
Shah Rukh Khan याच्या जोश चित्रपटाला २५ वर्ष पुर्ण!
एसआरके अर्थात शाहरुख खान जे करतो ते त्याच्या चाहत्यांना भारी आवडतं, ही त्याची जणू मिळकतच. आपण स्टार आहोत याचं पुरेपूर भान तो इतरांनाही देतो हे त्याच्या चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत कायमच मी अनुभवलय. तो मन्सूर खान दिग्दर्शित ‘जोश’ (मुंबईत प्रदर्शित ९ जून २०००)साठी हेमा सरदेसाईसोबत गोव्यातील लोकसंगीत शैलीतील गाणे गायला, ‘अपुन बोला…’चित्रपटाच्या गाण्याची कॅसेट प्रकाशित होताच गाणे सुपरहिट झाले देखिल. नीतिन राईकवार लिखित हे गाणे अन्नू मलिकने स्वरबद्ध केलेय. शाहरुख खान गायला याला पंचवीस वर्ष पूर्ण झालीदेखिल म्हणायचे.’जोश’ या चित्रपटाला पंचवीस वर्ष झालीच.

शाहरुख खान अन्नू मलिक शैलीत गायलाय असं कोणी तिरकसपणे म्हणालं, तर कोणी म्हटले, विक्रम भट्ट दिग्दर्शित ‘गुलाम’ मधील आमिर खानने गायलेले ‘आती क्या खंडाला’ जास्त लोकप्रिय ठरले. अशी तुलना होणारच म्हणा.खरं तर या चित्रपटात शाहरुख खान व आमिर खान एकत्र दिसले असते तर आश्चर्य नव्हते. पिक्चरचा दिग्दर्शक मन्सूर खान हा आमिर खानचा चुलत भाऊ. इतकेच नव्हे तर मन्सूर खान दिग्दर्शित ‘कयामत से कयामत तक’, ‘जो जिता वो सिकंदर’,’अकेले हम अकेले तुम’ आमिरच नायक होता. घरातलाच माणूस,म्हणजेच एकमेकांच्या कामाची पद्धत,सवय,स्वभाव सगळेच माहित असतेच. तीन चित्रपट एकत्र केल्यावर तर आणखी सोपे असते. पण आमिरला शाहरुखने साकारलेली भूमिका हवी होती.

मन्सूर खानला नीरज वोरासोबत पटकथेवर काम करताना नायक म्हणून शाहरुखच फिट्ट वाटत होता. आमिरला वाटत होते, ‘जोश’मुळे आपली प्रतिमा बदलण्यास सुरुवात होईल (जॉव मॅथ्यूज मथान दिग्दर्शित ‘सरफरोश’ पासून ती झाली. तो चित्रपट एप्रिल १९९९ ला म्हणजेच ‘जोश’ च्या अगोदर प्रदर्शित झाला.आणि मनोरंजनाची चौकट सांभाळून वेगळ्या प्रवाहातील चित्रपट ठरला.) आमिर खानने नाही म्हटल्यावर सैफ अली खानला विचारले. तो फार बिझी असल्याने चंद्रचूड सिंगची निवड झाली. (त्या काळात फिल्म फेअर या मासिकाच्या मुखपृष्ठासाठी शाहरुख आमिरने एकत्र केलेले फोटो सेशन गाजले.दिग्दर्शक राजकुमार संतोषी त्या दोघांना घेऊन एक चित्रपट करणार अशीही एक ब्रेकिंग न्यूज होती.पुढे काहीच घडले नाही.)
================================
=================================
चित्रपटातील शाहरुखच्या बहिणीच्या भूमिकेसाठी मन्सूर खानने काजोलला विचारले तेव्हा बहुतेक त्याला शाहरुख काजोल ही रोमॅन्टीक जोडी म्हणून जास्त लोकप्रिय आहे याचा विसर पडला असावा. काजोलने तेच लक्षात आणून दिले.आता कोणाची निवड करायची? ऐश्वर्या राय आता मॉडेलिंगपेक्षा चित्रपटात भूमिका साकारण्यात जास्त रस घेत होती.तिने शाहरुख खानच्या बहिणीची भूमिका स्वीकारल्याची बातमी आली रे आली एक फ्लॅशबॅक समोर आला. देव आनंद दिग्दर्शित व अभिनित ‘हरे राम हरे कृष्ण’ (१९७२) या चित्रपटात देव आनंद व झीनत अमान यांनी अशीच भावा बहिणीची भूमिका साकारली आणि त्यानंतर ते ‘हीरा पन्ना’, ‘वॉरंट’, प्रेम शास्त्र इत्यादी चित्रपटात एकत्र आले. शाहरुख खान व ऐश्वर्या राय देखिल आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘मोहब्बते’ इत्यादी चित्रपटात एकत्र आलेच. ‘जोश’मधील शरद कपूरने साकारलेल्या भूमिकेसाठी अगोदर पुरु राजकुमारला विचारले पण त्याचं कशावरुन तरी मन्सूर खानशी पटले नाही.

‘जोश’गोव्यात घडतो. त्या काळातील गोव्यातील युवकांच्या टोळीतील वैर हे मध्यवर्ती सूत्र. गोव्याचे समुद्र किनाऱ्यावरील वातावरण, गावे हे सगळेच ‘जोश’ची रंगत वाढवते. आणि गोव्यात गोष्ट घडत असल्यानेच हिंदीसह कोंकणी भाषेचाही वापर. छायाचित्रणकार के. व्ही. आनंद यांनी गोव्याचे सौंदर्य खुलवलयं. संकलन दिलीप कोटल्गी व जाफर सुलतान यांचे आहे. चित्रपटाची कथा कल्पना जेरोमी रॉबिन्स यांच्या ‘वेस्ट साईट स्टोरी’ (१९८० )वर आधारित आहे. चित्रपटाची निर्मिती व्हीनस कॅसेट कंपनीची असल्याने चित्रपटात गीत संगीत नृत्याची रंगत स्वाभाविक होतीच.
================================
हे देखील वाचा: Samana Movie : भारतीय चित्रपटसृष्टीतील ऐतिहासिक ‘सामना’ची ५० वर्ष पूर्ण!
=================================
‘हे मेरा दिल’, ‘इस को दिल के हारे’, ‘मेरे खयालों की मलिका तू’ वगैरे गाणी लोकप्रिय ठरलीच. जास्त गाजले, ‘अपुन बोला तू मेरी लैला, वो बोली फेकता है साला… नायकाला (अर्थात शाहरुख) त्याची प्रेयसी (प्रिया गिल) चपराक लावते तेव्हा त्याची बहीण ( ऐश्वर्या) आपल्या टपोरी मित्रांसोबत भावाला साथ देते. आपण ऐश्वर्याचा भाऊ म्हणून शोभावे यासाठी शाहरुखने ब्ल्यू लेन्स वापरल्या.चित्रपट बनता बनता चक्क चार वर्ष लागली. दिग्दर्शक मन्सूर खान हैराण झाला. त्याचे वडिल नासिर हुसेन हे साठ व सत्तरच्या दशकातील यशस्वी निर्माते व दिग्दर्शक. (जब प्यार किसीसे होता है, प्यार का मौसम, बहारों के सपने, कारवा, यादों की बारात, हम किसीसे कम नही वगैरे चित्रपट त्यांनी दिले.) मन्सूर खानने ‘जोश’ नंतर चित्रपटसृष्टीसह मुंबईच सोडण्याचा निर्णय घेतला. मोजक्याच चार चित्रपटात त्याने थांबणे पसंत केले.चित्रपट दिग्दर्शक म्हणून काम करताना टेंपरामेंट फार वेगळे लागते. अनेक गोष्टींचे भान असावे लागते. ते ठेवूनही कधी कधी नकोसे होवून जाते. एक चित्रपट काय काय घडवत असतो ना? ‘अपुन बोला….’ शाहरुख गायला.