
Bollywood : एका चित्रपटाचे दोन भाग, हा तर नवीन ट्रेंड
सिनेमाचे व्यसनी एक गोष्ट नक्कीच मान्य करतील, आज ‘हम आपके है कौन’ (१९९४) पडद्यावर आला असता तर तो एकाच वेळी दोन भागांत निर्माण झाला असता. एवढ्यावरच ही लांबी थांबली नसती तर, पहिला भाग दोन मध्यांतरांसह चार तासांचा भव्य दिव्य दिमाखदार कलरफुल चित्रपट आणि दुसरा भागही असाच पारंपरिक मसालेदार मनोरंजक असा चित्रपट असला असता. दोन्हीत गीत, संगीत, नृत्याची बहारदार फोडणी, मेजवानीही असतीच. एक लक्षात घ्या, एका चित्रपटाचे दोन भाग हा फॉर्म्युला वेगळा आणि सिक्वेल वेगळा. अनेक सिक्वेल हे त्या चित्रपटाच्या नावापुरते असतात….गोष्ट पुढे जात नाही.

आता तुम्ही म्हणाल १९९४च्या ‘हम आपके….’ या चित्रपटाची आताच आठवण का आली? कारण आता चित्रपट निर्माण करत असतानाच तो दोन भागांत करायचा असा एक फोकस वा ट्रेण्ड स्पष्ट होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. निमित्त अर्थातच आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’चे अक्राळविक्राळ मुसळधार वादळी यश. तुम्हालाही माहित आहे ‘धुरंधर’ प्रदर्शित होत असतानाच त्याचा दुसरा भागही २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे हे सांगितले गेले. आणि आपला माईंड मॅप स्पष्ट झाला की, हा पहिला चित्रपट येथेच संपणार नाही. त्यातही साडेतीन तासांचा पहिला ‘धुरंधर’ आपण एन्जॉय केला. आता दुसरा भागही असाच साडेतीन तासांचा रोमांचक अनुभव देणार. माईड सेट तयार. अर्थात, या चित्रपटावर काहींनी आक्षेप घेतला, हा अति हिंसाचारी चित्रपट आहे असेही म्हटले. म्हणून त्याची लोकप्रियता अजिबात कमी झाली नाही. आपल्या देशातील चित्रपट रसिक संस्कृतीतील एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट एकदा का चित्रपट डोक्यावर आणि डोक्यात घेतलाच की सगळे लक्ष पडद्यावर केंद्रीत करावे.

‘धुरंधर’ प्रमाणेच आता सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘किंग’ (शाहरुख खान, दीपिका पादुकोण, सुहाना खान) आणि संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘लव्ह ॲण्ड वॉर’ (रणबीर कपूर, आलिया भट्ट, अर्शद वारसी, विकी कौशल) हे चित्रपटही असेच एका चित्रपटाचे दोन भाग अशा स्वरूपात प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत अशी चर्चा रंगली आहे. असे अगदी ऐसपैस मांडणी करण्याजोगे कथासूत्र त्या चित्रपटात असावं आणि सतत टर्न आणि ट्विस्ट असणारी पटकथा असावी, तशी डायलॉगबाजी असावी अशी अपेक्षा आहे. अर्थात, ही दोन चित्रपटाची खेळी कशी आणि कितपत यशस्वी ठरते हे रसिक प्रेक्षकांच्या आवडीनिवडीवर अवलंबून आहे. पण व्यावसायिक चित्रपटाच्या प्रयोग शाळेत धाडसी पाऊल उचलले जाते. समजा, मल्टीप्लेक्समध्ये या चित्रपटांना फारसं यश प्राप्त झाले नाही तर, ओटीटीचा पर्याय आहेच. चित्रपटाच्या जगातील व्यावसायिक शिस्त ही अनेक पर्याय उपलब्ध आहेत याकडे लक्ष ठेवून असते.
================================
================================
एकाच चित्रपटाचे दोन भाग हा पहिला प्रयोग अनुराग कश्यपने ‘गॅंग्स ऑफ वासेपूर’ (मनोज वाजपेयी, नवाजुद्दीन सिद्दीकी, रिचा चढ्ढा, हुमा कुरेशी) या चित्रपटाच्यावेळी केला हे सर्वानाच ठाऊक आहे. आपल्या कथासूत्रला अतिशय सविस्तर, छोट्या छोट्या तपशीलवारपणे आणि अनेक व्यक्तीरेखांना भरपूर वाव देत मांडावे असा त्यामागचा दृष्टीकोन होता. अनुराग कश्यप हा एक अतिशय वेगळा, फोकस्ड आणि धाडसी दिग्दर्शक. तो एकही दृश्य वा संवाद वाया जाऊ देणार नाही. त्याचं व्हीजन एकदम स्पष्ट असतं. अर्थात, अशा पध्दतीने आपला हा चित्रपट दोन भागांत आहे हे सुरुवातीलाच सांगताना प्रेक्षकांवरही विश्वास दाखवावा लागतो आणि त्यांना आपण गुंतवून ठेवण्यात यशस्वी ठरु असा स्वतःवरही विश्वास असावा लागतो. चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे हे असे चित्रपट अधोरेखित करतात. त्यात दिग्दर्शकाची चित्रपट माध्यमावरील ताकदही दिसते. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज जर ‘हम आपके है कौन’ निर्माण करायचा झाल्यास तो सुरजकुमार बडजात्या यांनीच दिग्दर्शित केल्यास अतिशय उत्तम. कारण ३२ वर्षांपूर्वी त्यांनाच ‘श्रीमंत कुटुंबातील लग्न सोहळे’ हा एका चित्रपटाचा विषय असू शकतो हे पटलं आणि त्यांनी ते यशस्वी करुन दाखवलं. काहींनी हा चित्रपट म्हणजे लग्नाची व्हिडिओ कॅसेट म्हटलं हा भाग वेगळाच.

मला आजही आठवतंय, मुंबईतील आम्हा चित्रपट समीक्षकाना हा चित्रपट लिबर्टी या चित्रपटगृहात रसिक प्रेक्षकांसह दाखवला. तेव्हा एक तर या चित्रपटाला दोन मध्यांतर होते. (म्हणून दोनदा समोसा पॉपकॉर्न आणि शीतपेये घेतलं असं अजिबात नाही) चारच दिवसांत एका गाण्यासह काही दृश्ये कमी करुन तो एका मध्यांतराचा करण्यात आला (चित्रपटसृष्टीच्या साप्ताहिक ट्रेड पेपर्सनी हे वृत्त आवर्जून दिलं). हा चित्रपट किती आणि कसा अफाट लोकप्रिय ठरला हे वेगळे सांगायला नकोच. त्या यशाचा सुपिक परिणाम प्रत्यक्षातील लग्न सोहळ्यावर पडला आणि ती अधिकाधिक रंगतदार, देखणी, सुशोभित होवू लागली. आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट, त्या काळात तर एखाद्या लग्न सोहळ्यात एखादी युवती माधुरी दीक्षितच्या ओपन बॅक चोळीसारख्या वस्त्रात दिसू लागली. चित्रपटाच्या यशाचा परिणाम हा असा मुरत जातो.

लग्न सोहळ्यावरचा चित्रपट ही २०२६ सालची गोष्ट चित्रपटात कशी असेल वा दिसेल? जर प्रेम विवाह असेल तर त्या दोघांच्या पहिल्या भेटीतील गाण्याने चित्रपट सुरु होतील, नियोजित लग्न असेल तर एखाद्या हॉटेलमध्ये दोन्हीकडची मंडळी एकत्र आली आहेत आणि त्याच वेळी त्या हॉटेलमध्ये एखादा वाद्यवृंद एक गाणे सादर करीत आहे. (चित्रपटाच्या पहिल्या दृश्यापासून ते थेट शेवटच्या दृश्यापर्यत अर्थात क्लायमॅक्सपर्यत गीत संगीत नृत्याची बहारदार मेजवानी असणारच) लग्नाच्या मुहूर्तापासून नवदाम्पत्य हनिमूनला जाईपर्यंत मुख्य कथानक, उपकथानक, पोटकथानक, प्रमुख भूमिकेतील कलाकार, सहाय्यक भूमिकेतील कलाकार, छोट्या छोट्या भूमिका साकारणारे कलाकार, एखादं आयटम सॉंग, चित्रपट गीतांच्या भेंड्या खेळतानाचे भले मोठे गीत संगीत नृत्य (अनेक जुनी गाणी दाखवायची सोनेरी रुपेरी संधी), वराचे आगमन, त्यात बेभान बेफाम नाचकाम, लग्न सोहळ्यात भरगच्च नृत्यकाम.
================================
हे देखील वाचा : B Merwan चे सिनेमावाल्याशी नाते….
================================
आणि जर का हे लग्न आंतरजातीय असेल तर…. लावणी, गरबा, भांगडा वगैरे वगैरे प्रादेशिक नृत्याची मेजवानी असेल), लग्नातील रुसवे फुगवे, राग लोभ, भेटीगाठी, वयात आलेल्या युवक युवतीसाठी चाचपणी, एकाच लग्नात बहुरंगी बहुढंगी गोष्टी घडतात, कोणाचं श्रीमंतीचे दर्शन प्रदर्शन, तर कुठे माणुसकी, चांगुलपणाच्या गोष्टी. पिक्चर एकदम भारी नि भन्नाट होईल हो. त्यातच आजचं टेक्नोसॅव्ही जग, त्याचेही याच खानदानी लग्नात दर्शन. आज पुन्हा एकदा ‘हम आपके है कौन’ पडद्यावर यावा. एका चित्रपटाचे दोन भाग पाहायला नक्कीच आवडतील. चार तासांचा ‘ॲनिमल’ सुपरहिट ठरलाय, याचाच अर्थ एवढा मोठा चित्रपट पाहायची रसिकांची तयारी नक्कीच आहे….. प्रश्न एकच, पुन्हा एकदा ‘हम आपके है कौन’ बनलाच (तोही लांबलचक) तर त्यात माधुरी दीक्षित कोण?
