‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Dostana : ‘मेरे दोस्त किस्सा ये क्या हो गया…’हे गाणे दिग्दर्शकाने जुगाड करून कसे चित्रित केले?
भारतीय सिनेमाचे अल्फ्रेड हिचकॉक म्हणून त्यांची ओळख आहे त्या दिग्दर्शक राज खोसला यांची जन्मशताब्दी चालू आहे. राज खोसला यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केलेले आहे. सस्पेन्स चित्रपटांचे तर ते बादशहा होते. वो कौन थ मेरा साया आणि अनिता हे त्यांची ट्रायोलॉजी खूप गाजली. ‘सी आय डी’ , ‘सोलवा साल’, ‘काला पानी’, ‘मेरा गाव मेरा देश’, ‘दो बदन’ या सिनेमानी देखील प्रचंड लोकप्रिय हासील केली होती. १९८० साली त्यांचा दोस्ताना हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा त्यांचा शेवटचा लोकप्रिय चित्रपट म्हणता येईल. पुढची दहा वर्ष ते सिनेमे दिग्दर्शित करीत होते पण चित्रपट चांगले असून देखील त्याला त्यांच्या आधीच्या चित्रपटातील लोकप्रियता मिळत नव्हती.

‘दोस्ताना’ या चित्रपटात अमिताभ बच्चन, शत्रुघन सिन्हा, झीनत अमान , प्रेम चोप्रा अशी तगडी स्टार कास्ट होती. अमिताभ बच्चन तर त्यावेळेला सुपरस्टार होता. हा सिनेमा बनायला तब्बल तीन वर्षाचा कालावधी लागला. याचं कारण यातील सर्व लोकप्रिय कलावंतांच्या तारखा एकत्र मिळणे अवघड होते. सलीम जावेद यांनी या सिनेमाची कथा पटकथा आणि डायलॉग लिहिले होते. हा सिनेमा त्यातील जबरदस्त डायलॉगसाठी आज देखील आठवला जातो .याच्या डायलॉगची एक वेगळी एल पी त्याकाळी रिलीज केली होती.

या सिनेमाची गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली होती तर संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे होते. या सिनेमातील एका गाण्याच्या चित्रीकरणाचा किस्सा मोठा इंटरेस्टिंग आहे. अमिताभ बच्चन आणि शत्रुघन सिन्हा हे त्या काळात चार चित्रपटात एकत्र काम करत होते. शान,नसीब, काला पत्थर आणि दोस्ताना. या दोघांमध्ये व्यावसायिक स्पर्धा देखील प्रचंड होती. त्यामुळे या
दोघांना एकत्र घेवून काम करताना दिग्दर्शकाला खूप सावध असावे लागायचे. ‘दोस्ताना’ या सिनेमात देखील दोघांनी तंतोतंत स्क्रीन शेअर केला होता. या सिनेमात अमिताभ बच्चन वर चित्रित एक गाणं होतं ‘मेरे दोस्त किस्सा ये क्या हो गया सुना है कि तू बेवफा हो गया…’ मोहम्मद रफी यांनी हे गायलेलं गाणं अतिशय मेलडीयस बनले होते. चित्रपटातील एका सिच्युएशन मध्ये दोन मित्रांमध्ये बे बनाव झाल्यानंतर अमिताभ हे गाणे गातो असा प्रसंग होता.
================================
हे देखील वाचा: Mohammed Rafi : सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी गायले म.रफीसोबत गाणे!
=================================
चित्रपटाला आधीच उशीर झाल्यामुळे राज खोसला हे गाणं लवकर चित्रीत करू इच्छित होते. त्या पद्धतीने त्यांनी शूटिंगच्या डेट फायनल केल्या. पार्टी मध्ये हे गाणे असल्याने मोठा सेट उभा केला. अमिताभ बच्चन नेहमीप्रमाणे अगदी वेळेवर शूटला उपस्थित राहिले. झीनत अमान देखील उपस्थित होती. आता सर्वजण वाट पाहत होते शत्रुघन सिन्हाची. तो सेटवर उशिरा येण्यासाठी तसा खूप प्रसिद्ध होताच. त्या दिवशी त्याला खूपच उशीर होत होता. त्यामुळे सर्वजण अडकून पडले होते. काय करायचे? राज खोसला यांनी एक जुगाड केला. त्यांनी शत्रुघन सिन्हाला वगळून संपूर्ण गाण्याचे चित्रीकरण करून टाकले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा शत्रुघन सिन्हा आला तेव्हा पुन्हा त्याच्यावरचे शॉट चित्रित केले. नंतर एडिटिंग करून हे गाणे तयार झाले!

तो काळ आजच्यासारखा ऍडव्हान्स हाय एंड सॉफ्टवेअरचा नव्हता. हे दोन शॉट मिक्स करणे तसे खूप अवघड होते. पण एडिटिंग टीमने ते काम निलया पार पाडले. आज आपण जेव्हा हे गाणं पाहतो तेव्हा आपल्या लक्षात देखील येणार नाही की या गाण्याचे चित्रीकरणाच्या वेळी शत्रुघन सिन्हा उपस्थित नव्हता आणि नंतर त्याच्यावर जे शॉट पिक्चराईज करून एडिट केले गेले तेंव्हा अमिताभ नव्हता . राज खोसला यांनी विविध भारती आकाशवाणी ला दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. ८ ऑक्टोबर १९८० या दिवशी प्रदर्शित झालेला हा चित्रपट चांगलाच गाजला पण दुर्दैवाने शत्रुघन सिन्हा आणि अमिताभ बच्चन यांचा हा शेवटचा चित्रपट ठरला.
================================
हे देखील वाचा: अमिताभ बच्चन आणि Kamal Haasan यांचा हा सिनेमा अर्धवटच राहीला!
=================================
यानंतर या दोघांनी पुन्हा एकत्र कधीच काम केले नाही. झीनत अमान या सिनेमात प्रचंड ग्लॅमरच दिसली होती. खरं तर राज खोसला यांच्या सिनेमातील नायिका या नॉन ग्लॅमरस असतात. पण त्या काळातील झीनतची इमेज लक्षात घेता त्यांनी तिला इथे ग्लॅमरस लूक मध्ये पेश केले. झीनत अमान त्या काळात दोन हिरो असलेल्या सिनेमात हमखास दिसायची. ‘कुर्बानी’ या चित्रपटात ती विनोद खन्ना आणि फिरोज खान यांच्यासोबत दिसली. ‘बॉम्बे ४०५ मील’ या चित्रपटात ती शत्रुघन सिन्हा आणि विनोद खन्ना यांच्यासोबत दिसली. तर ‘दोस्ताना’ मध्ये अमिताभ आणि शत्रुघन सिन्हा यांच्यासोबत ती प्रेक्षकांना दिसली. या चित्रपटात अमरीश पुरी यांची देखील भूमिका आहे पण तो प्रेम चोप्राचा असिस्टंट दाखवला आहे काही वर्षातच त्याने मोठी झेप घेतली आणि 80 च्या दशकात तो आघाडीचा खलनायक बनला.