Subodh Bhave लवकरच आणखी एका बायोपिकमध्ये झळकणार; हिंदीत साकारणार ‘ही’

अनुराधा : Hrishikesh Mukherjee यांची भावरम्य कविता!
भारतीय समाजात पत्नीने पतीच्या सुखातच आपले सुख शोधायचे असते कां? त्यातच आपला स्वर्ग उभारायचा असतो का? पतीच्या स्वप्नांना बळ देताना स्वतःच्या आशा आकांक्षा यांच्याकडे कायम दुर्लक्ष करायचे असते का? स्वतःचे अस्तित्व विसरून जाऊन पतीच्या वलयात विरघळून जायचं असतं का? आणि मुख्य म्हणजे पत्नीच्या स्वप्नांचे काय? याबाबत कधी कोणी विचार करायचा की नाही? या आणि अशा असंख्य प्रश्नांना घेऊन ऋषिकेश मुखर्जी यांनी १९६० साली ‘अनुराधा’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. खरं म्हटलं तर त्या काळाच्या मानाने हा विषय खूप काळाच्या पुढचा होता. स्त्रियांचे स्वतंत्र करीअर याचा कुणी विचारही तेंव्हा करत नव्हते.

’अनुराधा’ या सिनेमाला त्या वर्षीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे सुवर्णकमळ मिळाले होते. खरोखरच हा चित्रपट अतिशय वरच्या दर्जाचा होता. ऋषिकेश मुखर्जी यांची चित्रपटाची मांडणी अतिशय तरल आणि भावस्पर्शी होती. आज जवळपास साठ- बासष्ट वर्षानंतर आपण जेव्हा हा चित्रपट पुन्हा पाहतो त्यातील प्रत्येक पात्र आपल्याला भारावून टाकते. आजच्या व्यस्त जीवनात हे प्रश्न कोरीलेट होत असले तरी त्या काळाशी ते सुसंगत नव्हते. चित्रपट कृष्ण धवल जरी असला तरी ऋषिकेश मुखर्जी यांनी दिलेल्या ‘मिडास टच’ ने हा चित्रपट मनात सप्तरंगी भावनांची उधळण करतो. या चित्रपटाला संगीत ज्येष्ठ सतारवादक पंडित रविशंकर यांचे होते. त्यांनी आपल्या फिल्मी करीयर मध्ये, अगदी बोटाच्या मोजण्यावर इतके चित्रपट संगीतबद्ध केले. त्या सर्व चित्रपटातील हा मेरुमणी ठरावा.
चित्रपटाचा नायक डॉक्टर निर्मल चौधरी हा (बलराज सहानी) हा एक आदर्श वादी विचारांचा ध्येयवेडा डॉक्टर आहे. त्याच्या आईचा मृत्यू केवळ डॉक्टरी इलाज न मिळाल्यामुळे झाला होता. हि ठणणारी वेदना त्याच्या मनात सलत असते. त्याने त्याच वेळी निर्णय घेतलेला असतो की ‘डॉक्टर होवून आयुष्यभर आपण रुग्णांची सेवा करायची. जी वेळ आपल्या आईवर आली ती पुन्हा दुसऱ्यावर येऊ द्यायची नाही.’ गरीब रुग्णांची सेवा करणे हे त्याचे पॅशन असते. त्यासाठी तो रात्रंदिवस झटत असतो. स्वतःच्या सुखाकडे, भौतिक गरजांकडे त्याचे लक्ष नसते. त्याची पत्नी अनुराधा (लीला नायडू) ही एकेकाळची प्रसिद्ध गायिका असते. तिच्या अनेक रेकॉर्ड्स लग्नापूर्वी आलेल्या असतात.
रेडिओ वरती ती गात असते. लग्नापूर्वी संगीत हेच तिचं जीवन असतं. तिचा आवाज आणि गाणं ऐकून निर्मल अनुराधाच्या प्रेमात पडलेला असतो. चित्रपट सुरू होतो तेव्हा त्यांच्या लग्नाला दहा वर्षे उलटून गेलेली असतात. रेणू नावाची त्यांना एक मुलगी असते. डॉक्टर असून देखील निर्मल ला भौतिक सुखाचा पैशाचा अजिबात मोह नसल्यामुळे अतिशय काटकसरीने आणि गरीबीत त्यांचा संसार चालू आहे. अनुराधा तर आता गाणे पूर्णपणे विसरून गेली आहे. एकेकाळी आपण गात होतो हेच तिला आठवत नाही. माहेरी अनुराधा गर्भ श्रीमंत घरात वाढलेली असते. पण आता पतीच्या संसारात तुटपुंज्या पैशात संसार ओढत आहे. तिच्या जीवनातील संगीत हरवल्याने ती काहीशी सैरभैर झाली आहे. आपली निवड चुकली तर नाही ना अशी तिला शंका आता वारंवार येवू लागते.

खरंतर त्यांचा प्रेमविवाह झालेला असतो. त्या वेळेला तिचं गाणं ऐकूनच निर्मल तिच्यावर मोहित झाला होता. गाण्याने त्यांना जवळ आणलं होतं. अनुराधाकरीता तिच्या वडिलांच्या मित्राचा मुलगा दीपक (अभी भट्टाचार्य) चे स्थळ सांगून आलेले असते. दीपक विलायतेत शिकून आलेला असतो. पण वडिलांच्या विरोधाला न जुमानता अनुराधाला निर्मल लग्न करायचे असते. आता दहा वर्षानंतर निर्मलचे अनुराधा वर प्रेम असते का? तर नक्कीच असते. पण त्याचे खरे प्रेम असते त्याच्या रुग्णांवर, त्याच्या पॅशनवर. त्याला ध्यास असतो रोगमुक्त जीवन लोकांनी जगावे याचा. या त्याच्या पॅशनमुळे त्याच्या नकळत त्याचे आपल्या संवेदनशील कलाकार पत्नीकडे दुर्लक्ष होत असते. दहा वर्षानंतर एकदा वडील येतात त्यांना देखील अनुराधाचे आजची परिस्थिती दिसते. एकेकाळची खळखळून हसणारी गाणारी अनुराधा आता मलूल झालेली दिसते. तिच्या आयुष्यातील आनंद हरवलेला असतो.कलासक्त मनाची घुसमट चालू असते. अनुराधा च्या मुलीला घेऊन ते शहरात निघून जातात. आता अनुराधा आणखी एकाकी होते.
पण याच वेळी कथानकात ट्विस्ट येतो. तिचा जुना प्रियकर दीपक(अभि भट्टाचार्य) अचानकपणे समोर येतो. अनुराधा ची सध्यस्थिती पाहून तो चक्रावून जातो. दिपक अनुराधाला सल्ला देतो ‘या चार भिंतीमध्ये तुझी स्वप्न पार कोमेजून जात आहेत. यातून तू बाहेर पड. तुझ्यातील कलावंत मनाला पुन्हा जिवंत कर ‘. अनुराधा पुन्हा द्विधा मनस्थितीत जाते. काय करायचे? इथे राहून आपल्याला काहीच करता येणार नाही. याची तिला जाणीव होते. आणि एक दिवस ती निर्णय घेते की निर्मल ला सोडून शहरात जायचे. निर्मल शांतपणे तिचा निर्णय एक्सेप्ट करतो. काहीच त्रागा करत नाही. काहीच नाही. फक्त तो आर्त स्वरात तिला एक विचारतो ” कामाच्या व्यापात मी तुझ्याकडे दुर्लक्ष केले हे खरे आहे. पण मी तरी स्वतःकडे कुठे लक्ष दिले?” अनुराधा खाडकन आपल्या स्वप्नातून जागी होते. निर्मल निस्वार्थपणे रुग्णांची सेवा करत असतो त्याने खरोखरच स्वतः आवडी निवडी तरी कुठे लक्ष दिले असते? आता ती शांतपणे विचार करून त्याच्या सोबतच राहण्याचा निर्णय घेते.
चित्रपटाचा हा शेवट त्या काळात काही लोकांना पटला नव्हता. हा पारंपारिक पुरुष सत्ताक पद्धतीला शरण जाण्याचा प्रकार आहे असे त्या काळात म्हटले जाऊ लागले होते. ऋषिकेश मुखर्जी मात्र यावर कुठलेही भाष्य करत नाहीत. तो निर्णय ते प्रेक्षकांवर सोडतात. चित्रपटाची बलस्थाने सांगायची तर सर्वच कलाकारांचा अतिशय भावस्पर्शी असा अभिनय. बलराज चा प्रश्नच नव्हतो तो कुठल्याही भूमिकेचा सोनच करत असे. अभिनेत्री लीला नायडू चा हा पहिला चित्रपट होता. पण कुठेही तिचा नवखे पणा यातून दिसत नाही.(लीला नायडू मिस इंडिया होती आणि जगातील दहा सुंदर स्त्रियां मध्ये तिची गणना होत होती) पंडित रविशंकर यांचे चित्रपटाला दिलेलं संगीत हे अतिशय क्लास दर्जाचे होते.
================================
=================================
‘जाने कैसे सपनो में खो गई आंखियां (राग:तिलक श्याम), सांवरे सांवरे (राग:भैरवी) , हाय कैसे दिन बिते कैसे बिती रतिया पिया जाने ना (राग: खमाज), हाये रे वो दिन क्यू न आये(राग:जन सम्मोहिनी) ही लताची चार गाणी अतिशय वरच्या श्रेणीची झाली होती. संपूर्ण चित्रपट आणि गाण्यांमधून पंडित रविशंकर यांची सुरेल सत्तार प्रेक्षकांचे सोबत करत असते. चित्रपटाची गाणी लिहिली होती शैलेंद्र या प्रतिभावान गीतकाराने. खरंतर शास्त्रीय संगीताच्या सुरावाटीवर शब्द लिहिणे खूप अवघड पण हे काम शैलेंद्र यांनी सहज सुलभ रीत्या केलेले दिसते. दिग्दर्शक बिमल रॉय यांच्या तालमीत तयार झालेले ऋषिकेश मुखर्जी यांचा हा चौथा चित्रपट होता. यात त्यांनी वापरलेली प्रतीकं, फ्लॅशबॅक चा वापर आणि सिनेमाला दिलेली साधेपणाची समृद्धी प्रेक्षकांची पकड घेते.