
Madhubala यांना पाहण्यासाठी पाकिस्तानचा ‘हा’ राजकीय नेता सेटवर हजेरी लावायचा!
५ ऑगस्ट १९६० या दिवशी प्रदर्शित झालेल्या ‘मुगल-ए –आजम’ हा चित्रपट बनायला तब्बल सात ते आठ वर्षे लागली होती. खरंतर या चित्रपटाचे दिग्दर्शक के आसिफ यांनी या चित्रपटाची निर्मिती चाळीस च्या दशकात सुरू केले होते पण नंतर स्टार कास्ट बदलल्याने १९५२ साली या चित्रपटाचा ऑफिशियल मुहूर्त झाला. सलीमच्या भूमिकेत दिलीपकुमार तर अनारकलीच्या भूमिकेमध्ये मधुबाला आणि शहनशाह अकबर यांच्या भूमिकेत पृथ्वीराज कपूर अशी तगडी स्टार कास्ट या सिनेमाची होती. हा सिनेमा सुरुवातीपासूनच अतिशय मोठ्या स्केलवर बनत होता. या सिनेमाची गाणी शकील बदायुनी यांनी लिहिली तर संगीत नौशाद यांनी दिले.
या चित्रपटासाठी के आसिफ यांनी अक्षरशः पाण्यासारखा पैसा खर्च केला. प्रख्यात बिल्डर शापूरजी पालनजी या चित्रपटाचे फायनान्सर होते. त्यांचे आणि के असिफ यांचे बऱ्याचदा वाढत्या आर्थिक प्रश्नावरून मतभेद होत असत. कित्येकदा तर हा चित्रपट बंद पडतो की काय कितपत अशी नौबत आली होती. पण आपलं रसिकांचे भाग्य चांगलं हा चित्रपट पूर्ण झाला आणि भारतातील सर्वाधिक यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला. या चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी जे सेट्स बनवले होते त्याची देखील चर्चा जगभर झाली. विशेषतः ‘जब प्यार किया तो डरना क्या..’ या गाण्याच्या वेळचा शीशमहलच्या सेट ची चर्चा तर थेट हॉलीवूड पर्यंत गेली होती.

या चित्रपटाचे शूटिंग पाहण्यासाठी जगभरातून लोक येत होते. यामध्ये पाकिस्तानचे शायर फैज अहमद फैज, चीनचे राष्ट्राध्यक्ष झाओ इन लाय, हॉलीवूड चे अनेक कलावंत आणि तंत्रज्ञ तसेच नंतर पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झालेले जुल्फिकार अली भुट्टो यांचा समावेश होतो. भुट्टो त्यावेळी (१९५४ ते १९५८) भारतात राहत होते. वरळीला त्यांचा मोठा बंगला होता. त्यांचे इतर सर्व कुटुंबीय पाकिस्तानात स्थलांतरित झाले होते. परंतु ते स्वत: मात्र भारतातच राहत होते. भुट्टो या चित्रपटाच्या सेटवर कायम उपस्थित राहत. भुट्टो फार त्या काळात मोठे असामी होते. मुंबईतील सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक वर्तुळात त्यांचा वावर असल्यामुळे सेटवर त्यांना सर्वजण ओळखत होते. त्यांना सेटवर चांगली ट्रीटमेंट देखील मिळत असायची. भुट्टो ‘मुगल-ए-आजम’ च्या सेटवर येण्याचं एक महत्त्वाचं कारण होतं मधुबाला!

पहिल्या भेटीतच त्यांना मधुबाला प्रचंड आवडली होती. आणि का आवडणार नाही? मधुबाला त्या काळातील हरेक तरुणाईच्या दिलातील राणी होती. भुट्टो खरंतर शादीशुदा इन्सान होते. त्यांचं पहिलं लग्न १९४३ सालीच झाले होते. या बेगम सोबत तलाक घेतल्यावर १९५२ साली त्यांचा दुसरा निकाह झाला. पण भुट्टो यांनी मधुबालाला बघितले आणि तिच्यावर हुस्न चे दिवाने झाले! मधुबालाचे ज्या दिवशी शूटिंग असेल त्या दिवशी ते हमखास भेटत सेटवर असायचे. आणि तासंतास ते मधुबाला कडे पाहत बसायचे. मधुबालाच्या देखील ते लक्षात येत होतं. संगीतकार नौशाद यांनी त्यांच्या आत्मचरित्रात त्यांच्या या आंख मिचौली चा उल्लेख केला आहे.
एकदा लंच टाईममध्ये भुट्टो यांनी धीर एकवटून आपल्या प्यार का इजहार केला आणि मधुबालाला प्रपोज केलं! मधुबालाने त्यावर खळखळून हास्य केले आणि तो विषय टाळला. भुट्टो तिचा नकार समजून गेले मात्र आयुष्यभर झुरत राहिले. नंतर भुट्टो १९५८ साली आपली अधुरी प्रेम कहाणी सोडून पाकिस्तानात निघून गेले आणि तिकडच्या राजकारणात रमले. या चित्रपटाच्या सेटवर दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्यात मतभेद निर्माण झाले होते यातील अनेक रोमँटिक सीन करताना दोघे एकमेकांशी एक शब्द देखील बोलत नव्हते! ५ ऑगस्ट १९६० रोजी ‘मुगल-ए-आजम’ रील्ज झाला. या सिनेमाच्या भव्य दिव्य प्रीमियर ला मधुबाला आणि दिलीपकुमार दोघेही हजर नव्हते.
================================
हे देखील वाचा : Shammi Kapoor : शम्मी कपूर मधुबालावरील (एकतर्फी) प्रेमात अक्षरशः पागल झाला होता!
================================
यानंतर अवघ्या अडीच महिन्यांनी १६ ऑक्टोबर १९६० रोजी मधुबालाने आणि किशोर कुमार सोबत लग्न केले. पण मधुबाला चा हार्ट डिसीज वाढत गेला. ११ ऑक्टोबर १९६६ रोजी दिलीप कुमारने सायरा बानो शी लग्न केले. त्यावेळी मधुबाला हृदयविकाराने प्रचंड आजारी होती. तिला भेटायला एकदा दिलीप कुमार आणि सायरा बानो गेले होते. बाहुली सारखी सुंदर सायरा पाहून मधुबाला खुश झाली. तिथे दिलीप कुमारचा हात हातात घेऊन त्याला मधुबाला म्हणाली ‘शहजादे को खूबसूरत शहजादी मिल गई…’ असे म्हणून तिने सायराचे कौतुक केले. तिकडे झुल्फिकार अली भुट्टो राजकारणात मश्गुल झाले. २३ फेब्रुवारी १९६९ वयाच्या ३६ व्या वर्षी मधुबाला ‘अल्ला‘ को प्यारी हो गई. तिच्या मजार वर दिलीपकुमार फुले वाहण्यासाठी जात असे असे म्हणतात मधूच्या मृत्युनंतर भुट्टो यांनी शोक संदेश पाठवला होता.