अग्निपथाचा पांथस्थ….. हरिवंशराय बच्चन (Harivansh Rai Bachchan)
हरिवंशराय बच्चन (Harivansh Rai Bachchan) यांना हिंदी भाषेतील सुप्रसिद्ध कवी म्हणून ओळखले जाते. हिंदी साहित्यामध्ये त्यांनी अनमोल योगदान दिले आहे. त्यांच्या योगदानाचा सन्मान करत, भारत सरकारने १९७६ साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविले होते.
“यह महान दृश्य है
चल रहा मनुष्य है,
अश्रु .. स्वेद .. रक्तसे ..
लथपथ ! लथपथ ! लथपथ !
अग्निपथ ! अग्निपथ ! अग्निपथ !”
अमिताभ बच्चनच्या खर्जाच्या आवाजात ‘अग्निपथ’ सिनेमाच्या क्लायमॅक्सला ही कविता थिएटरमध्ये घुमली. त्यासरशी सर्व प्रेक्षकांच्या अंगावर एकच रोमांच उमटले. धुमसणार मांडवा गाव, रक्ताळलेला विजय दीनानाथ चौहान आणि त्याची अगतिक आई सुहासिनी चौहान…!
एखादी कविता मूर्त स्वरूपात इतकी प्रत्ययकारी पडद्यावर साकारली गेली असेल, याचे दुसरे उदाहरण लवकर आठवत नाही. या कवितेचे कवी होते, दस्तुरखुद्द अमिताभ बच्चनचे वडील ‘कविवर्य हरीवंशराय बच्चन!’
हरिवंशराय बच्चन (Harivansh Rai Bachchan) यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात २७ नोव्हेबर १९०७ रोजी उत्तरप्रदेशमधल्या अलाहाबादमधील (सध्याच्या प्रयागराजमध्ये) प्रतापगढ येथे एका छोट्या गावात झाला होता. वडिलांचे नाव प्रतापनारायण तर आईचे नाव सरस्वतीदेवी. अलाहाबाद विश्वविद्यापीठ, बनारस हिंदू विश्वविद्यापीठ येथे आपले उच्चशिक्षण घेतल्यानंतर हरिवंशराय यांनी लंडनच्या मानांकित केम्ब्रिज विश्वविद्यालयाच्या सेंट कॅथेरीन महाविद्यालयातून प्रख्यात इंग्लीश कवी डब्ल्यू.बी.यीटसच्या कवितांवर पीएचडी प्राप्त केली.
हरिवंशराय यांचं मूळ आडनाव ‘श्रीवास्तव’, पण विद्रोही बाणा त्यांच्या स्वभावात इतका भिनला होता की, आयुष्याच्या एका वळणावर जातीप्रथेविरुद्ध आवाज उठविण्यासाठी एक पाऊल म्हणून स्वतःच्या ब्राह्मण जातसुचक आडनावाला तिलांजली देत त्यांनी ‘बच्चन’ हे आपलं बालपणीचं टोपण नावच आडनाव म्हणून स्वीकारलं.
हरिवंशराय यांच्या पहिल्या पत्नीचे (श्यामा बच्च्ननचे) निधन लग्नानंतर अवघ्या दहा वर्षात झाले. तिच्या मृत्यूनंतर आयुष्यात आलेल्या एकाकीपणाचे प्रतिबिंब त्यांच्या तत्कालीन काव्यरचनांतून देखील पहावयास मिळते. पुढे तेजी सुरी एका शीख युवतीशी दुसरा विवाह करत त्यांनी धर्माच्या भिंतीसुद्धा दूर सारल्या. स्वातंत्र्यपूर्व काळातील सामाजिक जीवन लक्षात घेतले, तर त्यांच्या धाडसी कृत्याचे मोल लक्षात येते.
१९३२ साली त्यांचा ‘तेरा हार’ हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. १९३५ साली प्रकाशित झालेला त्यांचा ‘मधुशाला’ हा काव्यसंग्रह हिंदी साहित्यप्रेमींमध्ये खूप लोकप्रिय झाला. त्याबरोबरच मधुबाला, मधुकलश, आकुल अंतर, सतरंगिनी, निशा निमंत्रण इत्यादी काव्यसंग्रहदेखील लोकप्रिय ठरले. वैचारिक लेखनही त्यांनी विपुल प्रमाणात केले. शेक्सपियरच्या ‘मेक्बेथ आणि ऑथेल्लोचा’ हिंदी अनुवाद देखील त्यांनी केला आहे.
हरिवंशराय बच्चन (Harivansh Rai Bachchan) यांची आत्मकथा “क्या भुलू क्या याद करू”, “नीडका निर्माण फिर”, ‘बसेरेसे दूर” आणि “दशद्वारसे सोपान तक” अशी चार खंडात प्रकाशित झाली आहे.
१९४१ ते १९५२ या प्रदीर्घ काळात त्यांनी अलाहाबाद विश्वविद्यालयात अध्यापनाचे कार्य केले. हे करत असतानाच मुन्शी प्रेमचंद, रामधारी दिनकर, सुमित्रानंदन पंत, सारख्या दिग्गजांनी समृद्ध केलेल्या हिंदी साहित्याच्या दालनालाही ते तेवढेच योगदान देत राहिले.
१९५५ साली केम्ब्रिजमधून परत आल्यानंतर भारत सरकारने हिंदी तज्ज्ञ म्हणून परराष्ट्र मंत्रालयात नेमणूक देखील केली. पुढे १९६६ मध्ये राज्यसभा सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. १९६८ साली ‘दो चट्टाणे’ या त्यांच्या काव्यसंग्रहासाठी त्याना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
=====
हे ही वाचा: आशा पारेखला मिळालेलं एकमेव फिल्मफेअर अवार्ड आणि मुमताजची नाराजी
=====
१९७६ साली पद्मभूषण हा भारत सरकारचा मानाचा पुरस्कार त्याना देण्यात आला. व्यक्तिवाद, रहस्यवाद, मानवतावाद ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये होती. संस्कृतप्रचुर काव्यरचना हे त्यांच्या लेखनाचे आणखी एक वैशिष्ट्य !
‘बजी न मंदिर में घड़ियाली, चढ़ी न प्रतिमा पर माला,
बैठा अपने भवन मुअज्ज़िन देकर मस्जिद में ताला,
लुटे ख़जाने नरपितयों के गिरीं गढ़ों की दीवारें,
रहें मुबारक पीनेवाले, खुली रहे यह मधुशाला।’
अशा ओघवत्या शैलीत मधुशालेचे वर्णन करणारे हरिवंशराय बच्च्चन वैयक्तिक आयुष्यात मात्र निर्व्यसनी होते.
जीवन में एक सितारा था, माना वह बेहद प्यारा था
वह डूब गया तो डूब गया, अंबर के आंगन को देखो
कितने इसके तारे टूटे, कितने इसके प्यारे छूटे
जो छूट गए फिर कहाँ मिले, पर बोलो टूटे तारों पर
कब अंबर शोक मनाता है, जो बीत गई सो बात गई
अशा एखाद्याच्या जीवनप्रवासाचे लालित्यपूर्ण वर्णन त्यांच्या कवितांमधून दिसून येते.
एकीकडे वास्तवाचे भान असलेली कविता लिहिताना ते म्हणत –
हम क्या हैं जगती के सर में! जगती क्या, संसृति सागर में!
एक प्रबल धारा में हमको लघु तिनके-सा बहना होगा!
साथी, सब कुछ सहना होगा!
तर दुसरीकडे दुर्दम्य आशावादी कविता लिहिताना ते म्हणतात –
जग के पथ पर जो न रुकेगा, जो न झुकेगा, जो न मुडेगा,
उसका जीवन, उसकी जीत ।चल मरदाने, सीना ताने,
हाथ हिलाते, पांव बढाते, मन मुस्काते, गाते गीत ।
हरिवंशराय बच्चन यांच्या कविता वाचताना एखाद्या प्रवाशाने आपल्या धुंदीत संकटांची पर्वा न करता मनमुराद प्रवास करावा असा आनंद मिळतो. म्हणूनच आज त्यांच्या पुण्यस्मरणाच्या दिनी त्यांच्या कविता गुणगुणत म्हणावसे वाटते.
तू न थकेगा कभी, तू न रुकेगा कभी,
तू न मुड़ेगा कभी,
कर शपथ, कर शपथ, कर शपथ,
अग्निपथ अग्निपथ अग्निपथ।
– सौरभ रत्नपारखी
=====
हे ही वाचा: आणि अमिताभ अक्षरश: रडकुंडीला आला!
=====