
Ankush Chaudhari प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अंकुश चौधरी बनला मराठी सिनेसृष्टीतील हँडसम अभिनेता
मराठी सिनेविश्वातील हँडसम अभिनेता अशी ओळख असलेला सगळ्यांचा लाडका अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. अंकुशने स्वतःच्या हिंमतीवर मनोरंजनविश्वात आपले स्थान निर्माण केले आहे. आज अंकुश त्याचा ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अंकुशने स्वतःचे विश्व निर्माण केले आहे. विशेष म्हणजे आज अंकुश त्याचा वाढदिवस साजरा करतोय सोबतच आज त्याच्या लग्नाचा देखील वाढदिवस आहे. जाणून घेऊया अंकुश चौधरीबद्दल अधिकची माहिती. (Ankush Chaudhari)
३१ जानेवारी १९७३ साली एका मध्यमवर्गीय कुटुंबात मुंबईमध्ये अंकुश चौधरीचा जन्म झाला. अंकुश चौधरींचे बालपण आर्थिक तंगीमध्ये गेले. घराला आर्थिक मदत करण्यासाठी त्याने खूप कमी वयातच भाजी आणि फळे विकण्यास सुरुवात केली. तो चाळीत राहत असल्याने विविध मोठ्या सणांच्या वेळी तो नेहमीच स्पर्धांमध्ये, अभिनयामध्ये सहभाग घ्यायचा. यातूनच त्याचा अभिनयाकडे कल वाढला. त्याने या स्पर्धांमधून अनेक बक्षिसं जिंकली. (Ankush Chaudhari Birthday)

पुढे शाहीर साबळे यांच्या कार्यक्रमात अंकुश चौधरीला डान्स करायची मोठी संधी मिळाली. त्यांच्या कार्यक्रमामध्ये अंकुश डान्स करायचा. या कार्यक्रमातच अंकुशची भरत जाधव केदार शिंदे आणि संजय नार्वेकर यांच्याशी घट्ट मैत्री झाली. त्यानंतर त्यांनी एकांकिकेत काम करायला सुरुवात केली. त्यांचे ऑल द बेस्ट हे नाटक फार गाजले. याच नाटकाने अंकुशला एक अभिनेता म्हणून स्थापित केले. नाटकांमध्ये यश मिळवत असताना त्याने मालिकांकडे आपला मोर्चा वळवला. (Latest Marathi News)
अंकुश चौधरीने १९९९ साली ‘हसा चकट फु’ या विनोदी मालिकेत काम केले. ही मालिका आणि अंकुशचा अभिनय तुफान गाजला. यानंतर अंकुश हळूहळू चित्रपटांकडे वळला. त्याचा पहिला सिनेमा होता, ‘सुना येति घरा’ मात्र हा सिनेमा यशस्वी झाला नाही. त्यानंतर त्याने गोविंदाची मुख्य भूमिका असलेल्या ‘जिस देश मैं गंगा रहता है’ या सिनेमात गोविंदाच्या भावाची भूमिका साकारली. या सिनेमाने त्याला ओळख मिळवून दिली. पुढे तो पुन्हा मराठी चित्रपटांकडे वळला.

अंकुशला मराठीमध्ये ओळख मिळवून दिली ती सावरखेड एक गाव या सिनेमाने. या सिनेमानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. त्यानंतर त्याने आईशपथ, आईला रे, मातीच्या चुली, यंदा कर्तव्य आहे, माझा नवरा तुझी बायको, चेकमेट आदी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. अभिनयासोबतच त्याने दिग्दर्शन करायचे देखील ठरवले आणि त्याने भरत जाधव, मकरंद अनासपुरे, अशोक सराफ यांची भूमिका असलेला २००७ साली आलेला ‘साडे माडे तीन’ (Saade Made Teen) हा सिनेमा दिग्दर्शित केला. या सिनेमाला अफाट यश मिळाले.
पुढे २०१२ साली आला त्याचा ब्लॉकबस्टर सिनेमा ‘दुनियादारी‘ अंकुशने या सिनेमात डीएसपी अर्थात दिगंबर शंकर पाटील ही भूमिका साकारली होती. हा मालती स्टारर सिनेमा तुफान गाजला. त्यानंतर तो अनेक चित्रपटांमध्ये दिसला. नो एन्ट्री, झकास, ब्लफमास्टर, रिंगा रिंगा, लालबाग परळ, क्लासमेट, डबल सीट, दगडी चाळ,गुरु, ती सध्या काय करते, धुराळा आदी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. यासोबतच त्याने अनेक टीव्ही शोचे सूत्रसंचालन देखील केले आहे. तर काही शोमध्ये त्याने जज म्हणून देखील काम पाहिले.

आज अंकुशच्या वाढदिवसासोबतच त्याच्या लग्नाचा देखील वाढदिवस आहे. अंकुशने अभिनेत्री दीपा परबसोबत २००७ साली लग्न केले. दीपा आणि अंकुश यांची प्रेमकहाणी खूपच रंजक आहे. अंकुशने दीपाला एकदम फिल्मी स्टाइलमध्ये प्रपोज केले. दिपा परब आणि अंकुश चौधरी यांचं शिक्षण एकाच कॉलेजमध्ये झालं. मुंबईच्या महर्षी दयानंद कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अंकुश आणि दिपा यांची ओळख अभिनयामुळेच झाली होती.
======
हे देखील वाचा : Ramesh Deo मराठी मनोरंजनविश्वातील राजबिंडा ‘खलनायक’ रमेश देव
Preity Zinta उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच हुशार बिसनेसवूमन आहे ‘डिंपल गर्ल’ प्रीती झिंटा
======
दोघांनाही अभिनयाची प्रचंड आवड त्यामुळे कॉलेजच्या नाटक-एकांकिकांमुळे या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि मग हळूहळू या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. कॉलेजमध्ये असताना या दोघांनीही अनेक नाटकांमध्ये एकत्र काम केले होते. अंकुश चौधरी आणि दीपा परब एकमेकांना १० वर्षे डेट करत होते. परळच्या ब्रिजवर अंकुश दीपाचा पाठलाग करत गेला आणि आजूबाजूला गर्दी असतानाच मध्येच गुडघ्यावर बसून दीपाला फुल देत त्याने लग्नाची मागणी घातली होती. दीपालाही अंकुश आधीपासून आवडत होता त्यामुळे तिने नकार त्याचा प्रश्नच नव्हता. त्यानंतर त्यांनी २००७ मध्ये लग्न केले होते. त्यांच्या लग्नाला १८ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या दोघांना प्रिन्स नावाचा एक मुलगा देखील आहे.