
महानायक Dilip Kumar आणि गीतकार आनंद बक्षी यांच्या मैत्रीचा भावस्पर्शी किस्सा
गीतकार आनंद बक्षी यांनी भारतीय चित्रपट संगीतामध्ये अतिशय दर्जेदार असे गीतलेखन केलेले आहे. ‘चिंगारी कोई भडके तो सावन..’ सारखं कालजयी गाणं असो किंवा ‘दम मारो दम मिट जाये गम’ सारखे तरुणाई ला खूष करणारे गीत असो , ‘तुझे देखा तो ये जाना सनम’ सारखं नव्या पिढीला कॅच करणारे गाणे असो .. आनंद बक्षी यांनी कायम अप्रतिम असं गीत लेखन केलं. त्यांच्या 41 गाण्यांना फिल्मफेअर चे नॉमिनेशन मिळाले होते त्यापैकी चार गीतां ना फिल्मफेअर चा पुरस्कार देखील मिळाला. आता पाकिस्तान मध्ये असलेल्या रावळपिंडी येथे २१ जुलै १९३० रोजी त्यांचा जन्म झाला. इतकी अप्रतिम गाणी लिहिणारे आनंद बक्षी यांनी सुरुवातीच्या काळात लष्करात चाकरी केली होती हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण त्यांच्यातील कवी त्यांना स्वस्थ बसू डेट नव्हता.
लष्करातील नोकरी सोडून ते मुंबईत आले गीतकार बनण्यासाठी! सुरुवातीला काही वर्ष त्यांना खूप स्ट्रगल करावा लागेल पण 1965 सालच्या ‘जब जब फूल खिले’ या चित्रपटापासून त्यांचा भाग्योदय झाला. तिथून पुढे त्यांना कधीच मागे वळून पहावे लागले नाही. सत्तर आणि ऐंशी च्या दशकातील तर ते नंबर वन चे गीतकार होते. ‘जब जब फूल खिले’ या चित्रपटाने जेंव्हा सुवर्ण महोत्सव साजरा केला ; तेंव्हा या चित्रपटाचे यश सेलिब्रेट करण्यासाठी मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये एक मोठा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमाला महानायक दिलीप कुमार उपस्थित होते. व्यासपीठावर चित्रपटाशी निगडित सर्व कलावंतांना सन्मानाने बोलावण्यात आले. प्रत्येकाला बुके देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला पण या कार्यक्रमात आनंद बक्षी यांच्याकडे कोणाचं लक्ष नव्हतं ते नवीन असल्यामुळे त्यांना फारसं ओळखत देखील नव्हतं.

जेव्हा स्टेजवरून दिलीप कुमार यांनी आनंद बक्षी यांच्याकडे पाहिलं आणि ते प्रेक्षकांमध्ये बसलेले आहेत हे कळल्यानंतर ते स्टेजवरून स्वत: खाली आले आणि आनंद बक्षी यांच्याकडे गेले आणि म्हणाले,” तुम्ही आनंद बक्षी आहात ना? या चित्रपटाची गाणी तुम्ही लिहिली आहेत ना? मग तुम्हाला बुके मिळायला पाहिजे!” त्या वेळेला आनंद बक्षी खिन्न पण पण हसून म्हणाले,” हो, मिळायला पाहिजे. पण कदाचित बुके संपले असतील.” दिलीप कुमार यांना ते खूप आश्चर्यचकित करणारे वाटले. त्यांनी आनंद बक्षी यांचा हात धरून स्टेजवर आणलं आणि आनंद बक्षी यांना आपल्या हातात बुके दिला. आनंद बक्षी यांच्यासाठी हा फार मोठा सन्मान होता. दिलीप कुमार यांची खरं त्यापूर्वी बक्षी यांच्याशी कधी भेट देखील झाली नव्हती पण दिलीप कुमार यांनी त्यांच्यातील टॅलेंट ओळखलं होतं. आणि त्यांचा योग्य तो सन्मान त्यांनी केला होता. तिथून पुढे दिलीप कुमार आणि आनंद बक्षी यांची चांगली मैत्री झाली. ते दोघेही पंजाब पाकिस्तान मधून आलेले असल्यामुळे ते दोघे परस्परांशी उर्दूमध्ये बोलत. त्यातही पाकिस्तानातील पंजाब प्रांतात बोलली जाणारी उर्दू असायची.

पुढे खूप वर्षांनी २००२ साली जेव्हा आनंद बक्षी आजारी होते त्यांना बेडवरून उठता येत नव्हते त्यावेळेला दिलीप कुमार ला भेटायला घरी आले होते. आपल्या मित्राला दारात पाहून आनंद पक्षी यांना खूप आनंद झाला. परंतु ते इतके अशक्त झाले होते की त्यांना बेडवरून उठता देखील येत नव्हते. दिलीपकमार आनंद बक्षी यांना म्हणाले,” आर लाले , तेनू क्या हो गया?” आपल्या मित्रा ला बेड वर उठता येत नाही हे पाहून ते म्हणाले,” मेरे यार , तुला माझ्या जवळ येतं नाही तर मीच तुझ्या जवळ येतो.” लगेच ते बेडवर त्यांना भेटायला त्यांच्या शेजारीच ते जावून बसले. आणि त्यांना थोपटले. दोघे मित्र खूप वेळ गप्पा मारत होते. दिलीप कुमार आनंद बक्षी यांना थोपटत होते. हे सर्व दृश्य आनंद बक्षी यांची चिरंजीव राकेश बक्षी पाहात होते.
================================
हे देखील वाचा : Manoj Kumar : माला सिन्हा यांनी मनोज कुमार यांचा पाणउतारा केला होता.
=================================
आनंद बक्षी आणि दिलीप कुमार यांनी बेडवरच भरपूर गप्पा मारल्या दिलीप कुमार यांनी त्यांना लवकर बर होण्याच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी घेऊन गेले आनंद बक्षी यानंतर फार काळ जगले नाहीत ३० मार्च २००२ रोजी वयाच्या ७१ व्या वर्षी आनंद बक्षी यांचे निधन झाले. पण दिलीप कुमार यांच्यासोबत ची त्यांची भेट त्यांना खूप आनंद देणारे ठरली. आनंद बक्षी यांना कायम ही सल राहिली की आपण दिलीप कुमारच्या चित्रपटासाठी गाणी लिहू शकलो नाही. दिलीप कुमार साठी बक्षी यांनी नक्कीच काही गाणी लिहिली पण तो दिलीप कुमारचा गोल्डन इरा नव्हता. ‘बैराग’, ‘विधाता’, ‘कर्मा’, ‘सौदागर’, ‘शक्ती’ या सिनेमासाठी आनंद बक्षी यांनी गाणी लिहिली होती! हा प्रसंग राकेश बक्षी यांनी त्यांच्या वडिलांवरील पुस्तकात विस्ताराने लिहिला आहे.