Madhubala मुंबईच्या मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Lata Mangeshkar : लता दीदींनी कोणत्या गाण्यासाठी ४० वर्षानंतर संगीतकाराला थँक्यू म्हणाल्या?
स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांनी संगीतकार राजेश रोशन यांना त्यांच्या एका गाण्याबद्दल तब्बल चाळीस वर्षानंतर थँक्यू म्हटले होते. कोणता होता तो चित्रपट आणि कोणत्या गाण्यासाठी लता दिदी यांनी हा अभिप्राय व्यक्त केला होता? मोठा इंटरेस्टिंग किस्सा आहे. संगीतकार राजेश रोशन यांनी अगदी लहान वयात चित्रपटाला संगीत द्यायला सुरुवात केली होती. संगीतकार रोशन यांचे पुत्र असलेले राजेश यांनी वयाच्या अठराव्याव्या वर्षी मेहमूद यांच्या ‘कुंवारा बाप’ (१९७३) या चित्रपटाला पहिल्यांदा संगीत दिले.

यानंतर त्यांचा दुसरा चित्रपट होता ‘ज्युली’. हा चित्रपट १७ मार्च १९७५ या दिवशी प्रदर्शित झाला आणि सुपर हिट ठरला. ‘ज्युली’ या सिनेमाने या वर्षी पन्नास वर्ष पूर्ण केली आहेत. त्या निमित्ताने या चित्रपटाबाबत संगीतकार राजेश रोशन यांनी अलीकडेच एका खाजगी एफ एम वाहिनी सोबत चर्चा करीत असताना बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टींचा खुलासा केला, हा चित्रपट १९७५ साल चा सुपरहिट सिनेमा होता.
==============
हे देखील वाचा : Sai Paranjpye यांच्या चित्रपटासाठी किशोर कुमार यांनी कलात्मक गाणे गायले!
==============
या सिनेमाच्या संगीतासाठी त्यांना त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा फिल्मफेअर पुरस्कार देखील प्राप्त झाला होता. हा एक म्युझिकल हिट सिनेमा होता. सिनेमाचा विषय बोल्ड होता. कुमारी मातेचा विषय काळाच्या पुढचा होता. संगीतकार राजेश रोशन यांनी या चित्रपटाला तरुणाईला आवडेल असं धुंद संगीत दिलं होतं. या सिनेमातील सगळीच गाणी उत्तम बनली होती. पण यातील उत्कृष्ट पण कमी गाजलेल्या एका गाण्याचा किस्सा राजेश रोशन यांनी या मुलाखतीत सांगितला.
या चित्रपटात लता मंगेशकर यांच्या स्वरातील ‘ये राते नयी पुरानी…’ हे गाणे इतर गाण्याच्या मानाने थोडे कमी क्लिक झाले होते. याच गाण्याचा किस्सा मोठा भन्नाट आहे. या गाण्याची रिहर्सल झाली रेकॉर्डिंग डेट ठरली. नेमकं त्याच दिवशी सकाळी लता मंगेशकर यांची तब्येत खराब झाल्यामुळे रेकॉर्डिंग कॅन्सल झाले. राजेश रोशन यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. कारण चित्रपटाचे बजेट कमी होतं त्यात हा वाढीव रेकॉर्डिंगचा खर्च. त्यामुळे राजेश रोशन यांनी जुगाड केला. ज्या काळात लाईव्ह रेकॉर्डिंग होत असे त्या काळात त्यांनी या गाण्याचा ट्रॅक रेकॉर्ड करून घेतला!

आता फक्त लता मंगेशकर यांनी येऊन त्या ट्रॅकवर गाऊन जायचं होतं. पण लता मंगेशकर त्या काळात प्रचंड बिझी असल्याने त्यांची भेट होणे हेच खूप अवघड होतं. राजेश रोशन चित्रपट सृष्टी नवीन होते. दुसराच चित्रपट होता. वय देखील त्या मानाने खूपच कमी होते. लता मंगेशकर यांची डेट मिळत नसल्याने अवघड झालं होतं. बरं दुसऱ्या गायिकेच्या स्वरात रेकॉर्ड करून घेणं त्यांना योग्य वाटत नव्हते. लता मंगेशकर ला तो रोज कॉन्टॅक्ट करायचा पण लताच्या व्यस्तते मुळे शक्य होत नव्हतं.
एके दिवशी लता मंगेशकर यांचं फिल्मसेंटर येथे कल्याणजी आनंदजी यांच्या एका गाण्याच्या रेकोर्डिंग होतं. त्यामुळे राजेश रोशन फिल्म सेंटर येथे जाऊन पोहोचले. तिथे रेकॉर्डिंग ची तयारी चालू होती. कल्याणजी भाई यांनी राजेश रोशन यांना विचारले,” राजू तू इधर क्या कर रहा है?” त्यावर त्याने सर्व स्टोरी सांगितली. “मी लता मंगेशकर यांना भेटायला आलो आहे पण त्या प्रचंड बिझी असल्यामुळे शक्य होत नाही.” कल्याणजी भाई यांना राजेश रोशन यांचा सर्व प्रॉब्लेम लक्षात आला.

तितक्यात तिथे लता मंगेशकर आल्या. रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये धावपळ सुरू झाली. राजेश रोशन यांना पाहिल्यानंतर लता मंगेशकर म्हणाल्या,” राजू, जर आज कल्याणजी भाई यांची गाणी लवकर संपली तर मी तुझ्या कडे रेकॉर्डिंग ला येते.” राजेश रोशन यांना वाटलं की कल्याणजी भाई यांच्या गाण्यांचे रेकॉर्डिंग संपणार कधी आणि लताबाई येणार कधी? त्याचा काळजीयुक्त चेहरा पाहून कल्याणजी भाई म्हणाले,” राजू ऐसा करते है. पहले तेरे गाने की रेकॉर्डिंग करते है. बाद में मेरे गाने की.” संगीतकार राजेश रोशन यांच्यासाठी हा फार मोठा सुखद होता .
कल्याणजी भाई लता मंगेशकर यांना म्हणाले ,” दिदी चलो आज पहले राजू के गाने की रेकॉर्डिंग खतम करते है बाद में मेरी.” असं म्हणत त्यांनी लता मंगेशकर यांना आपल्या कार मध्ये घेतले आणि फेमस स्टुडिओ मध्ये सर्वजण निघाले. तिथे गेल्यानंतर कल्याणजी भाई यांनी राजेश रोशन याला सांगितले ,” आज हे गाणे मी रेकॉर्ड करणार!” हा राजेश रोशन यांना दुसरा सुखद धक्का होता. कारण कल्याणजी आनंदजी त्या काळातले एक मान्यवर संगीतकार होते आणि ते एका ज्युनिअर संगीतकाराच्या रेकॉर्डिंग स्टुडिओला उपस्थित राहून स्वतः रेकॉर्डिंग कंडक्ट करतो असे म्हणणं म्हणजे हा राजेश रोशन यांचा फार मोठा गौरव होता. कल्याणजी भाई यांनी राजेश रोशन यांना विचारले ,” तू कुठे बसतोस?” त्यांनी समोरच्या खुर्चीकडे बोट दाखवलं. कल्याणजी म्हणाले ,” आज मी तिथे बसणार!” आणि त्या पद्धतीने गाण्याचे रेकॉर्डिंग सुरू झाले. ट्रॅक तयारच होता फक्त लता आणि कोरस गाणार होते.

रेकॉर्डिंस्टला सर्व सूचना कल्याण स्वतः करत होते. राजेश रोशन यांना मनातून भीती वाटत होती की गाण्याचे काय होईल पण गाणं व्यवस्थित रेकॉर्ड झालं. लताबाईंना घेऊन कल्याणजी भाई लगेच आपल्या रेकॉर्डिंग गेले. रेकॉर्ड झालेल्या गाण्याची स्पूल घेऊन आपल्या घरी गेले. त्यांच्याकडे त्यावेळेला अकाईचा टेप रेकॉर्डर होता. राजेश रोशन यांनी गाणे प्ले केले. घरात त्यावेळी राकेश रोशन देखील उपस्थित होते लताबाईंचा आवाज सुरू झाला आणि भारावल्यागत सगळेजण ऐकू लागले. या गाण्याला कल्याणजी भाई यांनी एक हंटिंग मेलडी टच दिला होता. गाणे होते ‘ये राते नयी पुरानी ….’ चित्रपटात हे गाणे रीता भादुरी वर चित्रित झाले होते.
=============
हे देखील वाचा : Manoj Kumar : माला सिन्हा यांनी मनोज कुमार यांचा पाणउतारा केला होता.
=============
आज ‘ज्युली’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन पन्नास वर्षे झाली आहेत पण या चित्रपटातील हर एक गाणं रसिकांच्या आजही लक्षात आहे. गंमत म्हणजे लता मंगेशकर यांनी गाणे बंद केल्यानंतर २०१४ साली एकदा राजेश रोशन यांना फोन करून सांगितले,” राजू एका गाण्याबाबत मी तुला थँक्यू म्हणायचे विसरून गेले होते. आज चाळीस वर्षानंतर तुला थँक्यू म्हणते.” राजेश रोशन यांना काहीच कळाले नाही त्यांनी विचारले,” दिदी काय झाले? कोणत्या गाण्याबद्दल आपण बोलताय?” त्यावर लता मंगेशकर म्हणाल्या,” ये राते नयी पुरानी हे गाणं माझं अत्यंत आवडीचं गाणं आहे आणि या गाण्याला संगीत तू दिलं होतंस त्या वेळेला मी थँक्यू म्हणाले नाही पण आज चाळीस वर्षानंतर मी या गाण्याबाबत थँक्यू म्हणते इतकं चांगलं गाणं तू माझ्याकडून गाऊन घेतलंस!”