Big Boss Marathi 6 : ‘मी शोमध्ये असेपर्यंत तुझ्यासोबत बोलणार

Bollywood Celebrity : कलाकाराचा मृत्यू …. कधी खेळ मांडला, कधी गांभीर्य
मंगळवार ११ नोव्हेंबरची सकाळ. दिवस वेग घेत होता. वृत्त वाहिनीवर बघता बघता, सोशल मीडियात नजर टाकता टाकता, व्हाॅटअपवर मेसेज व्हायरल होता होता समजले, धर्मेंद्रचे निधन झालं. ही दुर्दैवाची गोष्ट इतक्या आणि अशा वेगाने पसरली की काही राजकीय नेत्यांनी ट्वीटही केले आणि धरमजीना श्रध्दांजली वाहिली. अनेक चित्रपट रसिकांनाही भराभर पोस्ट करीत धर्मेंद्रला श्रध्दांजली वाहिली. या सगळ्या वेगवान घडामोडीत हेमा मालिनीजी आणि ईशा देओलने सोशल मीडियात पोस्ट करीत म्हटले, असं काहीही झालेले नाही. धरमजी सुखरूप आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिडियात असल्याने या सगळ्या घडामोडींकडे लक्ष ठेवणे आवश्यक असतेच.
सर्वात वेगवान आम्हीच अशा मानसिकता आणि स्पर्धेतून अनेक बातम्या भरभर दिल्या जातात आणि याच गडबडीत ‘ही बातमी कन्फर्म करणे’ राहून जाते. त्यातही अनेकांचा प्रश्न असतो, अशी बातमी कन्फर्म कुठे नि कशी करायची? या सगळ्याचा परिणाम असा झाला की, २४ नोव्हेंबर रोजी दुपारी एका वृत वाहिनीकडून धर्मेंद्रच्या निधनावर प्रतिक्रिया देण्यासंदर्भात फोन आला तेव्हा माझा पहिला प्रश्न होता, ही बातमी खरी आहे ना? धर्मेंद्रबाबत मी बरेच काही सांगू शकतो….

दरम्यान पहिल्या वेळेस झालेला खेळ थट्टेचा विषय ठरला. माध्यमांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटली. मला जुनी गोष्ट आठवली, एक ऑगस्ट १९८० ची सकाळ अतिशय धक्कादायक बातमीने झाली होती . सकाळी सात वाजताच्या मुंबई आकाशवाणीवरील मराठी बातम्यांत एक होती, काल ३१ जुलै १९८० रोजी मोहम्मद रफी यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने मुंबईत निधन. त्याच सुमारास घरी आलेल्या वृत्तपत्रातील पहिल्याच पानावर ही दु:खद बातमी होती. जस जसा दिवस पुढे सरकला तस तशी ही बातमी समाजातील सर्वच स्तरांत पोहचली. मला आठवतय गिरगाव चौपाटीवरील भवन्स काॅलेजमधील आम्ही काही मित्रांनी लेक्चर्स बंक करुन गावदेवीच्या सिग्नलजवळील इराणी हॉटेलमध्ये गेलो आणि आमच्या सर्वांच्या खिशात जेवढी म्हणून आठ आण्यांची नाणी होती ती ज्यूक्स बॉक्समध्ये टाकली आणि मोहम्मद रफीच्या अनेक जुन्या गाण्यांवर बटण दाबले आणि मग एकेक करत मोहम्मद रफीचे गाणे आम्ही ऐकत बसलो.
================================
हे देखील वाचा : Bollywood & Marriage : साखरपूडा झाला पण….
================================
इतके की, काऊंटरवरुन आणखीन काही आठ आण्यांची नाणी घेतली आणि मोहम्मद रफीच्या अनेक अनेक मूडच्या गाण्यात हरखून गेलो. अगदी ब्लफ मास्टरचे गोविंदा आला रे आला देखील ऐकले आणि प्यार का मौसमचे तुम बिन जाऊ कहा तर पुन्हा पुन्हा ऐकले……..त्या काळात मुंबई दूरदर्शन ही एकच वाहिनी होती आणि त्यावर रोज सायंकाळी साडेसात वाजता “बातम्या” असत. त्यात वांद्र्याच्या रफी व्हीला या त्यांच्या निवासस्थानी त्याचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आलेले हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर यावर बातमी होती…. काही दिवसांतच दैनिकांची रविवार पुरवणी, साप्ताहिके, मासिके यांत मोहम्मद रफी यांच्या कारकीर्दीवर बरेच काही सखोल अभ्यास असलेले असे तपशीलवार वाचायला मिळाले. गाण्यांमागचे किस्से वाचायला मिळाले. ते दिवसच वेगळे होते. चित्रपट व चित्रपटसृष्टी यावर माहिती व मनोरंजन यावर फोकस असलेले लेख वाचायला मिळत. जुन्या काळातील चित्रपट, त्याचे दिग्दर्शक त्यातील कलाकार, गीत संगीत यांवर भरभरून प्रेम करणारा मोठा वर्ग समाजात आहे.
अशीच एक जुनी आठवण, हिंदी चित्रपटसृष्टीच्या वतीने मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर १२ डिसेंबर १९८६ रोजी चित्रपटसृष्टीतील कामगारांच्या मदतीसाठी ‘होप्स ८६’ या भव्य ग्लॅमरस इव्हेन्टसचे आयोजन केले होते. संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टी हजर होती. (चित्रपटसृष्टीचा महिनाभरातील संप मागे घेतल्यावरचा हा इव्हेंट होता. चित्रपटसृष्टीतील कामगारांना आर्थिक मदत करण्यासाठी हा इव्हेंट होता.) दुसर्या दिवशी शनिवारच्या इंग्रजी सायंदैनिकात अर्थात दुपारच्या वृत्तपत्रातील पहिल्याच पानावर या इव्हेन्टसच्या बातमीशेजारीच एक धक्कादायक बातमी वाचून माझ्यासारखे अनेक जण अस्वस्थ झाले. ती बातमी होती, स्मिता पाटील अत्यवस्थ. जसलोक इस्पितळात दाखल. २८ नोव्हेंबर रोजी मुलाला जन्म दिल्यानंतर काही दिवसांतच स्मिता पाटीलची तब्येत बिघडली.

मुंबईतील इंग्रजी सायंदैनिकात ही बातमी असल्याने ती काही प्रमाणात मुंबईत माहिती झाली. पण दुसर्या दिवशी रविवारच्या सकाळी सात वाजताच्या आकाशवाणीवरील मराठी बातम्यांत आणि वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर दुर्दैवी बातमी आली, स्मिता पाटीलचे निधन…. कदाचित तुम्हाला कल्पना नसेल, पण मुंबईतील कुलाबा ते विलेपार्ले याच परिसरातील वृत्तपत्रात (त्याला शहर आवृत्ती म्हणतात) ही बातमी होती. याचे कारण म्हणजे, ही घटना रात्री उशिरा घडली होती व वृत्तपत्र छपाईला गेले होते. पण ही बातमी वृत्तपत्र कार्यालयाला माहीत झाल्यावर प्रिन्टींग थांबवले आणि या बातमीला स्थान प्राप्त झाले. बातमी अनपेक्षित आणि धक्कादायक असल्याने ज्यांना ज्यांना ती माहीत झाली तशी ती इतरांपर्यंत पोहचत राहिली.
================================
हे देखील वाचा : ….ही तर उद्याची Web Series
================================
आता मी मिडियात कार्यरत होतो. नवशक्तीसाठी स्मिता पाटीलवर लेख लिहिला. त्या काळात दीपक सावंत स्मिता पाटीलचे मेकअप मन होते. त्यांच्याशी माझा उत्तम परिचय असल्याने एसेल स्टुडिओत रवि टंडन दिग्दर्शित ” नजराना” चित्रपटाच्या सेटवर त्यांनी माझी स्मिता पाटील यांच्याशी भेट करुन दिली होती. या चित्रपटात राजेश खन्ना व श्रीदेवी नायक नायिका होते. नजराना, जे. ओम प्रकाश दिग्दर्शित ” आखिर क्यो” ( गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत) आणि मोहनकुमार दिग्दर्शित ” अमृत” ( जुहू येथील एका बंगल्यात) या चित्रपटात राजेश खन्ना व स्मिता पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत आणि या चित्रपटांच्या सेटवर शूटींग रिपोर्टीगसाठी जाण्याचा योग आल्याने ते लाईव्ह अनुभव माझ्याकडे होते. ते लिहिले.
तर वांद्र्याच्या कार्टर रोडवरील प्रकाश बिल्डिंगमधील स्मिता पाटीलच्या अंत्यदर्शनाच्या बातमीसाठी मी गेलो असता राज बब्बर दूरदर्शनच्या प्रतिनिधीला स्मिता पाटीलबद्दल मुलाखत देत होता. रविवारी संध्याकाळी सात वाजताच्या मुंबई आकाशवाणीवरील बातम्यांत आणि साडेसात वाजता मुंबई दूरदर्शनवरील बातम्यांमुळे ही बातमी सगळीकडे पोहचली. या दुर्दैवी घटनेमुळे एकूणच वातावरणात एक प्रकारची उदासीनता जाणवत होती. असलो तरी अशा प्रसंगात भावनाशील होणं अगदी स्वाभाविक.

अशीच एक गोष्ट, भारतीय चित्रपटसृष्टीसाठीचा केंद्र सरकारकडून देण्यात येत असलेला दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यातच ( ३ मे १९८८) राज कपूरची तब्येत अचानक बिघडली आणि काही दिवस नवी दिल्लीतील इस्पितळात उपचार झाल्यावर मुंबईतील इस्पितळात दाखल करण्यात आले. पीटीआय, युएनआय या वृत्तसंस्थावर ही बातमी आली. राज कपूर इस्पितळात उपचार घेत असतानाच त्याच्या तब्येतीविषयी काहींना चिंता वाटत होती. ते स्वाभाविक होतेच . विशेषत: मिडियात काही हालचाल सुरु झाली. राज कपूरच्या अभिनेता , निर्माता, दिग्दर्शक, संकलक, आर. के. स्टूडिओचा मालक, तेथील होळी अशा एकूणच त्यांच्याकारकिर्दीबाबत माहिती व जुन्या फोटो यांची जुळवाजुळव सुरु झाली.
आज एका क्लिकवर सगळे काही उपलब्ध आहे. पण त्यातील माहितीपलिकडेही चित्रपटांचे मोठं जग आहे. पूर्वी असं नव्हतं पण माहितीसाठी मेहनत घेतली जाई. तेव्हा वृत्तपत्रात अडचण वेगळीच होती. लायनो कंपोझ आणि हॅन्ड कंपोझ केलेला मजकूर आणि त्याचे केलेले पान किती दिवस टिकेल? ( तोपर्यंत वृत्तपत्रात कॅम्युटर फारसा आला नव्हता.) त्यामुळे काहीच हालचाल करता येत नव्हती. अखेर २ जून १९८८ रोजी संध्याकाळी पीटीआय या वृत्त संस्थेने बातमी फ्लॅश केली, राज कपूरचे निधन…. दुसऱ्या दिवशी चेंबूरच्या आर. के. काॅटेजमध्ये जाऊन राज कपूरची ॳतयात्रा वगैरे रिपोर्टीग सुरू…

आता अलिकडच्या काळातील एक गोष्ट, तुम्हालाही माहित्येय विक्रम गोखले यांचे आजारपण आणि दुर्दैवाने त्यात त्यांचे झालेले निधन यात एकूणच मिडिया/सोशल मिडियात जो काही सावळागोंधळ (की तमाशा?) झाला तो अतिशय चीड आणणारा, असंवेदनशील, आणि अशोभनीय असाच होता हे तुमच्याही लक्षात आले असेलच. पूर्वी फक्त मुद्रित माध्यमे होती आणि कोणाच्याही निधनाची बातमी देताना अतिशय जबाबदारीने आणि पूर्ण खात्री करुनच दिली जाई. महत्वाचे म्हणजे, कोणालाही कसलीही कशाही बाबतीत घाई नसे. एकूणच सामाजिक, कौटुंबिक, सांस्कृतिक जीवन अतिशय सावकाशीने चालत असल्याने तोच वेग वृत्तपत्र आणि वाचक या नात्यात होता. कोणत्याही क्षेत्रातील लहान मोठी व्यक्ती असू देत, त्यांच्या निधनाचे वृत्त पूर्ण खात्री करुन झाल्यावरच दिले जात असे आणि मनोरंजन क्षेत्रातील व्यक्ती असेल ( विशेषत: स्टार) तर निधनाच्या बातमीसह त्या स्टारची एकादी काॅन्ट्रोव्हर्सी, वादग्रस्त गोष्टी दिल्या जात नसत. ते मुख्य प्रवाहातील नाही असा अलिखित संकेत वा नियम होता. सभ्यता पाळली जाई. मीनाकुमारी ( ३१ मार्च १९७२), बलराज साहनी ( १३ एप्रिल १९७३) यांच्या निधनाचे वृत्त देताना त्यांच्या खाजगी आयुष्याची अजिबात वाच्यता झाली नव्हती. त्यांनी आपल्या कुटुंबासाठी किती संपत्ती ठेवलीय अशी बातमी झाली नव्हती. त्यांची रुपेरी कर्तबगारी महत्वाची गोष्ट होती. त्यावर फोकस होता.
================================
हे देखील वाचा : Sholay पुन्हा आला, मिनर्व्हाच्या आठवणी जाग्या झाल्या…..
================================
मीनाकुमारीच्या निधनाने निर्माण झालेल्या सहानुभूतीने तत्पूर्वीच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या कमाल अमरोही दिग्दर्शित ‘पाकिजा’ या चित्रपटाची गर्दी वाढली. मीनाकुमारीची भूमिका असलेला शेवटचा चित्रपट या भावनेने ‘पाकिजा’ पाहिला गेला. मराठा मंदिर चित्रपटगृहात त्याने पन्नास आठवड्यांचा मुक्काम केला. मला आठवतय, संजीवकुमारच्या निधनाच्या वेळी ( ६ नोव्हेंबर १९८५) त्याची भूमिका असलेले असे सत्तरच्या दशकातील राजा और रंक, खिलौना , मनचली, अनहोनी, कोशिश, आंधी , विश्वासघात, मौसम, शोले असे चित्रपट आता एक आठवड्यासाठी रिपिट रन आणि मॅटीनी शोला रिलीज झाले. अशी दु:खद घटना घडते तेव्हा अशा कलाकाराच्या महत्वाच्या कलाकृती आपण पुन्हा पहाव्यात अशीच रसिकांची भावना असते. तीही एक श्रद्धांजलीच.

पण आज असे वातावरण खरंच आहे का? का नाही? सोशल मिडियाच्या काळात ‘भरभर मेसेज फॉरवर्ड ‘ संस्कृतीने गोंधळ वाढत चाललाय. विशेषत: निधनाचे वृत्त समजताच ते आपण कधी इतरांना शेअर करतोय अशी एक मानसिक सवय (?) एस्टॅब्लिज झाली आहे असे वाटते. , धर्मेंद्रच्या बाबत तर कांहीनी कसलीच खात्री करुन न घेता ट्वीट केले. असरानीबद्दलही अशीच एकदा बातमी पसरली होती. ( काही महिन्यांनी तसं घडलं) हे सगळेच धक्कादायक आहे. यात कसली घाई? आपल्याच क्षेत्रातील एका कलाकाराच्या बाबतीत वस्तुस्थिती जाणून घेण्याचीही तसदी काहींनी घेऊ नये हे आश्चर्याचे. हे असे वागले तर जनसामान्यांची काय कथा? दुर्दैवाने कसलीही खात्री करुन न घेता काही वृत्तपत्रांच्या डिजिटल आवृत्तीतही बातमी दिली जाते आणि सामाजिक सांस्कृतिक गोंधळात भर पडते. अरेरे…. कॉपी पेस्ट संस्कृतीच कसं होणार हो…
भविष्यात असा हा सावळागोंधळ कसा नियंत्रणात येणार हा सर्वात अवघड प्रश्न आहे. आणि त्याचे उत्तर कोणाहीकडे नसले तरी एक उपाय आहे, कोणत्याही कलाकाराच्या नातेवाईक व डाॅक्टर यांनी अधिकृत माहिती दिल्याशिवाय अगदी कोणीही अशी दु:खद बातमी कोणालाही सांगूच नये. तात्पर्य, स्वतःला अशा बाबतीत शिस्त लावून घेणे आवश्यक आहे. पण ते खरंच जमेल का? की वेगाची नि स्पर्धेची नशा असाच गोंधळ गडबड कायम ठेवणार?. काळ बदलला, माध्यमे बदलली, वेग वाढला आणि म्हटले तर गोंधळही वाढला. मृत्यूच्या बाबतीत तरी असं होई नये इतकेच.