Rekha नाही तर ‘उमराव जान’साठी दिग्दर्शकाची पहिली पसंती ‘या’ मराठी

Rekha : ‘दिल चीज क्या है…’ गाण्याच्या रेकॉर्डिंगचा भावस्पर्शी किस्सा!
मुजफ्फर अली यांचा ‘उमराव जान’ हा चित्रपट २ जानेवारी १९८१ रोजी प्रदर्शित झाला होता. आता लवकरच पुन्हा एकदा तो रिलीज झाला आहे. एव्हाना काही शहरात तो रिलीज झाला देखील असेल. हा चित्रपट भारतीय चित्रपट संगीतातील आणि इतिहासातील एक माइल स्टोन सिनेमा आहे. या चित्रपटातील ‘दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिये ….’ या आशा भोसले यांनी गायलेल्या गाण्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता. या चित्रपटाचे संगीतकार खैय्याम यांना देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. अतिशय अप्रतिम कॉम्बिनेशन असलेलं हे गाणं बनण्याचा किस्सा देखील तितकाच बेहतरीन आहे. (Bollywood Iconic Songs)

आशा भोसले यांनी आपल्या नेहमीच्या शैलीला बाजूला ठेवून हे गाणं गायलं होतं. खरंतर त्यांचा विश्वासच बसत नव्हता की आपण अशा प्रकारचं गाणं गाऊ शकतो; पण खैय्याम यांनी त्यांना चक्क शपथ घातल्यामुळे हे गाणं बनले होते. नेमका काय होता हा प्रकार? या गाण्याच्या रेकॉर्डिंग चा खूप इंटरेस्टिंग आणि भावस्पर्शी असा हा किस्सा आहे. आजच्या फास्ट युगामध्ये खरंतर कुणाचा विश्वास बसणार नाही अशी ही अतिशय हळवी आठवण आहे. ‘उमराव जान’ या गायिका / नर्तिकेतवर चित्रपट काढण्याचे जेव्हा मुजफ्फर अली यांनी ठरवलं तेव्हा या चित्रपटात संगीताला अनन्यसाधारण महत्त्व आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी या चित्रपटाचा संगीत जयदेव यांच्याकडे दिले. (Bollywood Tadaka)

जयदेव यांनीच मुजफ्फर अली यांच्या या आधीच्या ‘गमन’ चित्रपटाला संगीत दिलं होतं. चित्रपटाची गाणी शहरीयार यांनी लिहिली होती. जयदेव यांनी या चित्रपटावरील संगीताचे काम सुरू केले. गायिका मधुरानी फैजाबादी हिच्या आवाजात एक गाणे देखील रेकॉर्ड केले. हे गाणे जेव्हा त्यांनी मुजफ्फर अली यांना ऐकवले तेव्हा त्यांना या आवाजात काही कमतरता जाणवू लागली. ‘उमराव जान’ या व्यक्तिरेखेला साजेसा हा स्वर नाही असे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी संगीतकार जयदेव यांना गायिका बदलण्यास सांगितले. परंतु जयदेव यांचा मधुराणी साठीचाच आग्रह होता. यातून थोडासा वाद झाला आणि जयदेव या चित्रपटापासून दूर झाले आणि इथे वर्णी लागली संगीतकार खय्याम यांची! पुन्हा नवीन गायिकेचा शोध सुरू झाला. (UmraoJaan Re-Release)
================================
हे देखील वाचा: अभिनेत्री रेखाने नववीत असतानाच का शाळा सोडली?
=================================
खैयाम यांच्या पत्नी जगजीत कौर यांनी आशा भोसले यांचे नाव या गाण्यासाठी सुचवलं. कारण दहा वर्षांपूर्वी आलेल्या ‘पाकीजा’ मधील सर्व गाणी लता मंगेशकर यांनी गायलेली होती. त्यामुळे आता ते रिपीटेशन टाळण्यासाठी आशा भोसले यांचा स्वर त्यांनी फायनल केला. एक दिवस खय्याम आणि त्यांची पत्नी जगजित कौर आशा भोसले यांच्या घरी जाऊन त्यांनी उमराव जान हे पुस्तक आशा भोसले यांना वाचायला दिले आणि सांगितले ,” तुम्ही ही संपूर्ण व्यक्तिरेखा नीट अभ्यासा आण यातून तुम्हाला कसे गायचे हे कळेल.” आशा भोसले यांनी ते संपूर्ण पुस्तक वाचले आणि त्या रिहर्सल साठी जाऊ लागल्या. गीतकार शहरीयार यांनी या चित्रपटातील गाणी लिहिली होती. या चित्रपटातील पहिल्या गाण्याच्या रिहर्सल सुरू झाल्या. गाणे होते ‘दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिये…’ संगीतकार खय्याम यांनी गझल स्टाईल हे गाणं बनवायचे ठरवले आणि आशा भोसले ला त्यांची नेहमीची पट्टी सोडून खालच्या पट्टीत गायला सांगितले. गाण्याची स्केल लो ठेवली.

आशा भोसले सुरुवातीला खूप अडखळत होती कारण त्यांनी अशा पध्दतीने गाणी कधी गायली नव्हती. परंतु खय्याम यांचा आग्रह तोच होता. शेवटी आशा भोसले थोड्या नाराज झाल्या आणि म्हणाल्या,” खय्याम साहेब तुम्ही मला अशा प्रकारचं गाणं गायला का लावता? अशा प्रकारचे यापूर्वी मी कधी गायले नाही!” त्यावर खैयाम म्हणाले,” पण ‘उमराव जान’ या व्यक्तिरेखेसाठी अशीच आणि हीच स्केल योग्य आहे .” त्यावर आशा भोसले म्हणाल्या ,” त्या उमराव जानसाठी हि स्केल योग्य असेल पण तुमची ही उमराव जान तसे गाऊ शकत नाही ना…” त्यावर सर्वजण हसले. संगीतकार खय्याम म्हणाले,” आपण असं करूयात. तू एकदा मी सांगतो त्या पद्धतीने गाणे गा. आणि जर तुला ते गाणे पसंत नसले तर तुझ्या पद्धतीने आपण हे गाणं रेकॉर्ड करू.” आशा भोसले म्हणाल्या,” खय्याम साहेब, ठीक आहे. तुम्ही म्हणता त्या स्केल मध्ये मी गाते. पण तुम्ही मला शपथ द्या जर ते गाणं मला आवडलं नाही तर माझ्या पद्धतीने गाणं रेकॉर्ड करावं लागेल!” त्यावर खय्याम म्हणाले,” शपथ दिली. पण तुला देखील माँ सरस्वती देवीची शपथ घ्यायला लागेल. माझ्या पद्धतीने गाण्याचा तू एक हजार टक्के प्रयत्न करशील आणि तसेच तू गाशील! तू नक्की गाऊ शकतेस याचा मला आत्मविश्वास आहे!!” त्या पद्धतीने गाण्याचे रेकॉर्डिंग सुरू झाले. (Entertainment)

खैय्याम यांनी लो स्केलवर गाणे बांधले होते. आशा भोसले यांनी त्या सुरावटीवर साडेपाच मिनिटाचे ते गाणे गायले. त्यानंतर सर्वजण हे गाणे ऐकण्यासाठी रेकॉर्डिंग रूम मध्ये केले. गाणे प्ले केले गेले. आणि आशा भोसले यांच्या सुरुवातीच्या आलापा नंतर सर्वत्र सन्नाटा निर्माण झाला. आशा भोसलेची ती अप्रतिम गायकी ऐकून सर्वजण मंत्रमुग्ध झाले. आशा भोसले डोळे मिटून स्वतःचेच गाणे ऐकत होत्या. आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. गाणं संपल्यानंतर देखील त्यांनी काही काळ डोळे उघडलेच नाही. काही वेळानंतर त्या भानावर आल्या आणि खय्याम साहेबांना म्हणाल्या,” हे गाणं मीच गात होते का? अशा पद्धतीचं तर मी कधीच गायलेलं नाही.” त्यावर खय्याम साहेब तिला शाबासकी देत म्हणाले ,”आशा जी ये गाना आप ही ने गाया है और बहुत अच्छी तरह से गाया है.”
================================
हे देखील वाचा: Asha Bhosle : ४ महिने गरोदर असताना आशा ताईंनी आत्महत्येचा का केला होता प्रयत्न?
=================================
आशा भोसले यांनी खय्याम यांच्या पायावर डोके ठेवले आणि म्हणाल्या ,” खय्याम साहेब तुम्हीच अशा पद्धतीने माझ्याकडून गाणे गावून घेऊ शकता!” यानंतर ‘उमराव जान’ या चित्रपटातील इतर गाण्यांचे देखील रेकॉर्डिंग झाले. हि रेकॉर्ड जेव्हा बाहेर आली तेव्हा या संगीताला /गाण्यांना सर्वत्र लोकप्रियता मिळाली. चित्रपट देखील सुपरहिट झाला. आशा भोसले आणि खय्याम यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट गायिका आणि सर्वोत्कृष्ट संगीतकार असे पुरस्कार मिळाले. खय्याम यांनी अतिशय अभ्यासपूर्ण असे या चित्रपटाला संगीत दिले होते म्हणूनच हा चित्रपट भारतीय चित्रपट संगीतातील एक माईल स्टोन चित्रपट ठरला,सध्या हा सिनेमा पुन्हा प्रदर्शित झालाय. ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी आनंद घ्यावा. (Asha Bhosle Songs)