Prajakta Gaikwad चं ‘ठरलं’; फोटो शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना दिली
ऑन स्क्रीन बघितला पण ऑफ स्क्रीन Sholay पाहिलात का?
भारतीय सिनेविश्वातली एक असा ब्लॉकबस्टर चित्रपट ज्याच्याबद्दल तुम्ही अनेकांकडून ऐकलं असेलच कि हा चित्रपट त्यांनी १० वेळा, २० वेळा बघितला आहे. पण एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा फ्लॉप ठरलेला… साधारण तुम्हाला अंदाज आलाच असेल मी कोणत्या मुव्ही बद्दल बोलतेय… येस मी बोलतेय मुंबईच्या मिनर्व्हामध्ये तब्बल ५ वर्ष चाललेल्या आणि भारताची सर्वात ग्रेटेस्ट फिल्म कल्ट क्लासिक ‘शोले’बद्दल… भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपट आले आणि गेले, पण १५ ऑगस्ट १९७५ रोजी रिलीज झालेला ‘शोले’ (Sholay) हा चित्रपट आजही एक वेगळाच अनुभव आहे. रमेश सिप्पी दिग्दर्शित हा अॅक्शन-पॅक्ड क्लासिक म्हणजे केवळ एक स्टोरी नाही, तर एक इमोशन आहे आणि म्हणूनच या मूवीमध्ये असलले अनेक डायलॉग, सिनेप्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहेत. आता शोलेमध्ये स्क्रीनवर आपण जय, वीरू, बसंती, ठाकूर आणि गब्बर सिंग यांना पाहतो, पण पडद्यामागेही अनेक अशा कथा दडल्या आहेत ज्या आजही अनेकांनी ऐकल्या नसतील कोणते आहेत ते किस्से जाणून घेऊयात..

‘मूवी ऑफ द मिलेनियम’ असा ज्या चित्रपटाचा आपल्याकडे उल्लेख केला जातो त्या ‘शोले’ चित्रपटाला ५० वर्ष पूर्ण होणार आहेत. या सिनेमाने इंडियन फिल्म इंडस्ट्रीचा इतिहासच बदलून टाकला. तब्बल १०० ठिकाणी गोल्डन ज्युबिली, त्याहून अधिक ठिकाणी सिल्वर ज्युबिली, बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये नंबर एक असे अनेक बहुमान या चित्रपटाने प्राप्त केले. देश विदेशातदेखील या सिनेमाला अनेक गौरव प्राप्त झाले पण इतकं असूनसुद्धा भारतातील ऑस्कर म्हणून ज्याला ओळखल जात त्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये मात्र ‘शोले’ या चित्रपटाला फक्त एक अवॉर्ड मिळाला होता. शेखर कपूर यांनी शोलेबद्दल म्हटल होत “भारतीय चित्रपटांचा इतिहास दोन भागात विभागता येतो, शोले bc आणि शोले ed म्हणजे शोलेच्या आधीच इतिहास आणि नंतरचा आणि हे खरं सुद्धा वाटतं.
आता ‘शोले’चे किस्से सांगायचे झाले तर सुरवात करू स्टोरीपासून… ‘पचास पचास कोस दूर जब कोई बच्चा रोता है तो माँ कहती है सोजा नहीं तो गब्बर आ जायेगा!’ हा डायलॉग ऐकल्यावर आजही आपल्या मनात धडकी भरते. पण हा डायलॉग ज्याला दिला गेला होता त्या गब्बर सिंगबद्दल एक खास गोष्ट म्हणजे, ग्वालियरमध्ये खरच गब्बर सिंग नावाचा डाकू होता, आणि या चित्रपटाचे लेखक सलीम-जावेद यापैकी सलीम खान यांचे वडील पोलीस दलात होते आणि त्यांनी गब्बरबद्दल ऐकलेल्या कथा सलीम-जावेद यांना सांगितल्या. त्यामुळे या पात्रांमध्ये वास्तवाची झलक आली आणि चित्रपट अधिक प्रभावी झाला. याशिवाय चित्रपटातील “सुरमा भोपाली” हे पात्र खऱ्या व्यक्तीवर आधारित होते, जो भोपाळमध्ये राहत असे. त्याचा बोलण्याचा ढंग, निरागसता ह्याचं चित्रपटात हुबेहूब दर्शन घडवण्यात आलं. (Bollywood Classic movies)
================================
हे देखील वाचा: Sholay :’शोले’ची ५० वर्ष पुर्ण; प्रेक्षकांसाठी खास रि-रिलीज होणार चित्रपट
=================================
यानंतर वळूया कास्टिंगकडे…. खरं तर या चित्रपटाच्या कास्टिंगचे खूपच किस्से आहेत कारण यातल्या अनेक पात्रांसाठी एकत्र वेगळे कलाकार निवडले होते आणि दुसरं म्हणजे यातल्या प्रत्येक कलाकाराला वेगळ्याच भूमिका करायच्या होत्या. आता आज शोलेतील गब्बर सिंह हे पात्र दुसरं कोणीतरी कास केलं असत हा आपण विचारही करू शकत नाही पण सुरुवातीला ही भूमिका डॅनी डेंझोंगपाला देण्यात आली होती, पण अफगाणिस्तानात दुसऱ्या चित्रपटासाठी त्याला शूट करायच असल्यामुळे त्याने यासाठी नकार दिला. पुढे अमजद खानला ही भूमिका मिळाली, त्यावेळी तो फारसा प्रसिद्ध नव्हता तरी त्याने या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली.
यासाठी त्याने “अभिषप्त चंबल” हे पुस्तक वाचून आपल्या आवाजात बदल केला, पात्रात भीती आणि क्रूरता आणली. आज “कितने आदमी थे?” हा डायलॉग अमजद खानव्यतिरिक्त कोनाच्या आवाजात ऐकावासाचं वाटणार नाही. याशिवाय यात अमिताभ बच्चन ज्याने जय हे पात्र साकारलं होतं त्याला गब्बर सिंगचा रोल करायचा होता, धर्मेंद्र ज्यांनी वीरू हे पात्र साकारलं त्यांना ठाकूरचा रोल करायचा होता, शिवाय स्वतः ठाकूरला गब्बरचा रोल करायचा होता असे गमतीशीर किस्से कास्टिंगच्या वेळी झाले. पण शेवटी ज्याला जे पात्र मिळालं त्याने त्याच काम चोख पार पाडलं.

यानंतर शूटिंगमध्ये तर खूपच किस्से घडले पण याच शूटिंग ज्या गावात झालं त्याबद्दल थोडंसं… तसं बघायला गेलं तर या चित्रपटाची स्टोरी त्या काळात वाढत असलेल्या डाकू आणि एकंदरीत गुन्हेगारी विश्वावर भाष्य करणारी होती आणि या डाकूंचा मेन अड्डा चंबळ मानला जायचा. पण रमेश सिप्पींना मूळ चंबळच्या डाकूंच्या भागात शूट करायच नव्हत कारण तिथे शूट करण्यात रिस्क होती. मग त्यांनी त्यांच्या आर्ट डिरेक्टर राम येडेकर यांना अशी जागा शोधण्याची जबाबदारी दिली ज्या घरातून अक्ख गाव दिसेल, आणि मग त्यांनी दक्षिण भारतात शोध घेतला आणि अखेर बंगळुरूजवळील रामनगरम या खडकाळ डोंगराळ भागाची निवड झाली. इथेच “रामगढ” नावाचं काल्पनिक गाव उभं करण्यात आलं, जे आज “शोले हिल्स” म्हणून प्रसिद्ध आहे. आणि विशेष म्हणजे आज इथला एक भाग ‘सिप्पी नगर’ म्हणून ओळखला जातो.
आता वळूया शूटिंगदरम्यान घडलेल्या किस्स्यांकडे, या चित्रपटाने फक्त करिअरच नाही, तर त्यातल्या प्रत्येकाच्या आयुष्यांवरही परिणाम केला. अमिताभ-जया आणि धर्मेंद्र-हेमामालिनी यांच्या प्रेमाला शोलेने एक नवीन उंची दिली. सेटवर सगळे कलाकार, तंत्रज्ञ, लेखक आणि क्रू यांनी मिळून एक कुटुंब तयार केलं, जे दोन वर्षांच्या प्रवासात आणखी मजबूत झालं. या शूटिंगवेळी जया भादुरी तीन महिन्यांच्या प्रेग्नन्ट होत्या. त्यामुळे हा चित्रपट अमिताभ आणि जया बच्चन यांच्यासाठी special ठरला. याशिवाय शोलेच्या शूटिंगदरम्यान सगळ्यात जास्त गाजलेली गोष्ट म्हणजे धर्मेंद्र आणि हेमामालिनीची लव्हस्टोरी! (Sholay Movie)

चित्रपटातील वीरू आणि बसंतीच्या रोमँटिक सीन्ससाठी धर्मेंद्र मुद्दाम चुका करायचा, जेणेकरून शॉट पुन्हा घ्यावा लागेल. इतकंच नाही, तर लाईटमन लोकांना गुपचूप पैसे देऊन दिवे चुकीचे लावायला सांगितल्याचे किस्सेसुद्धा फेमस आहेत. यामुळे पुन्हा रिटेक्स घ्यावे लागायचे आणि त्याला हेमा मालिनीबरोबर जास्त वेळ घालवता यायचा. या चित्रपटाने त्यांच्या लव्हस्टोरीला एक वेगळच वळण दिल आणि शेवटी हे दोघे आयुष्यभरासाठी एकत्र आले.
शोले चित्रपट त्याच्या कडक पटकथेसाठी ओळखला जातो, सलीम-जावेद या दिग्गज जोडीने चित्रीकरणादरम्यान संवाद लिहिले होते.त्यातला महत्वाचा म्हणजे टॉस चा सीन ! आता आपण क्रिकेटमध्ये टॉस चा सीन पाहतोच याव्यतिरिक्त आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान’, नीरज पांडे दिग्दर्शित ‘धोनी द अनटोल्ड स्टोरी’, कबिर खान दिग्दर्शित ’83’या चित्रपटातसुद्धा टॉस दाखवलाय पण तो क्रिकेटच्याच अँगलने पण शोले मधला हा सीन टर्निंग पॉईंट ठरतो. आणि विशेष म्हणजे हा सीन शूटिंगमध्येच इम्प्रोव्हाईज झाला आणि शूट केला गेला आणि इतिहासात अजरामर झाला. शिवाय अमिताभ आणि धर्मेंद्र यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री एवढी जबरदस्त होती की अनेक सीन लिहिलेले असतानाही कलाकारांनी त्यांना स्वतःच्या शैलीत खास बनवले.
याव्यतिरिक्त या चित्रपटात एक खास गोष्ट होती ती म्हणजे बसंतीच्या स्टंट सीन्ससाठी रेश्मा पठाण ही महिला स्टंट डबल होती. त्या काळात महिला स्टंट आर्टिस्ट्स फारच कमी होत्या, आणि रेश्माने ही जोखीम घेतलेली होती. पुढे २०१९ मध्ये तिच्यावर आधारित “द शोले गर्ल” नावाचा चित्रपटही आला. ओव्हरऑल शोलेच शूटिंग अवघड होत. हा चित्रपट पूर्ण होण्यासाठी तब्बल दोन वर्ष लागली आणि सुमारे ४५० शिफ्ट्स झाल्या. “ये दोस्ती” हे गाणं शूट करण्यासाठीच २१ दिवस लागले. ट्रेन लूट सीक्वेन्ससाठी सात आठवडे लागले. गब्बरने इमामच्या मुलाला मारण्याच्या सीनला १९ दिवस लागले. याच्या एडिटिंगसाठी १ महिना, बॅकग्राऊंड म्युझिकसाठी आणखी १ महिना दिला गेला. आणि एवढी प्रचंड मेहनत घेतल्यामुळेच प्रत्येक फ्रेम आजही तांत्रिक दृष्ट्या उत्कृष्ट दिसते.

याच्या मुसिक बद्दल सांगायचं झालं तर आर. डी. बर्मन यांच्या संगीताने शोलेला नवी उंची दिली “ये दोस्ती”, “मेहबूबा”, “होली के दिन” यांसारखी गाणी सुपरहिट ठरली. “मेहबूबा मेहबूबा” हे गाण अचानक चित्रपटात वापरण्यात आल, आणि तेसुद्धा फेमस झाल. याशिवाय आणखी एक अनेकांना माहित नसलेली गोष्ट म्हणजे मूळ क्लायमॅक्समध्ये ठाकूर गब्बरला चाकूने मारतो, पण सेन्सॉर बोर्डाला तो प्रसंग अतिशय हिंसक वाटल्यामुळे पुन्हा शूटिंग करण्यात आलं. शेवटी गब्बरला पोलिसांच्या ताब्यात देण्याचा शेवट तयार झाला. या शोलेच्या रिलीजचासुद्धा एक स्पेशल किस्सा आहे.
शोले हा भारतातील पहिला 70mm व स्टिरिओ साऊंड असलेला चित्रपट होता. पण तो 35mm वर शूट झाला आणि पोस्ट-प्रॉडक्शनमध्ये 70mm मध्ये कन्व्हर्ट झाला,स्टील प्रेक्षकांसाठी तो एक नवीनच अनुभव होता. पण नेमकं १४ ऑगस्टला मिनर्व्हा आणि न्यू एक्सेलसिअर थिएटरमध्ये ज्यावेळी याचा प्रीमियर झाला तेव्हा 70mm प्रिंट इंग्लंडहून यायला उशीर झाला होता त्यामुळे हा प्रीमियर 35mm वरच झाला. शेवटी रात्री १ वाजता 70mm प्रिंट आली त्यानंतर आणखी एक खास शो ठेवण्यात आला. प्रेक्षकांनी ते मोठ्या पडद्यावर अनुभवताना एक वेगळाच थरार अनुभवला.
================================
हे देखील वाचा: ‘शोले’ तील ‘महबूबा महबूबा’ हे गाणे किशोर कुमार गाणार होता?
=================================
शोले हा केवळ एक चित्रपट नव्हता; तर ती एक भावना होती. पडद्यामागच्या या कथा दाखवतात की एक चित्रपट तयार करण्यासाठी केवळ स्टारडम पुरेसं नसतं, तर तंत्रज्ञ, लेखक, संगीतकार, आर्ट डिरेक्टर आणि छोट्या-मोठ्या प्रत्येक भूमिकेतून आलेल्या हजारो मेहनतीच्या हातांचा वाटा असतो. आजही जेव्हा आपण ‘शोले’ पाहतो, तेव्हा त्यातील प्रत्येक डायलॉग, गाणं आणि दृश्य आपल्याला पडद्यामागच्या त्या दोन वर्षांच्या मेहनतीची आठवण करून देतं आणि जर तुम्हाला याचे bts अर्थात पडद्यामागच्या गोष्टी माहित असतील तर तो मुव्ही बघतानाचा अनुभव आणखीनच खास होतो. शोले म्हणजे केवळ “कितने आदमी थे?” किंवा “ये दोस्ती हम नहीं तोडेंगे” एवढंच नाही, तर पडद्यामागील जिवंत माणसांची मेहनत आणि मैत्रीचा एक अजरामर वारसा आहे. (Entertainment News)