
Paresh Rawal : “मराठी नाट्यसृष्टी दोन पावलं पुढे…!”
भारतीय नाट्य आणि चित्रपटसृष्टी तसं पाहायला गेलं तर एकमेकांशी संलग्न आहे. प्रत्येक भाषेतील कलाकृती ही प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन तर करतेच पण कलाकारांना नवं काही शिकण्याची संधी देखील देते. अनेक दिग्गज कलाकारांच्या अभिनयाचा पाया हा नाटक आहे. रंगभूमीवर काम केलं नसेल तर तो कलाकार आहे अशी मान्यता दिली जात नाही अशी एक समज आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनीही नाटकांमधून अभिनयाची सुरुवात करत ४५ वर्षांपेक्षा अधिक काळ मनोरंजनसृष्टीला दिला आहे. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये मराठी नाट्सृष्टी सर्वोत्कृष्ट असून आजही नवे प्रयोग होत आहेत याबद्दल परेश यांनी मराठी नाटकांचं कौतुक केलं आहे. नेमकं काय म्हणाले वाचा…. (Paresh Rawal)

LallanTopला दिलेल्या मुलाखतीमध्ये परेश रावल यांनी मराठी नाटकांचे विशेष कौतुक केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “गुजराती नाट्यसृष्टीने ज्या ताकदीची नाटकं केली आहेत ती अद्याप हिंदी मनोरंजनसृष्टीने पाहिलीच नाही आहे. मुळात माझ्या अभिनयाचा पायाच नाटक आहे. आजवर मी सुलभा देशपांडे, डॉ. श्रीराम लागू, अरविंद देशपांडे अशा अनेक दिग्गज मराठी कलाकारांची अजरामर नाटकं पाहिली आहेत. जे मराठी नाटक येईल ते पाहायचंच हे आम्ही ठरवलं होतं. खरं सांगायचं तर मराठी रंगभूमी आजही ज्या प्रकारची नाटकं सादर करत आहेत हे सौभ्यागचं आहे. आम्ही नशिबवान होतो की, मराठीत इतकी चांगली नाटकं होती. आजही ते चांगलेच करतात. किती शिकायला मिळतं त्यांच्याकडून. मराठी रंगभूमी, सिनेसृष्टी दोन पावलं पुढं आहे, कारण त्यांच्याकडे सशक्त असे लेखक आहेत. खूप उत्कृष्ट, पुढारलेले लेखक आहेत हे. कधी संधी मिळाली तर लेखक प्राजक्त देशमुखचं नाटक आहे देवबाभळी, नक्की बघा.संगीत नाटक आहे”. (Marathi natak)

‘संगीत देवबाभळी’ (sangeet devbabhali) नाटकाची कथा सांगताना परेश रावल (Paresh Rawal) पुढे म्हणाले की, “नाटकाची गोष्ट काय आहे तर एक संत तुकारामांची पत्नी आहे, एक विठ्ठलाची पत्नी आहे. गर्भवती असताना तुकोबांना शोधत आवली भटकत होती, तेव्हा तिच्या पायात देवबाभळीचा काटा घुसला आणि तिची शुद्ध हरपली. तिच्या पायातला काटा काढायला साक्षात विठ्ठल अवतरला अशी एक वदंता आहे. पायातला काटा काढल्यानंतर काय घडलं असेल?, त्या जखमेचं निमित्त करून विठ्ठलाने रखुमाईला आवलीची काळजी घ्यायला पाठवलं आहे का? विठ्ठल-रखुमाई, तुकोबा-आवली, आवली-विठ्ठल आणि आवली-रखुमाई यांच्यातील द्वंद्व काय आहे? दोन बायका एकत्र आल्या की, काय घडतं? हे या नाटकात आहे.लाइव्ह संगीत आहे, गाणी आहेत…त्यांना प्रेक्षकांना डेमो द्यावा लागतो की हे रेकॉर्ड केलेलं नाही आहे”. (Entertainment news)
==============
हे देखील वाचा : परेश रावल… बहुरंगी, बहुआयामी, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व!!
==============
‘संगीत देवबाभळी’ हे नाटक ६ वर्षांपेक्षा अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. प्राजक्त देशमुख (Prajakt Deshmukh) लिखित आणि दिग्दर्शित या नाटकाची निर्मिती भद्रकाली संस्थेने केली आहे. विशेष म्हणजे साहित्य अकादमीचा पुरस्कार देखील या नाटकाला मिळाला आहे. (Marathi entertainment news)