Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

जेव्हा सिनेमाच्या शौकापायी लहानपणी Dharmendra यांनी बसच्या टपावर बसून प्रवास केला!
१९७० साली ऋषिकेश मुखर्जी यांचा एक चित्रपट आला होता ‘गुड्डी’ नावाचा. यातील शाळकरी नायिका जया भादुरी (Jaya Bhaduri) हि सिनेमाची प्रचंड शौकीन असते. ती कायम स्वत:ला त्या विश्वात हरवून बसलेली असते. यात तिच्या स्वप्नातील नायक असतो अभिनेता धर्मेंद्र. यात धर्मेंद्र यांनी चित्रपटात देखील धर्मेंद्रचीच भूमिका केली होती. पुढे तेच तिच्या डोक्यातून सिनेमाचे खूळ बाहेर काढतात असे या सिनेमाचे कथानक होते. पण असेच सिनेमाचे खूळ धर्मेंद्रंच्या स्वत:च्या डोक्यात ही होते. लहानपणापासून सिनेमाचे त्यांना प्रचंड आकर्षण होते. त्यांच्या गावा जवळून जाणाऱ्या फ्रटीयर मेल पाहून धर्मेंद्र रोज म्हणायचे, “अरे यार, तू कब मुझे मेरे सपनो के शहर ले जायेगी? ” (पुढे धर्मेंद्रने याच मेल मधून पळून जाऊन माया नगरी गाठली !) याच काळातील हा किस्सा आहे. (Dharmendra News)

त्या वेळी धर्मेंद्र सिनेमात आले नव्हते आणि पंजाबात कॉलेजचं शिक्षण घेत होते. या काळात त्यांना सिनेमाचा प्रचंड शौक होता. मनोमन त्यांनी सिनेमात जाण्याचं ठरवलं होतं पण घरच्यांचा विरोध होता. मुंबईला जाऊन सिनेमात काम करण्याला विरोध तर होताच शिवाय सिनेमा पाहायला देखील त्यांच्या घरून विरोध असायचा. त्यामुळे धर्मेंद्रने एक आयडिया केली होती. सिनेमा पाहायचा असेल तर गावात थेटर नव्हतं. त्यांना फगवाड्या वरून जालंदरला जावं लागायचं. जालंदरला ज्योती टॉकीजमध्ये नवीन हिंदी सिनेमा लागायचा. त्यावेळी तिथे प्रदर्शित होणारा प्रत्येक सिनेमा धर्मेंद्र पाहत होते. हे सर्व ते कॉलेजच्या वेळात उरकून टाकायचे. आणि साळसूदपणे घरी जायचे. कुणाला काही कळण्याचा प्रश्नच नव्हता. (Entertainment Trending News)

घरच्यांना काही कळू नये त्यासाठी त्यांनी एक आयडिया केली होती. फगवाडाहून जालंदरला ते बसने जात असायचे आणि येताना पुन्हा बसने घरी परत यायचे. परंतु, संध्याकाळी घरी जाणारी बस सिनेमा संपायच्या आधीच निघत असायची आणि ती शेवटची बस असल्यामुळे ती पकडणं भाग असायचं. त्यामुळे धर्मेंद्र यांना बरेचसे सिनेमे हे शेवटी अर्धा तास बाकी असताना सोडावे लागत होते. शेवटचा क्लायमॅक्स सोडून थिएटरच्या बाहेर पडायला त्यंना खूप जड जात असे. चिडचिड व्हायची पण पर्याय नव्हता. शेवटची बस त्यांना पकडणं गरजेचं असायचं; नाहीतरी घरी बिंग फुटले जाण्याची शक्यता होती. घरच्यांना वाटायचं पोरगं कॉलेजला जात आहे, पण चिरंजीवांचे हे उद्योग चालू होते. हा सिलसिला बरेच दिवस बिन बोभाट चालू होता.
================================
हे देखील वाचा : धर्मेंद्र आणि राखी यांचा ‘Jeevan Mrityu’
================================
एकदा असेच चित्रपट पाहून शेवटचा अर्धा तास सोडून ते धावत धावत जालंधरच्या एसटी स्टँडवर गेले. तिथे बस अगदी निघण्याच्या तयारीत होती. त्यांनी हात करून कंडक्टरला थांबण्याचा इशारा केला. पण कंडक्टर काही थांबायला तयार नव्हता. आता पंचाईत झाली होती. ही बस पकडणे भाग होते. त्यामुळे बस सुटल्यानंतर धर्मेंद्र त्या बसच्या पाठीमागे सुसाट पळत गेले आणि शेवटी कसेबसे त्यांनी बसच्या मागे असलेल्या शिडीवर चढण्यात यश मिळवले. ही शिडी चढून ते वरती टपावर गेले. थंडीचे दिवस असल्यामुळे ते अक्षरशः गारठून गेले होते. पण काय करणार सिनेमाची हौस दांडगी होती. ज्या वेळेला फगवाडा आले त्यावेळी सर्व प्रवासी उतरत असताना हळूहळू ते देखील बसच्या शिडीवरून खाली उतरू लागले. कंडक्टरने ते बघितले. आणि कंडक्टरने त्याला पकडले! आणि त्याला पैसे मागितले. गरम धरम आता चिडला होता. म्हणाला,” मी तुला वारंवार विनंती करून बस थांबव म्हणत होतो तेव्हा थांबवली नाहीस आता कसले पैसे मागतोस ? तुला पैसे पण देणार नाही!”, असे म्हणून धर्मेंद्र तिथून पळून गेले. पण गाव छोटे होते. कंडक्टरने धरम यांच्या या लीला तिखट मीठ लावून त्यांच्या घरी सांगितल्या आणि धरम यांचं कॉलेज सुटलं ते सुटलंच!
