Dharmendra आपल्याच चित्रपटाच्या प्रीमियरला का गैरहजर का राहिले होते?

Dharmendra आपल्याच चित्रपटाच्या प्रीमियरला का गैरहजर का राहिले होते?
कलावंताचे आपल्या कलाकृतीवर अतोनात प्रेम असते! आणि या प्रेमा पोटी च कधीकधी त्याचं रूपांतर भीतीमध्ये देखील होत असते. ही कलाकृती सफल होते की नाही या कलाकृतीला लोक पसंत करतात की नाही याचे द्वंद्व मनात सुरू होते. अभिनेता धर्मेंद्र यांच्या बाबत एकदा असेच झाले होते. १९७४ साली प्रदर्शित झालेले एका चित्रपटाच्या प्रीमियर ला ते या भीतीमुळे चक्क गायब होते. कारण त्यांना असं वाटत होतं की हा चित्रपट १०० % फ्लॉप होणार. फ्लॉप च्या भीतीने धर्मेंद्र मुंबईतून गायब झाले होते. सिनेमाच्या प्रीमियरला मुख्य अभिनेताच अनुपस्थित. असा बाका प्रसंग निर्माण झाला होता. प्रीमियर झाला. दुसऱ्या दिवशी चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर चांगला बिझनेस केला! या चित्रपटाच्या अपयशाच्या काल्पनिक भीतीनंतर सिनेमा यशस्वी झाला ; या आनंदात धर्मेंद्र ने दिग्दर्शकाला जे गिफ्ट दिलं ते जबरदस्त होते. कोणता होता चित्रपट आणि काय होतं तो नेमका किस्सा?
१९७४ साली निर्माता प्रेमजी आणि दिग्दर्शक दुलाल गुहा यांनी धर्मेंद्र, हेमामालिनी आणि शत्रुघ्न सिन्हा यांना घेऊन ‘दोस्त’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटाचे कथानक तत्कालीन सिनेमाच्या ट्रेंड च्या अगदी विरुद्ध होते. एका समांतर किंवा कलात्मक चित्रपटाला शोभावे असा या सिनेमाचा प्लॉट होता. यात धर्मेंद्र एक प्रामाणिक /इमानदार आणि दिलदार इंसान दाखवला होता. एकदा रेल्वेत त्याच्या सामानाची चोरी होते. लोक चोराला पकडतात पण धर्मेंद्र त्याला पोलीसांच्या हवाली करण्याच्या ऐवजी आपल्या घरी घेऊन जातो आणि त्याच्यात सुधारणा करण्याचा प्रयोग सुरू करतो! या दोघांमध्ये काही नोक झोक झाल्यानंतर दोस्ती निर्माण होते आणि माणसातील चांगुलपणाला जर अपील केलं तर त्यात बदल घडू शकतात हा युक्तिवाद वापरत दिग्दर्शकाने हा चित्रपट मस्त खुलवला होता.

थोड्याफार प्रमाणात काही वर्षांपूर्वी आलेल्या राजेश खन्नाच्या ‘दुष्मन’ चा देखील असाच प्लॉट होता.( ‘दुष्मन’ चे दिग्दर्शक दुलाल गुहा च होते! ) पण चित्रपट निर्मितीच्या काळामध्ये धर्मेंद्र ला हा चित्रपट फ्लॉप होईल असेच वाटत होते. सिनेमा हिट होईल असे कोणतेही मटेरियल या सिनेमा मध्ये नाही असे त्याला वाटत होते. खरं तर साठच्या दशकातील लाजाळू सॉफ्ट रोमँटिक हिरो असलेला धर्मेंद्र सत्तरच्या दशकात सर्वार्थाने बदलला होता. ‘मेरा गाव मेरा देश’, ‘सीता और गीता’, ‘जुगनू’ हे त्याचे नव्या जॉनर चे चित्रपट बॉक्स ऑफिस वर प्रचंड बिजनेस करत होते. या काळात ‘दोस्त’ सारखा चित्रपट येणार होता आणि हा सिनेमा प्रेक्षकांना अपील होणार नाही असा कॉम्प्लेक्स धर्मेंद्रच्या मनात तयार झाला होता. त्यामुळेच जेव्हा १२ एप्रिल १९७४ या दिवशी या चित्रपट प्रदर्शित होणार होता त्याच्या आदल्या दिवशी च्या प्रीमियर ला धर्मेंद्र गायब झाला होता.
================================
हे देखील वाचा: ….. आणि Yash Chopra यांच्या आग्रहाने जावेद अख्तर गीतकार बनले!
=================================
धर्मेंद्र चा सगळी कडे शोध सुरू झाला; तेव्हा असे कळाले की तो त्याच्या मूळ गावी पंजाबला गेला आहे आणि तिथून तो काश्मीरला एका चित्रपटाच्या शूटिंग ला जाणार आहे. काश्मीर मधील शूटिंग आटोपल्यानंतर तो तडक ‘शोले’ च्या चित्रीकरणा साठी बेंगलोरला जाणार होता. या सगळ्या प्रकारात दोन-चार आठवड्याचा कालावधी जाणार होता. धर्मेंद्र मी विचार केला तोवर ‘दोस्त’ या सिनेमाचे अपयश लोक विसरले जातील आणि आपण पुन्हा मुंबईत जाऊत. पण झाले उलटेच. धर्मेंद्र ‘दोस्त’ या सिनेमाच्या बॉक्स ऑफिस बाबत काश्मीर मध्ये देखील विचार करत होता. जेव्हा त्याच्याकडे रिपोर्ट गेले की चित्रपट चांगला बिझनेस करतो आहे दिल्ली पंजाब या सेक्टर मध्ये देखील या सिनेमाने चांगली उचल घेतली आहे असं कळल्यानंतर धर्मेंद्र खूष झाला आणि तो बेंगलोरला जायच्या आधी मुंबई मध्ये आला!
मुंबईत सर्वत्र त्याला ‘दोस्त’ या सिनेमाचे मोठ मोठे पोस्टर्स दिसले आणि सिनेमा चांगला बिझनेस करतो आहे असे त्याच्या लक्षात आले. तो तडक चित्रपटाचे दिग्दर्शक दुलाल गुहा यांच्या घरी गेला आणि चित्रपटाच्या प्रीमियर ला न सांगता अनुपस्थित राहिल्याबद्दल माफी मागितली. तिथूनच त्याने चित्रपटाचे निर्माते प्रेमजी यांना देखील फोन करून त्यांचे आभार मानले आणि त्यांचे अभिनंदन देखील केले. आपल्या घरी मुंबईला देखील त्याने फोन केला. पंजाबी मध्ये त्यांचे काही बोलणे झाले. थोड्या वेळातच धर्मेंद्र चा भाऊ अजित सिंग देओल एक बॅग घेऊन तेथे दुलाल गुहा याच्या घरी आला. धर्मेंद्रने ती बॅग दुलाल गुहा यांना दिली. त्या बॅगेत पन्नास हजार रुपये होते.

दुलाल गुहा यांनी विचारले “हा काय प्रकार आहे?” तेव्हा धर्मेंद्र यांनी सांगितले की,” आम्ही एक चित्रपट निर्माण करत आहोत. त्या चित्रपटाचे दिग्दर्शन तुम्हाला करायचे आहे. त्याची ही सायनिंग अमाऊंट आहे.” हा चित्रपट होता १९७५ साली प्रदर्शित झालेला ‘प्रतिज्ञा’. या चित्रपटाचे दिग्दर्शन दुलाल गुहा यांनी केलं होतं आणि हा सिनेमा ‘शोले’ च्या झंझवातात सुपरहिट झाला होता. मध्यंतरी धर्मेंद्र ने मध्ये एका मुलाखतीत सांगितले होते त्याचा आवडता सिनेमा ‘शोले’ नसून ‘प्रतिज्ञा’ आहे. या ‘प्रतिज्ञा’ मध्ये त्याने ‘मै जट यमला पगला दिवाना’ या गाण्यावर जो बेफाम डान्स केला होता तो त्याचा सिग्नेचर डान्स ठरला. पुढे यमला पगला दिवाना या नावाचे त्याने दोन-तीन सिनेमे देखील आले. धर्मेंद्र २४ नोव्हेंबर २०२५ रोजी गेला. जर आणखी दोन आठवडे जगला असता तर ९० वर्षाचा झाला असता! पण असे होणे नव्हते. धर्मेंद्रच्या ‘दोस्त’ या कल्ट क्लासिक सिनेमाने ‘प्रतिज्ञा’ हा चित्रपट बनला हे देखील विसरता येणार नाही. या ‘दोस्त’ चित्रपटात अमिताभ बच्चन याचा एक कॅमिओ रोल देखील होता.