
Chhoti Si Baat ची पन्नाशी; हलक्या फुलक्या मनोरंजनाची गोडी
चित्रपटाच्या इतिहासात डोकावताना कधी कधी काही वेगळेच घडल्याचे दिसते. आणि तीच चित्रपटाच्या ‘खेळी’ तील गंमत जंमत आहे. त्यातला एक फंडा म्हणजे, एकादा चित्रपट फारशी टामटूम न करता, ढीगभर मुलाखतीचे वाटप न करता पडद्यावर येतो, समिक्षक त्याचे कौतुक करतात, चित्रपट रसिक तो पाहतात, त्यांना तो आवडतो आणि मला आवडला, तू देखील बघ, छान चित्रपट आहे असे आपल्या मित्रांना आवर्जून सांगतात, ही प्रसिद्ध खूप खूप महत्वाची. हळूहळू त्या चित्रपटाची गर्दी वाढत वाढत जाते, चित्रपट रौप्य महोत्सवी यश संपादन करतो. यशाची ही गोष्ट एवढ्यावरच थांबत नाही तर सतत वेगवेगळ्या संदर्भात त्या चित्रपटाची आठवण काढली जाते आणि आता ती ‘छोटीसी बात’ न राहता, केवढी तरी मोठी नवलाईची गोष्ट ठरते. असे चित्रपट जास्त लक्षात राहतात.
तात्पर्य, चित्रपटात एक कथासूत्र असावं, दिग्दर्शकाकडून त्याची अतिशय उत्तम मांडणी असावी, ते रसिकांना आवडावे, मग काय? यशच यश. चित्रपट गुणवत्तेवर यशस्वी ठरतो ही अलिखित व्याख्या आहे. बी. आर. फिल्मच्या, बी. आर. चोप्रा निर्मित आणि बासू चटर्जी दिग्दर्शित ‘छोटीसी बात’ या स्वच्छ मनोरंजक चित्रपटाबाबत हेच तर झाले. हा चित्रपट ३१ डिसेंबर १९७५ रोजी सेन्सॉर संमत झाला आणि मुंबईत ९ जानेवारी १९७६ रोजी प्रदर्शित झाला, त्याला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. मुंबईत अप्सरा (मॅटीनी शो), लिबर्टी आणि अन्य चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. आणि एका स्वच्छ मनोरंजक चित्रपटाला रसिकांनी स्वीकारले.
‘छोटीसी बात’ प्रदर्शित झाला तेव्हा रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ (१९७५) ची अक्राळविक्राळ क्रेझ, सतराम रोहरा निर्मित आणि विजय शर्मा दिग्दर्शित ‘जय संतोषी मा’ (मुंबईत प्रदर्शित ३० मे १९७५) ने निर्माण केलेले भक्तीमय वातावरण आणि श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘निशांत’ (मुंबईत रिलीज ५ सप्टेंबर १९७५) या वास्तववादी चित्रपटाच्या निमित्ताने नवप्रवाहातील चित्रपटाची विशेष दखल असे भिन्न प्रवाह असताना त्यात एक मध्यममार्ग असणे आवश्यक होते. याचं कारण देमार घेमार ढिश्यूम ढिश्यूम मारधाड ऍक्शन चित्रपट सर्वांनाच पचनी पडत नव्हते ( पन्नास वर्षांपूर्वीचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, माध्यम पूर्णपणे वेगळे होते. देशात आणीबाणी लागू झाली होती हेही लक्षात घ्यायला हवे) आणि त्याच वेळी नवप्रवाहातील चित्रपट हे बोजड, क्लिष्ट असे मानत त्यापासून दूर राहणाराही एक प्रेक्षकवर्ग होता. या वातावरणात सरळमार्गी चित्रपट पाहणारा एक प्रेक्षकवर्ग होता.

‘छोटीसी बात’ आपण पुन्हा पुन्हा एन्जॉय केला आहेच. या चित्रपटातील एक विशेष प्रसंग सांगायला हवा. मुंबईपासून काही मैलावरील खंडाळ्यात राहणारा रिटायर्ड कर्नल ज्युलियस नागेंद्रनाथ विल्फ्रेड (दादामुनी अशोककुमार) यांनी स्वतःसुद्धा बहुधा त्याच्या आयुष्यात एका ‘प्रभा’चं (विद्या सिन्हा) प्रेम गमावलंय आणि म्हणून त्याला आता सरळमार्गी आदर्शवादी अरुणला ( अमोल पालेकर) ही संवेदनशील , उत्कटतेने व्यक्त होणारी ‘प्रभा’ मिळावी आणि त्यांची ताटातूट होऊ नये असं मनापासून वाटतंय. म्हणून तर एका भेटीत त्याचे आणि प्रभाचे संवाद फार रंगतदार आहेत. या चित्रपटाचं जणू व्यक्तीमत्व सांगणारे आहेत.
कर्नल : प्रभा, बडा प्यारा नाम है तुम्हारा. तुम अरुण को कब से जानती हो?
प्रभा : यहीं कुछ थोडे दिनों से..
कर्नल : कैसा लडका है? मुझे तो बहोत पसंद है. तुम्हें?
प्रभा : अच्छा है।
कर्नल : मैं जानना चाहता था, तुम्हें पसंद है या नाही?
प्रभा : चलिये चलते है…
कर्नल : इसका मतलब है तुम्हे पसंद नहीं?
प्रभा : ये बात नहीं..
कर्नल : मैं समझता हूँ, सवाल बडा टेढा है। एक बात कहता हूँ प्रभा। तुम्हारा नाम सुन के एक बडी पुरानी बात याद आ गयी। एक लडकी थी जिसका नाम इत्तेफाक से प्रभा था। एक लाडका उस से बहुत प्यार करता था। लेकीन जिंदगी में दोनो मिल नही पाये।
प्रभा : क्यूँ नहीं मिल पाये?
कर्नल : उन्हें मिलना चाहिये था ना?
प्रभा : हां, अगर दोनो का प्यार सच्चा था, तो जरूर मिलना चाहिये था।
कर्नल : यही मैं तुमसे सुनना चाहता था…
कर्नलच्या ट्रेनिंगने मिळालेल्या एका नवीन आत्मविश्वासाने आणि एकमेकांविषयी आकर्षण, असोशी असलेल्या प्रीतीने अरुण आणि प्रभा एकत्र येतात आणि या खुसखुशीत खुमासदार प्रेमकथेचा शेवट गोड फळे देणारा होतो. शेवट गोड तर सगळेच गोड.
================================
================================
या चित्रपटाच्या यशाने बासू चटर्जी शैलीतील हलक्या फुलक्या मनोरंजनाची वाटचाल अधिक रुळली. ह्रषिकेश मुखर्जी, गुलजार यांनी ती अधिक एस्टॅब्लिश केली. बी. आर. चोप्रा दिग्दर्शित ‘पती पत्नी और वो’, रजत रक्षित दिग्दर्शित ‘दामाद’ हे मजेशीर चित्रपट यात सपोर्ट सिस्टीम ठरले. ‘छोटीसी बात’च्या यशाने अमोल पालेकर स्टार झाले. खरं तर बासू चटर्जी यांनी ‘पिया का घर’ (१९७२) या चित्रपटाच्या वेळी अमोल पालेकरना नायकाच्या भूमिकेसाठी विचारले असता त्यांनी नकार दिला. राजा ठाकूर दिग्दर्शित ‘मुंबईचा जावई’ या लोकप्रिय मराठी चित्रपटाची ही रिमेक आहे. ती भूमिका अनिल धवनला मिळाली. बासू चटर्जी दिग्दर्शित ‘रजनीगंधा’ (मुंबईत आकाशवाणी चित्रपटगृहात १३ सप्टेंबर १९७४ रोजी प्रदर्शित) मधील भूमिका स्वीकारून अमोल पालेकर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले.. तोपर्यंत अमोल पालेकर मराठी चित्रपटसृष्टीत छान कार्यरत झाले होते. हिंदीत त्याना ग्लॅमर प्राप्त झाले…. ‘छोटीसी बात’ हा त्यातील महत्वाचा चित्रपट.