‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Abhishek Bachchan : बच्चनपुत्र अभिषेकच्या कारकिर्दीची पंचवीशी
अहो, याचा त्याचा नाही, चक्क शहेनशाह, सुप्रिमो अमिताभ बच्चनचा मुलगा हेच केवढे तरी वजनदार. याचा दबाव खुद्द अभिषेकवरही असावा आणि आपल्या अपेक्षा वाढलेल्या…. अभिषेक बच्चनने (Abhishek Bachchan) अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलेला पहिला चित्रपट जे.पी.दत्ता दिग्दर्शित ‘रिफ्यूजी’ (२०००)च्या प्रदर्शनास पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत. बेबो अर्थात करिना कपूरचाही (Kareena Kaporr) हा पहिलाच चित्रपट. म्हणजेच तिच्याही कारकिर्दीची पंचवीस वर्ष पूर्ण. ‘रिफ्यूजी’ मुंबईत लिबर्टी व अन्य चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. समाधानकारक यशावर त्याला समाधान मानावे लागले.(Bollywood News)

स्टार पुत्र (आजच्या भाषेत सेलिब्रेटी पुत्र) ही देखील एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा. त्यात पिता (वा आई) व पुत्र (वा कन्या) या दोघांचीही कसोटी. त्यात तो पिता देव आनंद असेल तर? त्याच्या पुत्राला अर्थात सुनील आनंद याला पित्याच्या चॉकलेट रुपाची, सदाबहारपणाची, उत्फूर्तपणाची, ‘देव आनंद’ असल्याची सर येणे शक्यच नाही. (पाहू नका,आनंद पिता व पुत्र एकत्र आलेला ‘आनंद और आनंद’ चित्रपट) तेच अमिताभपुत्राबाबत. अमिताभच्या गुणवत्तेच्या अफाट उंचीवर काही बोलायची गरजच नाही. ती छोट्या मोठ्या पडद्यावर सतत दिसते. अगदी जाहिरातपटातूनही. त्याच्या उत्तुंग, चौफेर, अष्टपैलू, चौफेर वाटचालीत त्याच्या वाटेलाही अपयश आले (ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात.

विशेषत: ‘गंगा जमुना सरस्वती’, ‘तुफान’, ‘जादूगर’, ‘अजूबा’, ‘इंद्रजित’, ‘अकेला’ वगैरे चित्रपट फ्लॉप झाल्यावर, नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात ‘मृत्यूदाता’, ‘लाल बादशाह, ‘सूर्यवंशम’, कोहराम’, वगैरे सामान्य दर्जाचे चित्रपट अपयशी ठरल्यावर. हे चित्रपट त्याने स्वीकारलेच कसे हे त्या चित्रपटांच्या मुहूर्तालाच एक पत्रकार म्हणून मला प्रश्न पडे) अमिताभ केवळ आणि केवळ आपल्या गुणवत्तेवर पुन्हा पुन्हा मोठी झेप घेण्यात यशस्वी ठरला.(Entertainment News)
================================
हे देखील वाचा: Karishma Kapoor : एका दिवसांत ६ चित्रपटांचं शुटींग आणि टोपणनावाची इंटरेस्टिंग स्टोरी!
=================================
अभिषेकने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकताच अमिताभशी त्याची तुलना होवू लागली हे योग्य नव्हतेच. अमिताभही सुरुवातीच्या पडत्या काळातूनच उभा राहिला. त्यात सलिम जावेद यांची दमदार पटकथा व संवाद (प्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘जंजीर’ मधील सूडनायक अर्थात ॲन्ग्री यंग मॅनची व्यक्तीरेखा ) आणि दिग्दर्शक ह्रषिकेश मुखर्जी यांनी त्याला ‘नमक हराम’ मध्ये दिलेली अतिशय प्रभावी भूमिका. तात्पर्य, अभिषेक बच्चन पहिल्याच चित्रपटात काही भन्नाट करेल अशी अपेक्षाच नव्हती. ही झाली समजदारी. जमेची बाब इतकीच की, जे. पी. दत्तासारख्या उत्तम व व्हीजन असलेल्या दिग्दर्शकाच्या चित्रपटातून त्याला रुपेरी पडद्यावरील पदार्पणाची संधी मिळत होती.

गंमत अशी की, अभिषेक बच्चनने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकताच बबिताने आपली कन्या करिना हिला राकेश रोशन दिग्दर्शित ‘कहो… ना प्यार है’ (२०००) मधून चक्क काढले आणि ‘रिफ्यूजी’त भूमिका मिळवून दिली. फिल्मी मां हो तो ऐसी. ह्रतिक रोशनसोबत तिचं एक चित्रीकरण सत्र महालक्ष्मीच्या फेमस स्टुडिओत पार पडलेही होते. त्यापेक्षा बच्चनपुत्राचा मोह भारी. चित्रपट पडद्यावर आल्यावर ” कहो..ना प्यार है ” ची जबरदस्त क्रेझ निर्माण झाली. बबिताचं गणित चुकले म्हणायचे. मात्र ” रिफ्युजी ” त अभिषेकपेक्षा करिनाच सरस ठरली. आज यू ट्यूबवर चित्रपट पाहिला तरी.तेच जाणवेल.(Bollywood Masala)

चित्रपट भारत व पाकिस्तान यांच्या सीमाभागातील प्रेमकथा.’बॉर्डर’ (१९९७) च्या बहुचर्चित यशाच्या पाश्र्वभूमीवर दिग्दर्शक जे. पी. दत्ताबद्दल अपेक्षा वाढल्या होत्या. एकादा चित्रपट सुपर हिट ठरल्यावर त्याचा दिग्दर्शक आणखीन काही विशेष असं दाखवेल असे वाटते. जे. पी. दत्ता आपल्या दिग्दर्शनातील चित्रपटात ‘बॉर्डर’ पेक्षा भारी असे काहीच कधीच दाखवू शकला नाही. त्यात ‘रिफ्यूजी’अभिषेक बच्चनचा पहिला चित्रपट म्हणून हाईप वाढलेली. पंचवीस वर्षांतील अभिषेक बच्चनचेही आपले एक वैशिष्ट्यपूर्ण प्रगती पुस्तक आहेच.

अभिषेक बच्चनचं आपलं एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे, त्याची आपली काही वैशिष्ट्य आहेत, क्षमता आहे. ऐश्वर्या रायचा पती ही त्याची आणखीन एक ग्लॅमरस ओळख. त्यातही त्यांच्या संसारात धुसफूस सुरु आहे. सासूबाई जया बच्चन व सून ऐश्वर्या यांच्यात पटत नाही. अशा अनेक गोष्टींसह बरेच गॉसिप्स रंगलेय. अमिताभ बच्चनचा मुलगा असणे हे जसे स्वतःला सिद्ध करण्यात आव्हानात्मक तसेच ऐश्वर्यचा पती असणेही तिच्या ग्लॅमरपुढे झाकोळून टाकणारे. अभिषेक बच्चन असणे सोपे नाही. अमिताभ बच्चनच्या जुहूतील एका पंचतारांकित हॉटेलमधील एका वाढदिवसाच्या सोहळ्यात अभिषेक बच्चन कपूर खानदानाचा जावई होणार, करिश्मा कपूरशी विवाहबद्ध होणार अशी चक्क ऋषि कपूरने घोषणा केली. त्याला भरपूर टाळ्या मिळाल्या. बातम्या झाल्या. पण कशावरून तरी त्या दोघांत फिसकटले. दिल्लीतील एका कार्यक्रमावरुन ते दोघे मुंबईत आले तेच वेगळे झाले. अनेकांनी त्याचा दोष करिश्माच्या स्वभावाला दिला. असे बरे वाईट अनुभव येतातच.
================================
हे देखील वाचा: Abhishek Bachchan एकेकाळी होता LIC Agent; चित्रपटांची गिनीज बुकमध्येही आहे नोंद
=================================
तरी तो व्यवस्थित संयमाने वाटचाल करतोय. त्याचेही काही वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट आहेत, काही नावे सांगायची तर करण जोहर दिग्दर्शित कभी खुशी कभी गम, मणि रत्नम दिग्दर्शित ‘युवा’ व ‘गुरु’, अपूर्व लखिया दिग्दर्शित ‘बम्बई से आया मेरा दोस्त’,शाद अली दिग्दर्शित ‘बंटी और बबली’, रामगोपाल वर्मा दिग्दर्शित ‘सरकार’, ‘सरकारराज’ या चित्रपटांचा खास उल्लेख हवाच. त्याने केवढी तरी विविधता दाखवलीय. पण त्याचं म्हणावं तसे कौतुक झाले नाही. अमिताभ बच्चन नावाच्या विशालगडात अभिषेक बच्चन अगदीच डोंगर वाटतो. पण तरीही त्या डोंगराची आपली काही वैशिष्ट्य आहेत. अमिताभ बच्चन एकच असतो, असू शकतो असे का एकदा स्वीकारले की अभिषेक बच्चनचेही कौतुक करता येईल…त्याच्या कारकिर्दीतील पंचवीस वर्षाचा टप्पा ही मोठीच गोष्ट.(Abhishek Bachchan Movies)