहेरी परतल्या!
शासनाच्या योजना जनतेसाठी असतात, मात्र ही योजना थेट प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत मराठी रसिकांसाठी घेऊन येत आहेत ‘लाडकी विहीण योजना’. हसवण्याची, मन हलकं करण्याची आणि रोजच्या ताणतणावापासून क्षणभर विरंगुळा देणारी खास मनोरंजन योजना. योजनेचा उद्देश एकच भरपूर हशा आणि खळखळून हास्यविनोद. अष्टविनायक आणि पंचशील एण्टरटेन्मेंट निर्मित ‘लाडकी विहीण योजना’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या नाटाकाचे लेखन प्रथमेश शिवलकर यांनी केले असून दिग्दर्शन राजेश देशपांडे यांचे आहे.
नावात ‘योजना’ असली तरी यात कुठलीही कागदपत्रं, अटी-शर्ती नाहीत; आहे फक्त खुसखुशीत विनोद, मिश्किल संवाद आणि मराठी माणसाच्या दैनंदिन आयुष्यातील गंमती-जमतींचं जिवंत चित्रण. कौटुंबिक वास्तवावर हलक्याफुलक्या शैलीत भाष्य करत ही योजना प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करणार आहे. ‘ही कोणतीही शासकीय योजना नाही; ही पूर्णपणे रसिकांसाठीची मनोरंजन योजना आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत कलाकारांनी हे स्पष्ट केलं.

‘प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं, तर तोच माझा खरा लाभ’ असं सांगताना, निर्मिती सावंत यांनी माहेरी परतल्याचा आनंद बोलून दाखविला. नाटक म्हणजे माझं माहेर. मधल्या काळात चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असताना नाटक करायला मिळत नव्हतं आता या नाटकाच्या निमित्ताने रंगभूमीवर परत काम करायला मिळतंय याचा आनंद आहे. कलाकार आणि तंत्रज्ञ यांची उत्तम भट्टी आणि मॅडनेस यामुळे ‘लाडकी विहीण योजना’ रसिकांना नक्कीच खुश करेल, असं अभिनेत्री निर्मिती सावंत म्हणाल्या.
हसत-खेळत मनोरंजनाचा अनुभव देण्याचं आश्वासन देणाऱ्या या नाटकाच्या शुभारंभाचे प्रयोग गुरु ५ मार्च दु. ४.०० वा. प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली, शुक्र ६ मार्च दु. ४. ०० वा. दीनानाथ नाट्यगृह, पार्ले शनि ७ मार्च दु. ४. ०० वा. यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा रवि ८ मार्च दु. १. ०० वा. यशवंतराव चव्हाण, कोथरूड येथे होणार आहेत.
================================
हे देखील वाचा : Big Boss Marathi 6 : टोळी आणि बाल्कनी ग्रुपने केलं प्रभूला टार्गेट!
================================
निर्मिती सावंत यांच्या सोबत स्नेहा रायकर, पुर्णिमा अहिरे-केंडे, अधोक्षज कऱ्हाडे, सुनील जाधव, मुकेश जाधव आदी कलाकार मंडळी यात आहेत. ‘लाडकी विहीण योजना’ नाटकाचे निर्माते दिलीप जाधव, प्रसाद ओक असून सहनिर्माते स्वप्नील जोशी, मंजिरी ओक, तृप्ती पाटील, संजय मेमाणे आहेत. नेपथ्य प्रदीप मुळ्ये तर संगीत अजित परब यांचे आहे. प्रकाश योजना सुनील जाधव यांनी केली असून गीते क्षितीज पटवर्धन यांनी लिहिली असून गायिका राधिका भिडे यांनी गाणी गायली आहेत.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi