
Bollywood & Marriage : साखरपूडा झाला पण….
लग्नाच्या मुहूर्तापासून बरोबर पंधरा दिवसांनी स्मृती मंधनाने (Smriti Mandhana) आपलं पलाश मुच्छलशी (Palash Muchhal) नियोजित लग्न मोडले असल्याचे सोशल मीडियावर पोस्ट करीत जाहीर केलें. असेच काही होईल असाच एकूण रागरंग होता. पण जे काही घडलं ते धक्कादायक नि आश्चर्यकारक. अर्थात त्यामागची कारणे त्या दोन कुटुंबांना अधिक ठाऊक.
२३ नोव्हेंबर रोजी सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या या हाय प्रोफाईल विवाह सोहळ्याचा उत्कर्ष बिंदू (क्लायमॅक्स) अगदी जवळ आला असतानाच मूळ पटकथेत नसलेलं काही घडलं. हे लग्न का स्थगित करण्यात आलं यावरुन सोशल मीडियात बरंच काही लिहिलं गेलं, म्हटलं गेलं, सांगितलं गेलं. बरेच तर्क वितर्क काढले गेले. सोशल मीडिया हे कोणालाही, कसेही, केव्हाही व्यक्त होण्यासाठीचे हातातले फुकटचे खेळणे झाले आहे. कधी कधी तर कोणी काहीही बरळतो. ओकतो. बोलतो तेव्हा त्या असंस्कृतपणाचा राग येतो. आपण अजूनही म्हणावे तसे सुशिक्षित झालेल़ो नाहीत का?

या पंधरा दिवसांत स्मृती कोणत्या मानसिक, भावनिक अवस्थेतून गेली असेल हे तिचे तिच जाणे. ती सेलिब्रिटी क्रिकेटपटू असली तरी ती एक संवेदनशील माणूस आहे. तिलाही मन आहे, संवेदनशीलता आहे आणि याचा आपण आदर करायलाच हवा. अशा कठीण परिस्थितीत तर ते आवश्यक असते.
रविवारी दुपारी ही बातमी समजताच मला आठवले ते अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि करिश्मा कपूर (Karishma Kapoor) यांच्या लग्नाची करण्यात आलेली जोरदार घोषणा. साधारण २३ वर्षांपूर्वीची ही गोष्ट. जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भर दुपारी आयोजित करण्यात आलेल्या अमिताभ बच्चनच्या विशेष वाढदिवसाच्या सोहळ्यात ऋषि कपूरने अतिशय उत्साहाने, दिलखुलासपणे आम्हा सिनेपत्रकार आणि पाहुण्यांसमोर जाहीर केले, अभिषेक बच्चन कपूर खानदानाचा जावई होणार… ही अर्थात ब्रेकिंग न्यूज होती. आपल्या देशात तोपर्यंत सोशल मीडिया काहीसा नवीन होता. त्यामुळे ही बातमी फार वेगाने पसरली नव्हती.

भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील कपूर आणि बच्चन खानदान यांचे स्थान आणि महत्त्व लक्षात घेता ही खूपच मोठी गोष्ट होती. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची सून कोण होणार? राणी मुखर्जी होईल का की आणखी कोणी? अशा गॉसिप मॅगझिनमधून होत असलेल्या उलटसुलट अशा रंगतदार गोष्टीला हे थेट उत्तर होते. त्या सोहळ्यात लोलो अर्थात करिश्मा कपूर केव्हढी लाजली हो. तमाम फोटोग्राफर्सना छान फोटो मिळाला. लगोलग अभिषेक व करिश्मा यांची ओळख कशी झाली? सूर कसे जुळले यांच्या ‘स्टोरीज’ जन्माला आल्या देखिल.
आजच्या ताज्या घटनेवर असं एकदम झटपट, पटपट नि झक्कास आणि एक्सलुझिव्ह काही मिडियात यायला हवे असतेच. आज तीच ट्रेडिंग न्यूज ठरते. आता फक्त आणि फक्त अभिषेक व करिश्मा कपूरच्या लग्नाचा मुहूर्त कधी हे जाहीर होणे शिल्लक होते. या हाय प्रोफाईल लग्नाच्या पत्रिका छापायला कुठे दिल्यात याचा केवळ सुगावा लागणे बाकी होते. अशातच एका पंचतारांकित सोहळ्यासाठी एकत्र दिल्लीला गेलेले अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर येताना स्वतंत्रपणे आले. दोघांच्या मुंबईत येण्याच्या वेळेत अंतर होते आणि त्यांचे काही बिनसलं असावं अशी पहिली शंका आली. हळूहळू कुजबुज वाढत वाढत गेली. त्या दोघातही अंतर वाढत वाढत गेले आणि अर्थातच त्यांचा साखरपुडा मोडला. आणि त्याबरोबरच लग्नही मोडले. त्या दोघांच्याही आयुष्यातील पुढील वाटचाल आपापल्या पद्धतीने होत राहिली.
================================
हे देखील वाचा : जेव्हा अमिताभ बच्चन यांना अपयशाच्या गर्तेतून Yash Chopra यांनी बाहेर काढले!
================================
साखरपुडा होऊनही लग्न मोडले असल्याचे असे आणखी एक हाय प्रोफाईल उदाहरण आहे, एकेकाळचा ज्युबिली कुमार म्हणून लोकप्रिय असलेल्या राजेंद्रकुमारचा मुलगा कुमार गौरव अर्थात बंटी आणि शोमन राज कपूरची मुलगी यांचा अतिशय थाटात साखरपुडा पार पडला. राज कपूर (Raj Kapoor) आणि राजेंद्रकुमार (Rajendra Kumar) यांची अतिशय घट्ट मैत्री आणि आता तीच मैत्री नात्यात बदलली जात होती. साधारण पंचेचाळीस वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. मुद्रित माध्यमातून फोटोसह ही साखरपुड्याची बातमी आली. पण काही दिवसांनी हा साखरपुडा मोडला असल्याचे धक्कादायक वृत्त आले. त्यामागची कारणे फार चर्चेत आली नाहीत. राजेंद्रकुमारचा मुलगा कुमार गौरव याचे सुनील दत्तची मुलगी नम्रता हिच्याशी लग्न ठरल्याचे वृत्त आले आणि त्यानुसार ते झाले देखिल. कुमार गौरव आणि संजय दत्त हे आता नातेवाईक झाले.
================================
हे देखील वाचा : ….ही तर उद्याची Web Series
================================
हाय प्रोफाईल साखरपुडा होऊनही लग्न मोडले असल्याची आणखीन काही अशी लहान मोठी उदाहरणे असली तरी हे सगळेच विलक्षण गुंतागुंतीचेही असते. वरकरणी ही बातमी असते वा चर्चेसाठी एक निमित्त असते. पण यात संबंधित कुटुंबे कसा विचार करतात, कोणत्या मानसिक भावनिक स्थितीतून जातात हे फक्त आणि फक्त तेच जाणोत. लग्न ही आपल्या देशातील संस्कृतीमधील सर्वात जास्त महत्वाची गोष्ट. प्रेम विवाह असो वा नियोजित असो, मुलगी पाहून असो, विवाह मंडळात नाव नोंदवून असो, त्याचा निर्णय खूपच विचारपूर्वक घेतला जातो. त्यात साखरपुडा म्हणजे केवळ एका पावलावर लग्न. पण तेच पाऊल पडले नाही तर….