Bigg Boss Marathi 6 मध्ये कॅप्टन्सी टास्कदरम्यान मोठा थरार; संकेतच्या

Grahan नावाच्या चित्रपटात नूतनचे नायक सुभाष घई
शीर्षक वाचताक्षणीच अनेकांच्या मनात आले असेल की, काही तरी चुकतेय अथवा होळीच्या दिवशी चंद्र ग्रहण आल्याने ‘बुरा न मानो होली है’ असं म्हणतच ही गंमत केली असावी. चित्रपटसृष्टीतील किडे मात्र म्हणत असतील, सुभाष घईने अभिनेता म्हणून या चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले, तेव्हाचा हा चित्रपट असावा आणि त्यात नूतन नायिका असणार. आजची जेन झी पिढीने एव्हाना गुगलवर सर्च करून असा काही चित्रपट पडद्यावर आला होता का हे पाहिलेही असेल आणि त्यांना त्याचे उत्तर ‘होय’ असेच मिळाले असेल.
१९७२ साली एम. प्रभात यांची पटकथा आणि दिग्दर्शन असलेला ‘ ग्रहण’ नावाचा चित्रपट खरोखरच पडद्यावर आला होता आणि त्यात नूतन, सुभाष घई, सुहासिनी मुळे, शशी पुरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाला वसंत देसाई यांचे संगीत आहे. आणि हा कृष्ण धवल अर्थात ब्लँक अॅण्ड व्हाईट चित्रपट आहे. एव्हाना हिंदी चित्रपट ९९ टक्के प्रमाणात रंगीत झाला होता आणि एकादा चित्रपट कृष्ण धवल असे. फिल्म फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडने या चित्रपटाला आर्थिक मदत केली.

वेगळ्या प्रवाहातील चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी हे आर्थिक नियोजन होते. सुभाष घईच्या दिग्दर्शनाचे चाहते अनेक आहेत. पण त्यानी अभिनेता म्हणून या चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि आत्माराम दिग्दर्शित ‘ उमंग ‘ या चित्रपटात भूमिका साकारत आपली वाटचाल सुरू केली. त्यानंतर काही चित्रपटांत भूमिका साकारली, त्यात ‘ ग्रहण’ या चित्रपटाचा समावेश होता. सत्तरच्या दशकात कदाचित दूरदर्शनवर रविवारी संध्याकाळी हा चित्रपट प्रक्षेपित झाला असेलही. यू ट्यूबवर हा चित्रपट उपलब्ध असून सुभाष घईच्या नसलात तरी नूतनच्या अभिनयासाठी एकदा पाहायला काय हरकत आहे?
गंमत अशी आहे ते बघा. अभिनेता म्हणून यश न मिळाल्याने सुभाष घईनी बी. बी. भल्लासोबत पटकथा लेखन सुरू केले आणि मग एन. एन. सिप्पी निर्मित ‘ कालीचरण ‘(१९७६) पासून चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण केले आणि त्याच यशस्वी वाटचालीत ‘ मेरी जंग ‘ (१९८५) मध्ये नूतनला महत्त्वाची भूमिका मिळाली. त्यानंतर ‘कर्मा’ (१९८६) मध्ये सुभाष घईच्या दिग्दर्शनात नूतनला दिलीपकुमारसोबत काम करण्याची संधी मिळाली….
================================
हे देखील वाचा : Indian Cinema : तेव्हा रंगलेले चित्रपट आता नक्कीच अळणी वाटतात…
================================
‘ग्रहण’च्या वेळचे नूतन आणि सुभाष घई व आता ‘मेरी जंग’ आणि ‘कर्मा’ च्या वेळचे ते दोघे यात केवढा तरी फरक पडला होता आणि तो विशेष कौतुकास्पद होता. तेव्हा सेटवर त्यांनी आपण तेरा, चौदा वर्षांपूर्वी ‘ग्रह ‘ नावाच्या चित्रपटात एकत्र काम केले होते यावर गप्पा मारल्या असतीलही. आता व्यावसायिक नातं बदललं होतं. आणखीन एकदा ‘ग्रहण’ नावाचा चित्रपट पडद्यावर आला. २००१ साली शशिलाल के. नायर दिग्दर्शित या ‘ ग्रहण ‘ चित्रपटात जॅकी श्रॉफ आणि मनिषा कोईराला यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मनिषा कोईराला चित्रीकरणासाठी सहजपणे तारखा देत नसे, तिचं सेटवर येणे जाणे अतिशय लहरी होते, अशा परिस्थितीत कसाबसा हे ‘ ग्रहण ‘ पडद्याला लागले. फर्स्ट शोलाच हा चित्रपट फ्लॉप ठरला. या चित्रपटात रघुवरम, प्रसाद पुरंदरे, अनंत जोग यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटासाठी तरी ‘ ग्रहण ‘ हे नाव लकी नक्कीच नाही. म्हणूनच ते असे क्वचितच ठेवले गेले असावे….