Govinda वर चित्रित एका सॅड सॉंगच्या निर्मितीचा भन्नाट किस्सा!

Khushboo Movie : बेचारा दिल क्या करे…!
गुलजार यांची दिग्दर्शनात तरी राजेश खन्ना व अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा विनोद खन्ना व जितेंद्र यांच्यावर विशेष मर्जी होती असे दिसते. तसे का हे त्यांनी कधीच सांगितलेले नाही.त्यांनी आपल्या दिग्दर्शनातील ‘मेरे अपने’, ‘अचानक’, ‘मीरा’, ‘लेकिन या चित्रपटात विनोद खन्नाला तर ‘परिचय’, ‘किनारा’,’खुशबू’ या चित्रपटात जितेंद्रला संधी दिली. ‘परिचय’मध्ये विनोद खन्ना पाहुणा कलाकार होताच. (Unsuni Kahani of Bollywood)

राजेश खन्नाची भूमिका असलेल्या असित सेन दिग्दर्शित ‘खामोशी’मधील गाणी गुलजार यांची, राजेश खन्ना व अमिताभ बच्चन यांची भूमिका असलेल्या ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘आनंद’ चित्रपटातील ‘मैने तेरे लिए सात रंग के सपने तेरे’ हे गाणे व संवाद गुलजार यांचे, ‘नमक हराम’ या चित्रपटातील संवादही गुलजार यांचेच. पण त्यांनी आपल्या दिग्दर्शनातील चित्रपटात राजेश खन्ना व अमिताभ बच्चन यांना संधी देणे कधीच पसंत केले नाही (अथवा तसा योगच आला नाही.का बरे?), धर्मेंद्रला घेऊन त्यांनी ‘देवदास’ या चित्रपटाचा मुहूर्त व पहिले चित्रीकरण सत्रही पार पाडले. शर्मिला टागोर व हेमा मालिनी यांच्या त्यात प्रमुख भूमिका होत्या. पण तो चित्रपट बंद पडला. त्यांच्या दिग्दर्शनातील ‘किनारा’ चित्रपटात धर्मेंद्र होता. (Entertainment News)

बहुतेक त्या काळातील राजेश खन्नाचे मानधन व अतिशय बिझी शेड्युल व अमिताभचेही अन्य दिग्दर्शनातील चित्रपटात गुंतून जाणे यामुळेच गुलजार दिग्दर्शित चित्रपटांतून राजेश खन्ना व अमिताभ कधीच दिसले नसावेत हा तर्क. संजीवकुमार गुलजार यांचा हुकमी कलाकार होता यात आश्चर्य नाही. तो वयाची अट न ठेवता व्यक्तिरेखा साकारायचा. ते त्याचे वैशिष्ट्य. जितेंद्रला गुलजार दिग्दर्शित चित्रपटांतून संधी मिळाली याची काही कारणे आहेत.

एक म्हणजे, ‘परिचय’ व ‘खुशबू’ या चित्रपटांची निर्मिती त्याचा भाऊ प्रसन्नकुमार याने तिरुपती पिक्चर्स या बॅनरखाली केली आणि हे चित्रपट त्याचा मेव्हणा रमेश सिप्पी याने बी. आर. ए. एन्टरप्रायझेस रिलीज या वितरण संस्थेच्या वतीने चित्रपटगृहात प्रदर्शित झाले. (‘शोले’चा दिग्दर्शक रमेश सिप्पी याच्याशी केवळ नामसाम्य). तात्पर्य, घरचीच निर्मिती असल्यानेच त्यात जितेंद्र. (‘किनारा’ चित्रपट प्राणलाल मेहता यांनी निर्माण केला.) आणखीन एक महत्वाचे, जितेंद्रला आपल्या जम्पिंग जॅक या इमेजबाहेर पडायचे होते, एक कसदार अभिनेता म्हणून ओळख हवी होती. (ती तीन चार चित्रपटातून काम केल्यावर येते? खरंच की काय? पण हेदेखील करावे लागते. एकाद्या कलाकाराच्या प्रगती पुस्तकात असे अनेक गुण असतात.
================================
=================================
याच जितेंद्रचा गुलजार दिग्दर्शित ‘खुशबू’ मुंबईत २० जून १९७५ रोजी प्रदर्शित झाला. मुंबईत मेन थिएटर अप्सरा. या चित्रपटाला पन्नास वर्ष पूर्ण झालीदेखिल. ‘खुशबू’ चित्रपट बंगाली चित्रपट ‘पंडित मसाई’ (१९५१ ) या बंगाली चित्रपटावर आधारित. मूळ कथा बंगाली साहित्यकार शरदचंद्र चट्टोपाध्याय यांच्या कादंबरीवर आधारित. खुशबूची पटकथा गुलजार, भूषण वनमाळी व डी. एन. मुखर्जी यांची. छायाचित्रणकार के. वैकुंठ यांचे. चित्रपटाचे कथानक डॉ वृंदावन (जितेंद्र), कुसुम (हेमा मालिनी) व लाखी (शर्मिला टागोर) या तीन प्रमुख व्यक्तीरेखांभोवती घडते. एका गावात ही गोष्ट आकार घेते. चित्रपटात असरानी, ओम शिवपुरी, फरिदा जलाल, देव किशन, दुर्गा खोटे, लीला मिश्रा, मा. राजू यांच्याशी प्रमुख भूमिका.

चित्रपटाची अतिशय उत्तम बाजू म्हणजे गुलजार यांच्या गीतांना राहुल देव बर्मन यांचे श्रवणीय संगीत. ओ मांझी रे ( पार्श्वगायक किशोरकुमार), दो नैनो में आंसू भरे है (लता मंगेशकर), घर जाऐगी तर जाऐगी (आशा भोसले), बेचारा दिल क्या करे (आशा भोसले) ही चारही गाणी आजही लोकप्रिय. बेचारा दिल क्या करे एकदम फर्मास व भन्नाट. गुलजार, आर. डी. बर्मन व आशा भोसले या केमिस्ट्रीची उत्तम मेजवानीच जणू. नुसते ऐकले तरी भारी वाटतेय. पडद्यावर फरिदा जलालने खुलवलयं.
================================
हे देखील वाचा: Samana Movie : भारतीय चित्रपटसृष्टीतील ऐतिहासिक ‘सामना’ची ५० वर्ष पूर्ण!
=================================
१९७५ हे वर्ष चित्रपटसृष्टीसाठी विशेष उल्लेखनीय. यश चोप्रा दिग्दर्शित ‘दीवार’ (२४ जानेवारी) पासून ते गाजू लागले. ते आजही गाजतेय. त्यानंतर गुलजार दिग्दर्शित ‘आंधी'(१४ फेब्रुवारी),राज खोसला दिग्दर्शित ‘प्रेम कहानी’ (७ मार्च), रवि चोप्रा दिग्दर्शित ‘जमीर’ (२१ मार्च), ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘चुपके चुपके’ (११ एप्रिल), रवि टंडन दिग्दर्शित ‘अपने रंग हजार'(२५ एप्रिल), फिरोज खान दिग्दर्शित ‘धर्मात्मा'(९ मे), रवि टंडन दिग्दर्शित ‘खेल खेल में’ (१६ मे), ‘जय संतोषी मां’ (३० मे), ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘मिली’ (२० जून), रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ (१५ ऑगस्ट), सोहनलाल कंवर दिग्दर्शित ‘संन्याशी’ (५ डिसेंबर), रणधीर कपूर दिग्दर्शित ‘धरम करम’ (१२ डिसेंबर), दुलाल गुहा दिग्दर्शित प्रतिज्ञा’ (१९ डिसेंबर), गुलजार दिग्दर्शित ‘मौसम’ (२६ डिसेंबर) असे अनेक. म्हणजेच एकाच वर्षात गुलजार दिग्दर्शित चक्क तीन चित्रपट प्रदर्शित. त्यातील आंधी आणीबाणीत बंदी आल्याने गाजला. मौसम संजीवकुमार व शर्मिला टागोर यांचा अभिनय व मदन मोहन यांच्या संगीताने गाजला (छडी रे छडी कैसे गले मे पडी),आणि खुशबू वेगळाच ठरला. जितेंद्रसाठी व त्याच्या चाहत्यांसाठी….