
‘या’ सिनेमात पहिल्यांदा मोहम्मद रफी यांनी Rishi Kapoor यांच्यासाठी पार्श्वगायन केले!
सत्तरच्या दशकातील चॉकलेट हिरो ऋषी कपूर यांचा रुपेरी पडद्यावर प्रवेश बालकलाकार म्हणून झाला. १९५५ साली प्रदर्शित झालेल्या ‘श्री ४२०’ आणि त्यानंतर ‘मेरा नाम जोकर’ (१९७०) यात त्यानी बालकलाकार म्हणून काम केले. ‘मेरा नाम जोकर’ चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. नायक म्हणून त्यांचा रुपेरी प्रवेश १९७३ साली आलेल्या ‘बॉबी’ या चित्रपटातून झाला. हा चित्रपट संपूर्ण देशभर प्रचंड गाजला. ‘टीन एज लव स्टोरी’चा या सिनेमापासून प्रारंभ झाला. नव्या तरुण नायकासाठी म्हणजेच ऋषी कपूर साठी शैलेंद्रसिंग या फ्रेश पार्श्वगायकाला निवडले गेले. ‘बॉबी’ ची गाणी प्रचंड गाजली. (Rishi Kapoor Movies)

यानंतर पुढच्या अनेक चित्रपटात शैलेंद्रसिंग हाच ऋषी कपूरचा आवाज राहिला. पण पुढे काही सिनेमांमध्ये किशोर कुमार हे देखील ऋषी कपूर साठी पार्श्वगायन करू लागले. ‘जहरीला इन्सान’ (१९७४) या चित्रपटातील ‘ओ हंसिनी…’ या गाण्यापासून या दोघांची जोडी जमली. पण १९७६ साली आलेल्या ‘लैला मजनू’ या चित्रपटात मात्र पहिल्यांदा ऋषी कपूर साठी मोहम्मद रफी यांचा प्लेबॅक वापरला गेला. खरंतर चित्रपटाचे निर्माते आणि स्वत: ऋषी कपूर यांनी याला विरोध केला होता. कारण त्यांच्यामते रफीचा आवाज ऋषीला काही सूट होणार नाही.

चित्रपटाचे निर्माते नायडू यांना देखील या चित्रपटासाठी ऋषी कपूरसाठी किशोर कुमार यांचा प्लेबॅक हवा होता. पण चित्रपटाचे संगीतकार मदन मोहन आणि चित्रपटाचे दिग्दर्शक एच एस रावेल यांनी मात्र रफीच्या नावाचा आग्रह धरला. त्यांच्या मते हा चित्रपट एक मुस्लिम सोशल सिनेमा आहे. या चित्रपटातील गाण्यांमध्ये बरेचसे उर्दू शब्द आहेत आणि मोहम्मद रफी या प्रकारची गाणी अतिशय चांगल्या पद्धतीने गाऊ शकतात. एच एस रवेल यांच्यासाठी तर मोहम्मद रफी खूप लकी गायक होते. मेरे मेहबूब, संघर्ष, मेहबूब की मेहंदी या चित्रपटातून रफी यांची गाणी प्रचंड गाजली होती. गीतकार साहिर लुधियानवी यांनी यात मध्यस्थी करून ऋषी कपूर यांना व्यवस्थित समजावून सांगितले आणि ऋषी कपूर रफीचा प्लेबॅक घ्यायला तयार झाले!या सिनेमाचे संवाद अब्रार अल्वी यांनी लिहिले होते.
================================
हे देखील वाचा : Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!
=================================
या चित्रपटाचे संगीत देत असतानाच संगीतकार मदन मोहन यांचे १४ जुलै १९७५ या दिवशी निधन झाले. या चित्रपटातील त्यांनी सात गाणी स्वरबद्ध केली होती. आणखी तीन गाण्यांचे संगीत बाकी होते. आता निर्माता दिग्दर्शकांपुढे प्रश्न निर्माण झाला. आता उरलेली गाणी कुणाकडून स्वरबद्ध करून घ्यायची? त्यांनी सर्वप्रथम संगीतकार राजेश रोशन यांना कॉन्टॅक्ट केले. परंतु त्यांनी नम्र नकार दिला. त्यांच्या मते “मदन मोहन सारख्या महान संगीतकारच्या म्युझिक पुढे मी अतिशय कमी दर्जाचा संगीतकार आहे. त्यांच्या संगीताला माझे संगीत जोडणे योग्य नाही.” यानंतर दिग्दर्शक रवेल यांनी संगीतकार जयदेव यांच्याशी संपर्क साधला आणि जयदेव संगीत देण्यासाठी तयार झाले. जयदेव यांनी या चित्रपटांमध्ये तीन गाण्यांना संगीत दिले.

पहिले गाणे होते ‘कहना एक दीवाना तेरी याद में आहे भरता है’ हे रफीच्या स्वरात गावून घेतले. त्यानंतर ‘ये दिवाने की जीद है अपने दिवाने की खातिर’ हे देखील रफीच्या आवाजात होते. जयदेव यांनी स्वरबद्ध केलेले तिसरं गाणं होतं ‘लैला मजनू दो बदन एक जान है’ ‘लैला मजनू’ या चित्रपटातील सर्वच गाणी अप्रतिम बनली होती. संगीतकार मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेली ‘बरबाद ए मोहब्बत की दुवा साथ लिये जा (रफी), तेरे दर पे आया है कुछ करके जाऊंगा झोली भर के जाऊंगा (रफी), इस रेशमी पाजेब की झंकार के सदसे (रफी-लता) होके मायूस तेर दरपे सवाली न गया झोलीया भर गई सबकी कोई खाली न गया (रफी-अजीज नाजा-शंकर शंभू) आणि सर्वात प्रचंड गाजलं होतं ते ‘ हुस्न हाजीर है मुहोब्बत कि सजा पाने को कोई पत्थर से ना मारे मेरे दीवाने को’ लता मंगेशकर यांनी गायलेले गाणे हे त्या काळात प्रचंड गाजलं होतं.

१९७७ सालच्या बिनाका गीतमाला मध्ये हे त्या वर्षाचे सर्वात टॉपचे गाणे होते. बिनाका गीत माला मध्ये या चित्रपटातील अनेक गाण्यांनी हजेरी लावली होती. संगीतकार मदन मोहन यांनी दिलेलं संगीत खरोखरच लाजवाब झालं होतं. पण दुर्दैवाने ते हे यश पाहायला या जगात राहिले नाही. या चित्रपटाच्या निमित्ताने संगीतकार जयदेव आणि गीतकार साहीर तब्बल १३ वर्षानंतर एकत्र आले. यापूर्वी ते ‘मुझे जीने दो’ या चित्रपटात एकत्र आले होते. ऋषी कपूर साठी रफी चा स्वर प्रचंड यशस्वी झाला. पुढे ऋषी आणि रफी यांची अनेक गाणी आली त्याची सुरुवार या सिनेमापासून झाली. (अमर अकबर अँथनी, सरगम, दो प्रेमी, कर्ज)
================================
हे देखील वाचा : तब्बेत ठीक नसतानाही मोहम्मद रफी यांनी ‘या’ अभिनेत्यासाठी केले पुन्हा रेकॉर्डिंग
=================================
हा चित्रपट ११ नोव्हेंबर १९७६ रोजी प्रदर्शित झाला. सुपरहिट झाला. पावणे दोन कोटी रुपये बजेट असलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिस वर सव्वा चार कोटी कमावले! अभिनेत्री रंजीताचा हा पहिलाच सिनेमा. तिला मात्र म्हणावा तसा फायदा या सिनेमाचा झाला नाही. पुढची सहा महिने तिला काही काम मिळाले नाही. त्यानंतर मात्र तिला एकदम तीन चित्रपट मिळाले अखियों के झरोखो से, पती-पत्नी और वो आणि दामाद हे तिन्ही चित्रपट १९७८ साली प्रदर्शित झाले आणि तीनही चित्रपटांना चांगली यश मिळाले. पण रंजिता हिला हिंदी सिनेमात फारसं यश मिळालं नाही हे तितकच खरं आहे. साहीरच्या गाण्यांसाठी तसेच मदनमोहन व जयदेव यांच्या संगीतासाठी आज देखील हा सिनेमा आठवला जातो आणि आठवला जातो ऋषी कपूर साठी रफी ने पहिल्यांदा पार्श्वगायन केले या साठी देखील!