
Madhumati : मधील हे गाणे बिमल रॉय यांनी का अर्धवट चित्रित केले?
जीनियस दिग्दर्शकांचं एक वैशिष्ट्य असतं ते कधीही रुळलल्या वाटांवरून चालत नाहीत ते स्वतःची अशी स्वतंत्र वेगळी वाट निर्माण करतात. त्यांचं हे वेगळपण त्यांच्या कलाकृतीतून दिसत असतं. दिग्दर्शक बिमल रॉय हे त्यापैकीच एक! पन्नास आणि साठच्या दशकात त्यांनी ‘दो बिघा जमीन’, ‘देवदास’, ‘यहुदी’, ‘मधुमती’, ‘सुजाता’, ‘बंदिनी’ अशी एकाहून एक सुंदर क्लासिक मुव्हीज त्यांनी दिग्दर्शित केले. यातील बहुतांश चित्रपट हिंदी सिनेमातील मास्टरपीस चित्रपटांपैकी आहेत. मधुमती (Madhumati) हा त्यांचा अतिशय गाजलेला चित्रपट. तब्बल दहा फिल्मफेअर पारितोषिक या चित्रपटाला मिळाले होते. दिलीप कुमार, वैजयंतीमाला, प्राण यांचा अप्रतिम अभिनय, सलील चौधरी यांचे मेलडीयस संगीत, शैलेंद्र यांचे अभिजात भावस्पर्शी शब्द, लता-मुकेश-रफी यांचे स्वर… चित्रपटाला भारतीय सिनेमाच्या इतिहासात अजरामर करून गेला.

या चित्रपटात दिग्दर्शक बिमल रॉय यांनी एक गाणं अर्धवट चित्रित केलं होतं. ते त्यांनी मुद्दामच अर्धवट ठेवलं होतं. याचं कारण देखील खूप महत्त्वाचं होतं. हे गाणं त्या काळात खूप लोकप्रिय झालं होतं. इतर कोणताही दिग्दर्शक अशा लोकप्रिय गाण्याला असं अर्धवट चित्रित करणार नाही पण बिमल रॉय यांचे या मागचं एक अतिशय चांगलं लॉजिक होतं. कोणतं होतं ते गाणं आणि काय होता तो नेमका किस्सा?
१२ सप्टेंबर १९५८ रोजी बिमल रॉय यांचा ‘मधुमती’ (Madhumati) हा चित्रपट प्रदर्शित झाला. दिलीप कुमार, वैजयंतीमाला, प्राण यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट पुनर्जन्मावर आधारित होता. सिनेमाची कथा ऋत्विक घटक यांची होती. सलील चौधरी यांनी स्वरबध्द केलेली सर्वच गाणी मधुर बनली होती. आजा रे परदेसी मै तो कबसे खडी इस द्वार, टूटे हुए ख्वाबोने, घडी घडी मेरा दिल धडके, बिछवा, जंगल में मोर नाचा… ही सगळीच गाणी प्रचंड लोकप्रिय झाली होती. या चित्रपटात आणखी एक गाणं होतं जे मुबारक बेगम यांनी गायलं होतं. गाण्याचे बोल होते ‘हम हाले दिल सुनायेंगे सुनीये की न सुनिये…’ हे एक मुजरा गीत होतं.

चित्रपटात हे गाणं त्या सिच्युएशनला येते जेव्हा प्राण एका मैफिलीमध्ये हे गाणं ऐकत असतो आणि त्याच्या मागावर असलेला चित्रपटाचा नायक दिलीप कुमार हा रागारागाने तिथे आलेला असतो. त्याला कळालेलं असतं की मधुमतीला (Madhumati) गायब करण्यामध्ये प्राणचाच हात आहे. त्यामुळे तो जेव्हा मैफिलीमध्ये एन्ट्री करतो त्यावेळेला बिमल रॉय यांनी चित्रपटातील गाणं तिथेच थांबवल आहे.
============
हे देखील वाचा : crisis : Lalita Pawar आणि Ashok Kumar यांनी संकटाचे संधीत रुपांतर केले !
============
त्यांनी एका इंटरव्यूमध्ये असं सांगितलं होतं की हे त्यांनी मुद्दाम केलं होतं कारण “कुठलाही सामान्य माणूस जेव्हा गुन्हेगाराच्या पाठीमागे असतो तेव्हा तो तिथे गेल्यानंतर काही गाण्याची मजा घेणार नाही तो ताबडतोब त्या गुन्हेगाराला पकडणार!” हेच लॉजिक वापरून बिमल रॉय यांनी त्या गाण्याचा फक्त मुखडा चित्रपटांमध्ये ठेवला. त्यांनी ठरवलं असतं तर ते गाणं पूर्ण चित्रित करता आलं असतं ते गाणं चित्रीत झाल्यानंतर त्यांनी दिलीप कुमारची एन्ट्री ठेवली असती किंवा दिलीप कुमारदेखील त्या गाण्याचा आनंद घेतो असं त्यांना दाखवत आल जेणेकरून ते गाणं प्रेक्षकांना पूर्ण पाहता आलं असतं. पण बिमल रॉय हे अतिशय प्रतिभावान दिग्दर्शक होते. चित्रपटातील छोटीशी चूक देखील त्यांना मान्य नसे त्यामुळे त्यांनी अशा प्रकारे एक गाणं मुद्दामच अर्धवटच चित्रित करून ठेवलं! (Madhumati)