Akshay Kumar लवकरच ५०० कोटींचा रेकॉर्ड करणाऱ्या दिग्दर्शकासोबत हातमिळवणी करणार?

Jaya Bachchan : ‘स्थळ’ चं कौतुक करत जया बच्चन म्हणाल्या, “असे चित्रपट….”
४८व्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट आशिया पॅसिफिक चित्रपटासाठीचा NETPAC (Network For The Promotion of Asian Cinema) हा पुरस्कार जिंकणारा ‘स्थळ’(Sthal Movie) चित्रपट ७ मार्च २०२५ रोजी प्रदर्शित झाला. सचिन पिळगांवकर यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी कौतुक केले आहे. “हा खरा चित्रपट आहे” असं म्हणत त्यांनी सचिन पिळगांवकर आणि मराठी चित्रपटाचं कौतुक केलं आहे.
‘स्थळ’ चित्रपटाच्या विशेष स्क्रिनिंगला मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी देखील आवर्जून उपस्थित राहून चित्रपट पाहिला. आपलं मनोगत व्यक्त करताना जया बच्चन म्हणाल्या की, “सचिन, तुम्ही मला बोलावलंत यासाठी मी तुमचे आभार मानते. काही कलात्मक कामं असतात, ज्याबाबतीत बोललं जात नाही. पण, असे चित्रपट तयार केले पाहिजे. समाजासाठी खूप महत्त्वाचं आहे. अजून काही बोलायचं झालं तर हा खरा चित्रपट. मला खूप आवडला. या चित्रपटासाठी ईश्वर चरणी प्रार्थना. खूप साऱ्या शुभेच्छा.” (Marathi movie)
===============================
हे देखील वाचा : Sthal Movie Review : अरेंज मॅरेजची वैचारिक गोष्ट!
===============================
विदर्भातील एका महत्वाकांक्षी मुलीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट सांगणाऱ्या स्थळ चित्रपटाचं दिग्दर्शन जयंत दिगंबर सोमलकर यांनी केलं आहे. तर या चित्रपटात नंदिनी चिकटे, तारानाथ खिरटकर, संगीता सोनेकर, सुयोग ढवस, संदीप सोमलकर, संदीप पारखी, स्वाती उलमले, गौरी बदकी, मानसी पवार या नव्या दमाच्या कलाकारांनी खूप चांगलं काम केलं आहे. महत्वाचं म्हणजे चित्रपटातील एकाही कलाकाराने यापूर्वी कधीच कॅमेऱ्यासमोर काम केलं नाही आहे. मात्र, प्रत्येक कलाकाराने उत्कृष्ट भूमिका साकारून कथेला पुर्ण न्याय दिला आहे. (Marathi films update)

काय आहे कथानक….?
तर ‘स्थळ’ या चित्रपटाची कथा घडते विदर्भात. सविता जिचं स्वप्न लग्न करुन संसार थाटायचं नव्हे तर MPSC करुन सरकारी नोकरी करण्याचं असतं. मात्र,आई-वडिलांच्या इच्छेखातर तिला एकामागून एक येणारी स्थळं पाहावी लागतात आणि त्यांच्याकडून येणारा नकारही पचवून घ्यावा लागतो. तिचं लग्न जमत नाहीये याचा तिला जरी आनंद असला तरी त्यामुळे तिच्या करिअरवर होणारा दुष्परिणाम आणि आई वडिलांना होणारा त्रास या सगळ्यात सविताची मात्र गळचेपी होत असते. लग्न जमत नसल्यामुळे सविताच्या कुटुंबाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोनही बदलत जातो. शिवाय कथेतून स्त्री सशक्तीकरण, बेरोजगारी, प्रथा-परंपरा या मुद्द्यांवरही समांतर भाष्य करत ग्रामीण भागातील अरेंज मॅरेजची कथा पाहायला मिळते.