
Bigg Boss Marathi 6 च्या घरात अनुश्रीच्या अश्रूंचा बांध फुटला; वडिलांच्या आठवणीत झाली भावुक !
Bigg Boss Marathi 6 च्या घरात सध्या राखी सावंतच्या तुफान एन्ट्रीनंतर ड्रामा आणि टाकाऊ वादांची गडबड सुरु आहे. पण या रंगीत वादांमध्ये एक शांत, भावूक क्षणही पाहायला मिळाला. जे प्रेक्षकांना थक्क करणारे होते. घरात दिलेल्या एका टास्कने अभिनेत्री अनुश्री माने च्या (Anushri Mane ) मनातील एका खोल व दुःखद आठवणीला उघडून दिले आणि तिला कॅमेऱ्यासमोरच रडणे थांबवता आले नाही. बिग बॉसने काही दिवसांपूर्वी घरातील सदस्यांना जोड्यांमध्ये बांधण्याचा टास्क दिला होता. या साखळीच्या जोडीत अनुश्रीची जोडी राकेश दादा सोबत झाली. पण योगायोग असा की, त्या वेळी राकेशच्या प्रकृतीची अवस्था अत्यंत नाजूक होती. त्याला किडनी स्टोनचा त्रास होता आणि पायातही दुखत होते. साखळीने बांधलेली असल्याने जिथे राकेश जाईल, तिथे अनुश्रीलाही जावं लागत होतं.(Bigg Boss Marathi 6)

या साखळीच्या जोडीनेच अनुश्रीच्या मनातील वडिलांच्या आठवणी पुन्हा जाग्या केल्या. टास्क पूर्ण करताना राकेशच्या वेदनेतून अनुश्रीला स्वतःच्या वडिलांची आठवण येऊ लागली. ज्यांना ती नेहमीच आजारी अवस्थेत पाहायची.टोळीसोबत गप्पा मारताना अनुश्रीने आपल्या आयुष्यातील त्या काळाचा उल्लेख केला, ज्यावेळी तिच्या वडिलांची प्रकृती नेहमीच ढासळत असे. ती म्हणाली की, राकेशची अवस्था पाहून तिला असं वाटत होतं की ती पुन्हा आपल्या वडिलांच्या मागे फिरतेय आणि त्यांची काळजी घेत आहे.

तिच्या आठवणींचा भाग म्हणून ती एक प्रसंग सांगते. जो ऐकून प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी येतं. ती म्हणाली की, वडिलांच्या उपचारासाठी ती आणि तिची आई गावोगावी फिरायच्या. एकदा टाटा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी मुंबईला येताना ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होती. बसायला जागा नाही, प्रवासही कष्टदायी होता. तरीही तिने वडिलांना मांडीवर झोपवून त्यांना हलक्या हाताने थोपटत, ती संपूर्ण प्रवास पार केला. अनुश्री पुढे म्हणाली की, राकेशला त्रास होत असताना तिची तब्येतही थकलेली होती. पण वडिलांची आठवण तिला “नाही” म्हणण्याची परवानगी देत नव्हती. माणुसकी आणि प्रेमामुळे तिने तो त्रास सहन केला. (Bigg Boss Marathi 6)
===========================
हे ही वाचा: Bigg Boss Marathi 6 च्या घरात नवा रणसंग्राम; ‘टरमाळी’ म्हणत रुचिताचा राखीशी पंगा
===========================
अनुश्रीची ही कथा ऐकून घरातील रोशनदेखील भावूक झाला. त्याने अनुश्रीला सांत्वन करत एक अतिशय मोलाचा आणि अर्थपूर्ण वाक्य दिले, “बापाचं छत्र हरपलं की माणसाला काहीच सुचत नाही. बाप कसाही असला तरी चालेल, पण घरात बाप असायलाच हवा.” या वाक्याने घरातील वातावरण अधिक गंभीर आणि भावूक बनवले. घरात सध्या जिथे बाहेरून येणारा ड्रामा, टोमणे आणि वाद लोकांना मनोरंजन देत आहेत, तिथे अनुश्रीच्या या क्षणाने मानवी भावना आणि माणुसकीची आठवण करून दिली.एकूणच, बिग बॉस मराठी 6 मध्ये मनोरंजनाबरोबरच मानवी भावनांचा देखील एक वेगळाच प्रवाह आहे. राखी सावंतच्या एन्ट्रीनमुळे घरातली रंगत वाढली असली, तरी अनुश्रीचा हा भावनिक प्रसंग प्रेक्षकांना फार काळ स्मरणात राहणार आहे.