
अहंकारातून भूमिका नाकारली आणि आयुष्यभर पश्चाताप करत बसावे लागले!
‘कर्मा हिट्स बॅक’ असं म्हटलं जातं. आपण केलेलं कृत्य उलट दिशेने आपल्याकडे येत असते. बॉलीवूड मध्ये याची अनेक उदाहरणे आहेत. 1970 साली मोहन सैगल यांच्या ‘सावन भादो’ या चित्रपटातून हिंदी सिनेमात पदार्पण करणाऱ्या हँडसम अभिनेता नवीन निश्चल च्या बाबत असं झालं होतं. हा सिनेमा सुपर डुपर हिट झाला होता आणि एकदम नवीन निश्चल यांचा मार्केट व्हॅल्यू वाढला होता. राजेश खन्ना चा वारस म्हणून त्याच्या कडे पाहिले जावू लागले होते. पण हे यश त्याला सांभाळता आले नाही. ज्या वेगाने तो वर गेला त्याच वेगाने तो खाली आला. यशाच्या धुंदीत त्याच्याकडून झालेल्या चुका त्याला आयुष्यभर छळत राहिल्या.
11 जुलै 1946 या दिवशी लाहोर पंजाब येथे जन्म झालेल्या नवीन निश्चल यांना सिनेमात काम करायचे होते म्हणून ते मुंबईला आले. त्यांच्या वडिलांचे मित्र मोहन सैगल यांनी त्यांना पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन प्रॉपर अभिनयाचे शिक्षण घ्यायला सांगितले. नवीन ने इथे गोल्ड मेडल मिळवले आणि ते मायानगरीत आले. देखण्या नवीन ला मोहन सैगल यांनी शब्द दिल्या प्रमाणे ‘सावन भादो’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत इंट्रोड्यूस केले. सोबत रेखा होती. संगीतकार सोनिक ओमी यांचे फडकते संगीत (कान मे झुमका ताल में ठुमका , सुन सुन ओ गुलाबी कली ) आणि नवीन निश्चल – रेखाची देखणी जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. सिनेमा प्रचंड यशस्वी झाला.
1971 साली नवीन निश्चल यांना पाच चित्रपट मिळाले. बुढ्ढा मिल गया, नादान, संसार, गंगा तेरा पाणी अमृत आणि परवाना.. या सर्व चित्रपटांना चांगले यश मिळाले. ‘ परवाना’ या चित्रपटात तर अमिताभ बच्चन यांची निगेटिव्ह भूमिका होती. पहिल्याच सिनेमातील यश नवीन च्या डोक्यात गेले होते. ‘परवाना’ या सिनेमाच्या शूटिंग च्या दरम्यान अमिताभला अतिशय वाईट ट्रीटमेंट नवीन निश्चल यांच्याकडून मिळत होते. तो अमिताभ ला काडी ची ही किंमत तर देत नव्हताच त्याचा पदोपदी त्याचा अपमान करत होता. त्याच्या डान्स स्टेप्स ची खिल्ली उडवत होता. पुढची तीन-चार वर्ष नवीन निश्चल यांचा ऑरा जबरदस्त होता. व्हिक्टोरिया नं 203, धुंद, हंसते जखम, धर्मा हे सर्व सिनेमे बंपर हिट झाले होते.
================================
हे देखील वाचा: ….. आणि Yash Chopra यांच्या आग्रहाने जावेद अख्तर गीतकार बनले!
=================================
1973 साली दिग्दर्शक यश चोप्रा यांनी नवीन निश्चल ला ‘दिवार’ या चित्रपटातील शशी कपूरचा चा रोल ऑफर केला होता. पण ही भूमिका नवीन निश्चल यांनी नाकारली. याचे कारण असे होते की ‘परवाना’(1971) या चित्रपटामध्ये तो स्वतः प्रमुख नायक होता तर अमिताभ सह नायक होता. ज्या कलाकाराने माझ्या सोबत सह नायकाचे काम केले त्यांचा सह नायक म्हणून मी कसे काम करू? या अहंकारातून त्यांनी ही भूमिका नाकारली. पुढे यश चोप्रा यांनी ही भूमिका शशी कपूरला दिली. चित्रपट यशस्वी झाला. आता पश्चाताप करण्याची पाळी नवीन निश्चल यांची होती. यशाची मस्ती आणि अहंकारातून त्याने ही भूमिका स्वत:च्या हाताने गमावली. असे म्हणतात मनोज कुमार यांच्या ‘रोटी कपडा और मकान’ या चित्रपटात देखील नवीन निश्चल याला भूमिका मिळणार होती पण त्याने ती देखील नाकारली.
================================
हे देखील वाचा : नासीर हुसेन यांनी Amitabh Bachchan यांना ‘यादों की बारात’ मधून का डच्चू दिला होता?
================================
दुसरीकडे अमिताभ बच्चन यांनी सुरुवातीच्या अर्धा डझन अयशस्वी सिनेमानंतर अपमान अवमान सहन करत आपल्या कर्तृत्वावर प्रचंड मोठे यश मिळवले. सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात नवीन निश्चल यांच्या यशाचा ग्राफ हळूहळू खाली येऊ लागला. अगदी सह नायका पेक्षाही छोट्या भूमिका त्यांना कराव्या लागल्या. किंवा बी आणि सी ग्रेड सिनेमात भूमिका त्यांना मिळू लागल्या. 1980 साली दिग्दर्शक मनमोहन देसाई ‘देशप्रेमी’ हा चित्रपट बनवत होते यात त्यांनी अमिताभच्या सोबत त्यांना कास्ट केले. नवीन निश्चल यांनी लगेच ही भूमिका स्वीकारली. आता नवीन निश्चल यांना कळून चुकले होते की अमिताभ बच्चन यांच्या सिनेमात ही भूमिका आपल्याला मिळते आहे हीच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ‘कर्मा हिट्स बॅक’ असे जे म्हणतात ते नवीन निश्चल यांच्याकडे पाहून लगेच पटते!