
‘या’ कारणामुळे सिन्हाने दिलीपकुमार सोबत काम करण्याची संधी गमावली
साठच्या दशकातील आघाडीची अभिनेत्री माला सिन्हा हिने त्या काळातील सर्वच अभिनेत्यांसोबत रुपेरी पडद्यावर नायिकेच्या भूमिका अदा केल्या होत्या. कृष्णधवल चित्रपटापासून सुरू झालेला त्याचा प्रवास पुढे सप्तरंगात आलेल्या चित्रपटातील दिमाखात चालू राहिला. बी आर चोप्रा यांच्या धूल का फूल,धर्मपुत्र,गुमराह, गुरुदत्त यांचा ‘प्यासा’,रामानंद सागर यांचा ‘आंखे’ रमेश सैगल यांचा ‘फिर सुबह होगी’ या चित्रपटातील माला सिन्हाच्या भूमिका विशेष लक्षात राहिल्या. हिमालय की गोद मे, हरियाली और रास्ता, अनपढ, मेरे हुजूर हे तिचे गाजलेले चित्रपट. माला सिन्हाने गोल्डन इरा मधील राज कपूर, देव आनंद, शम्मी कपूर, गुरुदत्त, राज कुमार, मनोज कुमार, विश्वजीत, जॉय मुखर्जी, राजेंद्र कुमार यांच्यासोबत तर नायिकेच्या भूमिका केल्यास पण सत्तरच्या दशकात राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांची नायिका होण्याची देखील भाग्य तिला लाभले होते. पण दिलीप कुमार सोबत नायिका म्हणून काम करता आले नाही ही खंत तिच्या उरात आजही कायम असते. माला सिन्हाला अभिनय सम्राट दिलीप कुमार (Dilip Kumar) यांच्यासोबत काम करण्याची संधी एकदा आली असताना देखील स्वतःच्याच एका निर्णयामुळे तिला गमवावी लागली होती. त्यामुळे माला सिन्हा कायम आपण इतके चित्रपट केले पण दिलीप कुमार सोबत आपण रुपेरी पडदा शेअर करू शकलो नाही याची खंत वाटत असते. नेमका काय होता हा किस्सा?

दिलीप कुमारने दक्षिणेकडच्या एका निर्मात्याकडे १९६७ साली ‘राम और शाम’ हा चित्रपट करायचे ठरवले. हा एक कॉमेडी मसाला चित्रपट होता. चित्रपटातील दिग्दर्शक होते तापी चाणक्य. यात दिलीप कुमारचा (Dilip Kumar) डबल रोल त्यामुळे अर्थातच सिनेमात दोन हीरोइन असणार होत्या. एका भूमिकेसाठी वहिदा रहमान यांची निवड करण्यात आली तर दुसरी भूमिका माला सिन्हाला देण्यात आली. माला सिन्हाचा हा दिलीप कुमार (Dilip Kumar) सोबतचा पहिलाच चित्रपट असणार होता पण ज्यावेळी तिला कळाले की, ती सिनेमातील सेकंड लीड एक्ट्रेस आहे त्यावेळी तिने सिनेमा नाकारला! कारण माला सिन्हा तोवर आघाडीच्या अभिनेत्रीपैकी एक झाली होती आणि सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका करावी असे तिला अजिबात वाटत नाही. तेव्हा एका मुलाखतीत ती म्हणाली होती,” मी चित्रपटातील भूमिकेचा प्राधान्याने विचार करते. मला भूमिकेच्या लांबी रुंदी पेक्षा त्यातील खोली महत्त्वाची वाटते. मला ही भूमिका दुय्यम दर्जाची वाटते त्यामुळे मी हा सिनेमा नाकारत आहे!” यानंतर प्रोड्युसरची अडचण निर्माण झाली. या भूमिकेसाठी मग ऐन वेळी मुमताजची निवड केली. मुमताज तोवर सी ग्रेड पोशाखी मारधाड चित्रपटाची नायिका होती. तिच्या त्या काळातील बहुतेक चित्रपटाचे नायक हे दारासिंग, रंधवा असायचे. मेन स्ट्रीममधील सामाजिक चित्रपट तिला मिळत नव्हते. तिच्या दृष्टीने ही एक लॉटरीच होती. चक्क अभिनय सम्राट दिलीप कुमारची नायिका तिला साकारायची होती. ती प्रचंड खुश झाली आणि अशा तऱ्हेने माला सिन्हाच्या जागी मुमताजची नियुक्ती झाली आणि चित्रपट पूर्ण झाला.
चित्रपट अर्थातच सुपरहिट झाला. मुमताज हिची भूमिका देखील प्रचंड गाजली आणि तिच्या दृष्टीने हा चित्रपट म्हणजे हिंदी सिनेमातील आघाडीच्या अभिनेत्री बनण्याचा गेट वे ठरला. कारण यानंतर तिच्यातील अभिनयाची जाण निर्मात्यांना आली आणि तिच्यावर अनेक चित्रपटांचा वर्षाव होऊ लागला. दिलीप कुमारने (Dilip Kumar) देखील मुमताच्या अभिनयाची तारीफ केली. पुढे खिलौना, मेरे हमदम मेरे दोस्त, दो रास्ते हे चित्रपट तिला मिळाले. सत्तरच्या दशकात तर ती राजेश खन्नाची फेवरेट हिरोईन होती.
=====
हे देखील वाचा : ’कळीदार कपूरी पान’ तब्बल दहा वर्षांनी रंगले!
=====
इकडे माला सिन्हाने ‘राम और शाम’ हा चित्रपट जेव्हा बघितला त्यावेळेला तिला आपण घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप वाटू लागला. कारण ती समजत होती तितकी काही ही भूमिका दुय्यम आणि तकलादू नव्हती. एका रॉंग इंटरप्रिटेशन मधून तिने हा निर्णय घेतला होता, ज्याचा तिला कायम पश्चाताप होत राहिला. परंतु यामुळे दिलीप कुमार सोबत काम करण्याचे तिचे स्वप्न मात्र अपूर्णच राहिले. नाही म्हणायला १९७४ साली आलेल्या ‘प्यार का सपना’ या चित्रपटात दिलीप कुमारची (Dilip Kumar) गेस्ट अपिअरन्स भूमिका होती. ‘प्यार का सपना’ या चित्रपटात दिलीपकुमार होता पण तो मालाचा नायक नव्हता. गोल्डन इरा मधील नूतन, आशा पारेख आणि माला सिन्हा यांना दिलीप कुमार (Dilip Kumar) सोबत नायिकेची भूमिका करायला मिळाली नाही. नूतनला खूप वर्षानंतर चरित्र अभिनेत्री झाल्यानंतर दिलीप पवार सोबत ‘कर्मा’ या चित्रपटात भूमिका करायला मिळाली. पण माला सिन्हाला ते भाग्य देखील लाभले नाही.