‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Sachin Pilgoankar- रंजिताचा ‘आंखियों के झरोखो से’आठवतो का?
काही चित्रपटांनी मनाच्या खोल कप्प्यात अढळ स्थान मिळविलेले असते. काळाच्या सीमा त्याला त्यावर आपली छाया पडू देत नाही. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे राजश्री प्रॉडक्शनचा १९७८ साली प्रदर्शित झालेला ‘आंखियों के झरोखो से’. एरिक सीगल यांची १९७० साली ‘लव्ह स्टोरी’ हि कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीने संपूर्ण जगातील वाचकांना वेड लावले. वस्तुत: या कादंबरीपूर्वी एरिक सीगल ने हेच कथानक वापरून एका चित्रपटाची पटकथा लिहिली होती.
१४ फेब्रुवारी १९७० व्हॅलेंटाईन डे रोजी हा चित्रपट (लव्ह स्टोरी) प्रदर्शित झाला आणि अफाट गाजला. या कथानकावर जागतिक पातळीवर अनेक कलाकृती बनल्या. वर उल्लेख केलेला राजश्री प्रॉडक्शन चा ‘आंखियों के झरोखो से’ हा चित्रपट याच कथानकावर बेतला होता. अर्थात त्या कादंबरीचे भारतीयकरण करून त्यावर चित्रपट बनविताना येथील प्रेक्षक वर्ग लक्षात घेवून काही बदल त्यात केले होते. १९७८ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने तरुणाईला वेड लावले.

अभिनेता सचिनला नायक म्हणून establish करण्याकरीता हा महत्वाचा चित्रपट होता. रवींद्र जैन यांच्या गीत संगीताने तर कमाल केली. यातील शीर्षक गीताने तर त्या वर्षीच्या बिनाका गीतमाला मध्ये सर्वोत्कृष्ट गीताचा मान पटकावला होता. तरुणाईच्या मनाचा वेध घेणारी ही हळवी प्रेमकथा महाविद्यालयाच्या पार्श्वभूमीवर घडते. अरुण (सचिन) एका धनाढ्य बापाचा एकुलता एक मुलगा. प्रिन्स चार्मिंग आणि अभ्यासातही हुशार त्यामुळे कॉलेज मध्ये प्रचंड लोकप्रिय.
या सर्व गुणांमुळे अरूणला थोडी इगो ची बाधा झालेली असते. त्याच्या अहंकाराला ठेच लागते ज्यावेळी एकदा लिली फर्नांडीस (रंजिता) परीक्षेत त्याच्याहून अधिक गुण घेवून सर्वप्रथम येते. अरुणला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागते. एका नवीन आलेल्या मुलीकडून आपला गुणानुक्रम मागे जातो हा तो अपमान समजतो आणि लिलीला अद्दल घडविण्याचे ठरवतो. तो आणि त्याचे मित्र जमेल तसा तिला त्रास देवू लागतात. पण लिली समंजस समजूतदार असते. ती गरीब असली तरी स्वाभिमानी असते.कॉलेज मध्ये एक स्पर्धा असते ज्यात हिंदी साहित्य असा विषय असतो. लिली ख्रिश्चन असल्याने तिचा हिंदी साहित्य आणि संस्कृतीशी काय संबंध असा विचार करून तिला पराभूत करण्याची हीच नामी संधी समजून स्पर्धेत अरुण तिच्या समोर उभा रहातो.
==============
हे देखील वाचा : Sai Paranjpye यांच्या चित्रपटासाठी किशोर कुमार यांनी कलात्मक गाणे गायले!
==============
स्पर्धेत कबीर आणि रहीम यांच्या दोह्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यातील सवाल जवाब चांगलाच रंगतो. लिली या स्पर्धेच्या माध्यमातून आणि संत वचनाच्या माध्यमातून अरुणला उद्धटपणा , मुजोरपणा , दादागिरी हि सुसंस्कृत व्यक्तीची लक्षणं नाहीत हे सांगते उलट मनाचा मोठेपणा हे निरोगी मनाचे द्योतक असल्याचे सांगते. अरुणला आपली चूक उमगते. स्पर्धेनंतर तो तिच्याकडे मैत्रीचा हात पुढे करतो. लिली देखील मोठ्या मनाने माफ करून त्याच्याशी मैत्री करते. त्यांच्या मैत्रीला आता प्रेमाचा गुलाबी रंग चढतो. नकळतपणे ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. प्रेमाची गाणी गात हे दोन प्रेमीजीव भावी आयुष्याची स्वप्ने बघू लागतात.
धर्म आणि आर्थिक स्थिती हे प्रेमातले दोन मोठे अडसर असतात. पण दोघांचे पालक प्रेमाला मुक्त पाठींबा देतात. आणि लवकरच ते विवाहाच्या पवित्र बंधनात जोडली जातील असे असताना एक घटना अशी घडते जी त्यांच्या स्वप्नांची दुनिया उध्वस्त करून टाकते. लिली अचानक पणे आजारी पडते आणि तिला ब्लड कॅन्सरचे निदान होते. दोघांकरीता तर धरती दुभंगते. अचानक आलेल्या संकटाने त्यांचे भाव जीवन उध्वस्त होते.आपल्याला होत असणाऱ्या वेदना विसरून अरुण हे दु:ख, हा आघात कसा सहन करणार या विवंचनेत लिली असते . जी स्वत: मृत्यूशी झुंज देत असते.यातली सर्वच पात्रे एकमेकाला जीव देणारी आणि सांभाळून घेणारी आहेत. (टिपिकल राजश्री फार्म्युला!).

दोघातील प्रेमाचं घट्ट नातं आता ते कटू सत्य स्वीकारते आणि ते अधिक गहिरं बनतं.पण विधात्याचे विधिलिखित कुणाला टळले आहे? अरुणच्या मिठीत लिली शेवटचा श्वास घेते. लिली जाते.अरुण सुन्न होतो. लिलीच्या रूपाने आयुष्यात आलेली सुखाचा हिरवळ अनपेक्षित पणे संपून जाते पण लिली अरुणला आयुष्याचा खरा मतितार्थ सांगून जाते. संपूर्ण चित्रपट flash back आहे. अरुणचा पदवीदान सोहळा चालू असतो. तो आता पहिला आलेला असतो.पण लिलीच्या नसण्याचे भाव त्याच्या चेहऱ्यावर ठळक पणे दिसत असतात. तिच्या फोटोकडे बघत तो भूतकाळात हरवला जातो….चित्रपट एरिक सीगल याच्या कादंबरीवर आधारीत असला तरी त्याचा कुठेही श्रेय नामावलीत त्याचा उल्लेख नाही.
अर्थात कथेचे भारतीयकरण करताना काही बदल नक्कीच केले आहेत. चित्रपटाच्या यशाचे सारे श्रेय सचिन,रंजिता हि तरुण जोडी आणि रवींद्र जैन यांचे मिठ्ठास गीत – संगीत आहे. अंताक्षरीच्या धर्तीवरील सुरुवातीचे ‘बडे बढाई न करे बडे न बोले बोल ‘ हे गीत जसपाल सिंग आणि हेमलता यांनी गायले होते.’एक दिन तुम बहुत बडे बनोगे एक दिन’ हे गीत शैलेंद्र सिंग सोबत हेमलता यांनी गायले होते. या दोघांचे आणखी एक युगल गीत जे त्त्या काळी खूप गाजले होते ‘ कई दिन से मुझे कोई सपनो में आवाज देता था हर पल बुलाता था’. रवींद्र जैन यांच्या स्वरातील ‘ जाते हुये ये पल छीन’ पार्श्वभूमीवर असले तरी सिच्युएशन करीता अगदी परफेक्ट होते. यातील शीर्षक गीताने मात्र कमाल केली.त्या वर्षीच्या बिनाका गीत मालाच्या सर्वोच्य स्थानी हे गीत होते. सिनेमाचे अप्रतिम दिग्दर्शन हिरेन नाग यांनी केले होते.
=============
हे देखील वाचा : Bappi Lahiri : पंचम यांच म्युझिक असलेल्या चित्रपटाला बप्पी लहरी यांच बॅकग्राऊंड म्युझिक !
=============
चित्रपटाचा दु:खद शेवट असला तरी त्यांनी सिनेमाचा मेलोड्रामा होवू दिला नाही. राजश्रीचे सिनेमे त्या काळात हलके फुलके , संगीत प्रधान आणि आशयघन कथा असलेले असल्याने संपूर्ण कुटुंबासोबत त्यांचा आनंद घेता येत असे. १६ मार्च १९७८ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला.मुकद्दर का सिकंदर, डॉन, घर, त्रिशूल या बड्या सिनेमा सोबत टक्कर देत या सिनेमाने सुवर्ण महोत्सवी यश मिळविले. त्या काळात राजश्री चे सिनेमे फक्त एका शो मध्ये matinee मध्ये प्रदर्शित व्हायचे आणि कॉलेज तरुणाईच्या पसंतीला उतरायचे. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, नायिका आणि दिग्दर्शन या करीता फिल्म फेयर चे नामांकन मिळाले होते. या सिनेमाचा प्रभाव राजश्रीवर इतका प्रदीर्घ होता की त्यानंतर सुमारे ३३ वर्षानी म्हणजे २०११ साली सचिन – रंजिता हीच पेयर घेवून त्यांनी या सिनेमाचा सिक्वेल बनविला ‘जाना पहचाना’. याला मात्र यश लाभले नाही.