‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Rabindranath Tagore : गुरुदेव टागोरांच्या अभिजात साहित्यकृतीवरील ‘काबुलीवाला’ चित्रपट
अभिजात साहित्याची मोहिनी पिढ्यान पिढ्यांवर पडलेली असते. १८९२ साली गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी ‘काबुलीवाला ‘ नावाची एक लघु कथा लिहिली. या कथेवर तपन सिन्हा यांनी १९५७ साली एक अप्रतिम बंगाली भाषेत चित्रपट निर्माण केला. याच कथेचा आधार घेत बिमल रॉय यांनी १९६१ साली एक हिंदी चित्रपट बनवला आणि आता दिग्दर्शक सुमन घोष , मिथुन चक्रवर्ती ला घेऊन याच कथानकावर बंगाली चित्रपट बनवत आहेत. शंभर सव्वाशे वर्ष जरी झाली असली तरी या काबुलीवाल्याची मोहिनी अद्यापही समाज मना वर कायम आहे. गुरुदेव टागोरांच्या ‘काबुलीवाला’ या कथानकावर हे तीनही चित्रपट आहेत.

या कथेचा बंगाली साहित्यावर खूप मोठा प्रभाव आहे. ही कथा शालेय पाठ्य पुस्तकात देखील आहे. बंगाली ‘काबुलीवाला’ या चित्रपटाला १९५७ सालचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता. आज याच ‘काबुलीवाला’ अभिजात साहित्यकृतीवरील चित्रपटाविषयी थोडं बोलूयात. हा चित्रपट एका सुका मेवा भेटणाऱ्या अफगाणी पठाणी व्यक्ती आणि एका चिमुरड्या मुलीच्या लोभस नात्याचा आहे. अफगाणिस्तानातील काबुल चा रहिवासी असल्याने त्याला सर्व जण काबुलीवाला म्हणून संबोधत असतात. धिप्पाड आणि राकट दिसणारा हा काबुलीवाला हृदयाने मात्र खूपच हळवा आहे. याचं कारण त्याची छोटी मुलगी काबुलमध्येच असते आणि तिला सोडून दूर देशी व्यापाराच्या निमित्ताने तो हिंदुस्थानात आलेला असतो.

एकोणिसाव्या व्या शतकाच्या अखेरचे हे कथानक आहे त्यामुळे तसं म्हटलं तर हि पिरेड मूव्ही आहे. त्या काळातील कलकत्त्याचे लोकजीवन, वाहतुकीचे साधने, सामाजिक वातावरण, कुटुंब संस्था या साऱ्यांचा खूप सुंदर चित्रण यात केलं आहे. हा व्यापारी रहमत काबुलीवाला कलकत्त्याच्या गल्लीबोळातून सुकामेवा विकत असतो. एकदा त्याला एक छोटी मुलगी दिसते त्या मुलीला पाहता क्षणी त्याला आपली स्वतःची मुलगी आठवते आणि तो तिच्या घरी जाऊ लागतो. सुरुवातीला ती मुलगी त्याला घाबरते पण नंतर या दोघांमध्ये मस्त मैत्री होते हि छोटी मुलगी मिनी खूपच लाघवी आणि बडबडी असते. त्या मुलीचे वडील लेखक असतात आणि आई घर कामात कायम मग्न असते. त्यामुळे तिला तिच्याशी बोलणार असं कोणी नसतं. तिला खूप बोलायचं असतं, सांगायचं असतं. ‘काबुलीवाल्या च्या निमित्ताने तिला आयता श्रोता मिळतो. मग दोघांमध्ये खूप चांगली मैत्री झाली. ती रोज त्याला दिवसभरातल्या छोट्या छोट्या गोष्टी सांगत असते तो देखील निवांतपणे सारं ऐकून घेत असतो. प्रत्येक वेळी त्याला आपली मुलगी त्या छोट्या मुलीच्या ठिकाणी दिसत असते. एक गोड मैत्र दोघांमध्ये निर्माण होते.
=============
हे देखील वाचा : Bappi Lahiri : पंचम यांच म्युझिक असलेल्या चित्रपटाला बप्पी लहरी यांच बॅकग्राऊंड म्युझिक !
=============
हिंदी ‘काबुलीवाला’
१९६१ साली आलेल्या ‘काबुलीवाला’ या हिंदी चित्रपटात मुख्य भूमिकेत बलराज सहानी होते तर छोट्या मुलीची भूमिका बेबी सरोजा हिने केली होती. हिंदी काबुलीवाला खरंतर विमल रॉय हे स्वतः दिग्दर्शित करणार होते पण नेमकी त्यावेळी त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांनी हेमेन गुप्ता यांना हा चित्रपट दिग्दर्शित करण्यासाठी दिला. या चित्रपटा मध्ये गुलजार यांनी लिहिलेलं ‘गंगा आये कहां से…’ हे अप्रतिम गीत होतं. तर प्रेम धवन यांनी लिहिलेलं ऐ मेरे प्यारे वतन तुझ पे दिल कुर्बा’ हे देश भक्तीपर गीत होते. या चित्रपटाला संगीत सलील चौधरी यांचे होते. या सिनेमाचे दिग्दर्शक हेमेन गुप्ता एकेकाळी आझाद हिंद सेनेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे स्वीय सहायक होते.’आनंदमठ’(१९५१) हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट.सुभाष बाबूंवर त्यांनी १९६६ साली एक चित्रपट बनवला होता. त्यांची मुलगी अर्चना ‘बुड्ढा मिल गया’ (१९७२) या ऋषिकेश मुखर्जी यांच्या चित्रपटात नवीन निश्चलची नायिका होती.
परंतु नंतर कथानक असे वळण घेते की, त्या काबुलीवाल्याच्या हातून नकळत एक खून होतो. क्षुल्लक भांडणात हे कृत्य घडते. पोलीस काबुलीवाल्याला पकडून नेतात आणि त्याला आठ वर्षाची शिक्षा होते. इकडे छोटी मुलगी मिनी काही दिवस त्याची वाट पहाते, रडते पण नंतर बाल सुलभ स्वभावानुसार त्याला विसरूनही जाते. तिकडे जेलमध्ये काबुलीवाला मात्र कायम त्याच्या देशाची, त्याच्या मुलीची आणि त्या छोट्या मुलीची आठवण काढत एक एक दिवस काढत असतो. काळ जणू त्याच्यासाठी थांबलेला असतो. तुरुंगाच्या कोठडीत तो कायम आपल्या छोट्या मैत्रिणीला आठवत असतो.
आठ वर्षे सरतात. काबुलीवाला जेलच्या बाहेर येतो आणि आपल्या छोट्या मैत्रिणीला भेटण्यासाठी तिच्या घरी जातो. पण तोवर ती मुलगी मोठी झालेली असते आणि त्याच दिवशी तिचे लग्न होणार असतं! काबुलीवाला त्या मुलीच्या वडिलांना तिला एकदाच भेटण्याची इच्छा व्यक्त करतो. ती मुलगी येते पण ती काही त्याला ओळखतच नाही. कसं ओळखणार? आठ वर्षात ती त्याला पूर्णपणे विसरून गेलेली असते. हा मात्र डोळे भरून तिच्याकडे पाहत असतो. त्या दिवशी लग्नाच्या धांदलीत ती मुलगी घरात निघून जाते. काबुलीवाला मनात विचार करतो “तिकडे माझी मुलगी देखील आता इतकीच मोठी झाली असेल ती तरी मला ओळखेल की नाही?” त्यामुळे तो आतल्या आत खूप दु:खी होतो.

मुलीचे वडील सहृदयी असतात ते त्याच्या भावना ओळखतात. आपल्या मुलीच्या लग्नातील होणारा खर्च कमी करून ते त्याला पैसे देतात आणि त्याच्या मुलीकडे जा असे सांगतात! चित्रपटाच्या शेवटी काबुलीवाला आपल्या देशाला जायला निघतो. उंटाच्या कळपामधून तो अफगाणिस्तान कडे जायला निघतो आणि प्रेक्षकांचे डोळे देखील त्याक्षणी पाणावलेले असतात. खरं तर अतिशय छोटी कथा पण दिग्दर्शकाने अतिशय उंचीवर या कथानकाला नेले आहे. सिने लिबर्टी म्हणून काही प्रसंगांची त्यात वाढ देखील केलेली आहे. पण हे प्रसंग ठिगळ न वाटता चित्रपटातील भावुकता वाढवणारेच आहेत.
================================
हे देखील वाचा: Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?
=================================
१९५७ साली आलेल्या काबुलीवाला या बंगाली चित्रपटात मुख्य भूमिकेमध्ये छबी विश्वास होते तर छोट्या मुलीची भूमिका टिंकू टागोर(शर्मिला ची धाकटी बहिण) हिने केली होती. अन्य भूमिकांमध्ये राधामोहन भट्टाचार्य, मंजू डे यांच्या भूमिका होत्या. या चित्रपटाला संगीत पं. रविशंकर यांचे होते. छबी विश्वास यांनी सत्यजित रे यांच्या चित्रपटातून भूमिका केल्या होत्या. अतिशय ताकतीचा हा कलावंत. काबुलीवाला आणि छोट्या मुलीतील कृत्रिम प्रेम आणि मैत्री अनुभवायचं असेल तर हा चित्रपट पाहायला हवा. हा चित्रपट सब टायटल्स सहित यु ट्यूब वर नि:शुल्क उपलब्ध आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त हि अभिजात कलाकृती आजच्या पिढीने देखील आवर्जून पाहायलाच पाहिजे!