
Rajesh Khanna यांनी ‘आराधना’त काम करायला का नकार दिला होता?
दिग्दर्शक शक्ती सामंत यांचे हे जन्मशताब्दी वर्ष चालू आहे. एक अतिशय यशस्वी दिग्दर्शक म्हणून त्यांनी हिंदी सिनेमावर आपला ठसा उमटवला. राजेश खन्नाला सुपरस्टार पदी पोहोचवण्यात त्यांच्या ‘आराधना’चा मोठा वाटा होता पण गंमत म्हणजे ‘आराधना’ हा चित्रपट राजेश खन्नाला करायचाच नव्हता. त्याने अतिशय नाराजीतच हा चित्रपट स्वीकारला होता. परंतु याच चित्रपटाने त्याला सुपरस्टार पद बहाल केले. राजेश खन्ना हा चित्रपट स्वीकारताना का नाराज होता? त्याने हा चित्रपट स्वीकारायला का नकार दिला होता? मोठा इंटरेस्टिंग किस्सा आहे. दिग्दर्शक शक्ती सामंत साठच्या दशकातील एक अतिशय यशस्वी दिग्दर्शक.

शम्मी कपूर सोबत त्यांनी या दशकात अनेक चित्रपट केले. ‘कश्मीर की कली’ , ‘एन इव्हिनिंग इन पॅरिस’, ‘पगला कही का’, ‘जाने अनजाने’…. ‘एन इव्हिनिंग इन पॅरिस’ हा चित्रपट १९६८ साली प्रदर्शित झाला. यानंतर त्यांनी शम्मी कपूर आणि लीना चंदावरकरला घेऊन त्यांनी ‘जाने अंजाने’ या चित्रपटाचा मुहूर्त केला. या चित्रपटात विनोद खन्नाची देखील खलनायकाची भूमिका होती. हा एक बिग बजेट सिनेमा होता. पण हा चित्रपट सुरुवातीपासूनच रखडला गेला. तेव्हा शक्ती सामंत यांनी एक कमी बजेटचा आणि लवकर पूर्ण होईल असा चित्रपट करायचे ठरवले.
ज्याला बॉलीवूडमध्ये क्विकी म्हणतात तसा सिनेमा बनवायला घेतला . त्या प्रमाणे त्यांनी कहाणीचा शोध सुरू केला आणि ‘आराधना’ हा चित्रपट बनवायचे ठरवले. या चित्रपटाकरीता त्यांना नवीन चेहरा हवा होता. नवीन चेहऱ्याचा जेव्हा शोध सुरू झाला तेव्हा राजेश खन्ना त्यांच्या नजरेसमोर आला. राजेश खन्नाचे तोवर एक-दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते. पण त्याच्या कोणत्याच चित्रपटाला व्यवसायिक यश मिळाले नव्हते. नासीर हुसेन यांचा ‘बहारों के सपने’ हा चित्रपट शक्ती सामंत यांनी पाहिला होता आणि त्यातील राजेश खन्नाचा अभिनय त्यांना आवडला होता.

राजेश खन्नाला जेव्हा त्यांनी ‘आराधना’ चे कथानक ऐकवले तेव्हा राजेश खन्नाने चित्रपटात काम करायला चक्क नकार दिला! याची दोन कारणे त्याच्याकडून दिली गेली. एकतर चित्रपटात त्याच्या भूमिकेचा मृत्यू इंटरवलच्या खूप आधी होतो आणि डबल रोल मधली दुसरी भूमिका चित्रपटाच्या अगदी शेवटी येते! तसेच हा चित्रपट पूर्णतः हिरोईन ओरिएंटेड असल्यामुळे हिरोला तिथे फारसा वाव नाही हे राजेश खन्नाच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने शक्ती सामंत यांना नकार दिला. पण शक्ती सामंत यांना या भूमिकेसाठी राजेश खन्नाच हवा होता. ‘आराधना’ या चित्रपटातील कलावंतांना त्यांच्या मानधनाचा काही भाग चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मिळणार होता परंतु राजेश खन्नाला त्यांनी चित्रपट रिलीज व्हायच्या आधीच संपूर्ण पेमेंट करण्याचे आश्वासन दिले.
================================
हे देखील वाचा : Manoj Kumar : माला सिन्हा यांनी मनोज कुमार यांचा पाणउतारा केला होता.
=================================
राजेश खन्ना ने एका मुलाखतीत असे सांगितले होते की,” मी चित्रपटातील भूमिका साकारत असताना मनात माझ्या कायम हा विचार यायचा की या हीरोइन ओरिएंटेड सिनेमात काय करतो आहे? माझे काय भले होणार? पण शक्ती सामंत यांनी माझ्या भूमिकेत खऱ्या अर्थाने रंग भरले. सचिन देव बर्मन यांच्या संगीताने आणि किशोरच्या स्वराने माझी भूमिका जास्त सशक्त बनली!” हळूहळू राजेश खन्नाला भूमिका आवडत गेली आणि चित्रपट पूर्ण झाला. २७ सप्टेंबर १९६९ या दिवशी हा चित्रपट झाला आणि संपूर्ण भारत वर्षात या सिनेमाने एकच हंगामा केला. विशेषतः दक्षिणेतील राज्यात या सिनेमाला अभूतपूर्व असे यश मिळाले. मद्रासच्या एका थिएटरमध्ये या चित्रपटाचा चक्क दोन वर्ष मुक्काम होता. हिंदी भाषिक चित्रपटांना दक्षिणेत मर्यादित यश मिळत असताना ‘आराधना’ या चित्रपटाने चमत्कार घडवला आणि ‘आसे तू हिमाचल’ असे विक्रमी यश या चित्रपटाने मिळवले. जी भूमिका करायला राजेश खन्ना आणि नाराज होता त्याच भूमिकेने राजेश खन्नाला सुपरस्टार पद बहाल केले!